रविवार, ३१ मार्च, २०१३

पिंजर्‍यातला दुबळा सिंह आणि कायद्याचे राज्य


  एक सिंह होता. आता तो सिंह म्हटला, की जंगलचा राजा म्हणजे जंगलात असणार हे आपोआपच आले. पण जंगलात त्याचा खुप रुबाब होता. नुसता इथून तिथे निघाला तरी सर्वत्र शांतता असायची. सगळीकडे सामसूम व्हायची. कोणी प्राणीमात्र तोंड वर बघणे सोडा, त्याच्यासमोर यायची बिशाद नव्हती. पण त्याचा दबदबा असला तरी त्याची दहशत होती असे अजिबात नाही. कारण त्याचे पोट भरलेले असेल तर तो उगाच कोणाची शिकार करणार नाही याची तमाम जंगलवासियांना खात्री होती. असा हा वनराज सिंह तहान लागली म्हणून एकदा पाणवठ्यावर पोहोचला. गर्द झाडीतून चालताना त्याला नदीच्या काठी कसली तरी खसखस ऐकू आली. दबा धरून त्याने हळूच पाहिले, तर काही मुली तिथे काठाशी बोलत खिदळत होत्या. जवळच्या राज्याची राजकन्या तिथे आपल्या सखी मैत्रीणींसह सहलीला आलेली होती. तिचे सौंदर्य बघून वनराजांचा अगदी मजनू होऊन गेला. आपली तहानभूक विसरून ते आडोशाला थांबले आणि राजकन्येला न्याहाळत राहिले. काही वेळाने तो घोळका निघून गेला. मात्र वनराजाच्या डोक्यातून ती रुपमती जात नव्हती. त्यांना शिकार सुचेना, की भूक लागेना. त्याने हाक मारून कोल्ह्याला अभय दिले आणि त्याच्याशी सल्लामसलत केली. तेव्हा वनराजाला कळले, की तो प्रेमात पडला आहे. आता त्या राजकन्येशी विवाह केल्याशिवाय जीवनात सुखसमाधान नाही, असेच त्याला वाटू लागले. पण त्या कोल्ह्याने त्याला प्रामाणिक सल्ला दिला. आपण जंगलवासी या गाववस्तीतल्या लोकांशी सोयरिक बरी नाही. शिवाय माणुस अत्यंत कुटील हिंस्र प्राणी. त्याच्या तर वार्‍याला फ़िरकू नये. तेव्हा वनराजाने राजकन्येचा विचार आपल्या डोक्यातून काढून टाकावा. पण ते सिंहाला पटले नाही. त्याने कोल्ह्याला हाकलून लावले आणि मनोमन काही निश्चित निर्णय घेतला. दुसर्‍या दिवशी दुपार होईपर्यंत वनराज थेट जवळच्या वस्तीमध्ये त्या राजाच्या दरबारातच येऊन थडकले.

   साक्षात सिंह वस्तीत येताना बघून सर्वांची पाचावर धारण बसली होती. त्या नगरात क्षणार्धात शुकशुकाट पसरला. गुरे गोठ्यात तर कुत्रीमांजरे घराच्या वळचणीला दडून बसली होती. रस्त्यातून माणसे पळत सुटली होती. पण वनराजाचे कुठेच लक्ष नव्हते. आपल्या मस्तीत, धुंदीत दमदार पावले टाकत सिंह थेट राजाच्या दरबारात आला. तिथे त्याला पाहून दरबार्‍यांची गाळण उडाली. खुद्द राजाचीही बोबडी वळली. पण त्या घबराटीकडे सिंहाचे लक्षच नव्हते. त्याने आदब दाखवत महाराजांना मुजरा केला आणि राजकन्येला मागणी घातली. त्यावर राजाला काय बोलावे सुचेना. पण त्याचा धुर्त प्रधान सावध होता. त्याने तात्काळ सिंहाचा मुड ओळखून त्याचे स्वागत केले आणि मागणी मान्यही केली. वनराज म्हणजे राजपुत्रच, तेव्हा सोयरिक आपल्याला मान्य आहे. परंतू विवाहात काही तांत्रिक अडचणी असल्याने अटींची पुर्तता करावी लागेल; असे नम्रपणे सुचवले. ती आयाळ बघून आमची नाजूक कन्या भायभीत होईल, तेवढी आयाळ काढून टाकायचे मान्य करा. सिंहाने अट मान्य केली तिची पुर्तता करून उद्या येण्याचे आश्वासन देऊन सिंह दरबारातून बाहेर पडला. ओस पडलेल्या रस्त्यातून माघारी जंगलात आला. इकडे राजा प्रधानावर संतापला होता. पण प्रधानाने त्याच्या कानात आपला बेत सांगितला आणि राजाचा जीव भांड्यात पडला. जंगलात आलेल्या सिंहाने विनाविलंब आपली आयाळ काढून टाकण्याची व्यवस्था केली आणि दुसर्‍या दिवशीच दरबाराकडे प्रस्थान ठेवले.

   काल ज्याच्या नगरात येण्याने गाईगुरे लपली होती; ती आज त्याच सिंहाला घाबरत नव्हती. काल लपून बसलेली कुत्री आज आयाळ नसलेल्या सिंहाकडे काहीशी कुतूहलाने बघत होती व दुरुनच भुंकण्याचे धाडस करत होती. पण प्रेमात वेडा झालेल्या सिंहाला कसले भान होते? त्याच्या नजरेसमोर फ़क्त त्या रुपमती राजकन्येचे सौंदर्यच होते. आज त्याला पाहून दरबारात कोणी घाबरले नाही. त्याचे स्वागत करीत प्रधान म्हणाला, वनराज दोनच दिवसानंतरचा मुहूर्त काढला आहे. पण आणखी एक अट राहून गेली. तुमच्या प्रणयराधनात तिची अडचण होऊ शकेल म्हणुन सांगतो. तुमच्या पंजाच्या त्या नख्या किती तीक्ष्ण आहेत हो. आमच्या नाजूक राजकन्येला त्यांची इजा होईल ना? तेवढ्या नख्या काढून घ्या मुहूर्तापुर्वी. बाकी आम्ही मंडपापासून सगळी सज्जता करतोय. तुमची वरात येण्याचीच प्रतिक्षा असेल आम्हाला. सिंह म्हणाला, आणखी काही अटी असतील तर आताच सांगा. प्रधानाने नाही म्हणताच सिंह माघारी परतला. नदीकाठी येऊन एका खडकावर आपले पंजे आपटत नखे उपटू लागला. कोल्ह्याने पाहिले व समजावण्याचा प्रयास केला. पण रागाने गुरगुरणारा सिंह पाहून त्याचे पळ काढला. तिसर्‍या दिवशी सिंह नगरात गेला, तेव्हा त्याची जणू वरातच निघाली होती. लोक त्याच्याकडे बघून फ़िदीफ़िदी हसत होते आणि गावातली कुत्री भुंकत होती. पण प्रेमवीराला त्याचे काय? दरबारात त्याचे जंगी स्वागत झाले. तमाम उपस्थित त्याच्याकडे पाहून हसत होते, तर प्रधानाने मात्र इतका देखणा वर कन्येला मिळाल्याबद्दल राजाचे अभिनंदन केले. सिंहाच्या त्या गबाळग्रंथी ध्यानाचे अवास्तव कौतुक सुरू होते. त्यामुळे वनराज सुखावलेल्या. पण त्याच्या हास्य गडगडाटाने प्रधानाच्या कपाळावर मात्र आठ्या पसरल्या. तो म्हणाला जावईबापू ह्या तुमच्या हिंस्र दंतपक्ती मोठीच अडचण आहे. उद्या लग्नाचा मुहूर्त आणि हे हिंस्र दात? तेवढे रातोरात उपटून घ्या आणि उद्याच वरात घेऊन या. शेवटची अट मान्य करून सिंह जंगलात परतला. संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत दगडखडे चावून आपले दात त्याने पाडून घेतले आणि थकव्यानेच त्याला पहाटे झोप लागली.

   सकाळी सुजलेले तोंड व रक्ताने माखलेले पंजे अशा अवस्थेतला दुबळा सिंह जंगलातून नगराकडे आला, तेव्हा लोक त्याला अजिबात घाबरत नव्हते. कुत्री तर भुंकत त्याच्या अंगावर धावून येत होती. त्या दयनीय अवस्थेत दरबारात आलेल्या या प्रेमवीराला पाहून हास्याचा कलकलाट झाला. प्रधानाने मात्र सिंहाचे तोंड भरून स्वागत केले. या नवरदेव, असे मंचकावर या. सिंह पुढे गेल्यावर प्रधानाने टाळी वाजवली आणि सेवक पुढे सारसावले. प्रधानाने त्यांना सिंहाला बोहल्यावर चढवायचा आदेश दिला. तेव्हा दुसरे काही सेवक पिंजरा घेऊन समोर आले. सर्वांनी सिंहाची गठडी वळून त्याला पिंजर्‍यात ढकलले. त्यानंतर अवघा दरबार खदखदा हसू लागला. पण अजून प्रेमवीर सिंह प्रेमाच्या धुंदीतच होता. मात्र त्या हास्याच्या गडगडाटामध्ये एक आवाज त्याला परिचित वाटला म्हणून त्याचे डोळे त्या आवाजाच वेध घेऊ लागले. तोच तर हसण्याचा मंजुळ आवाज त्याला प्रेमवेडा करून गेला होता. पिंजर्‍यात पडलेल्या त्या दुबळ्या जखमी व शक्तीहीन हतबल सिंहाला पाहून खिदळणार्‍या त्या लोकांमध्येच ती राजकन्या होती. जिच्या सौंदर्यावर भाळलेल्या सिंहाने आपली अशी दुर्दशा करून घेतली होती. तिलाच आपली टवाळी करताना पाहून सिंहाची धुंदी उतरली. आपण जखमी व निकामी होऊन अलगद पिंजर्‍यात अडकलो असल्याचे भान सिंहाला आले व तो संतापून प्रधानाला म्हणाला; तू दगाबाज विश्वासघातकी आहेस. तू मला फ़सवलेस. माझ्या हळवेपणाचा गैरफ़ायदा घेऊन मलाच निकामी दुबळे करून असे बंदिस्त केलेस. तुला सोडणार नाही. मग प्रक्षुब्ध सिंहाच्या गर्जनेने अवघा दरबार हादरला. पण नुसत्या आवाजापलिकडे त्यात काही दम नव्हता. त्यावेळी प्रधानाने सिंहाला दिलेले उत्तर खुप मोलाचे होते.

   वनराज, आम्ही कोण तुला दगा देणारे? तुच स्वत:चा विश्वासघात केला आहेस. अरे आयाळ, तीक्ष्ण दात व पंजाच्या नख्या, हीच तर तुझी ताकद व रुबाब. त्यालाच तर वनराज म्हणतात. तू त्याच तुझ्या बलस्थानाशी बेईमानी केलीस. तूच तुझ्या सिंह असण्याशी दगाबाजी केलीस. आम्ही ढीग तुला अटी घातल्या. पण त्या मान्य व पुर्ण करताना आपण आपले सिंह असणेच गमावतोय, याचे भान तुला राहिले नाही. राजकन्येच्या प्रेमात तू आपले सिंह असणेच पणाला लावण्याच्या जुगारात सर्वस्व गमावून बसलास. आता इथली कुत्री तुला दाद देणार नाहीत; तर जंगलात तुला कोण किंमत देणार आहे? नुसत्या मोठ्या गर्जना करून व डरकाळ्या फ़ोडून काय उपयोग आहे? तिथे पिंजर्‍यातच सुखरूप आहेस. बाहेर पडलास तर कोल्हेकुत्रेही फ़ाडून तुझीच शिकार करतील. तू सिंह असायलाच नालायक होतास. सौंदर्याच्या प्रेमात पडणे चुक नाही. पण त्या प्रेमाच्या आहारी जाऊन आपले अस्तीत्वच गमावणार्‍याला काय किंमत? नुसत्या डरकाळ्या उपयोगाच्या नाहीत. त्यानंतर हिंसा करण्याची क्षमता व ताकद महत्वाची असते. ती आपली क्षमताच नष्ट करून, तु स्वत:लाच इतके केविलवाणे करून घेतले आहेस. जंगलचा असलास तरी तू राजा होतास आणि कोणावर विश्वास ठेवायचे याचेही भान तुला उरले नाही ना? आमच्यावर विश्वास ठेवलास, हीच तुझी चुक होती. बिचार्‍या सिंहाला कोल्ह्याचे सावध करणारे शब्द आठवले. पण वेळ गेलेली होती.

   अर्थात ही एक अशीच भाकडकथा आहे. कारण असे कुठे घडलेले नाही. असा राजकन्येच्या प्रेमात पडलेला सिंह कोणाला कुठे दाखवता येणार नाही. म्हणूनच ती रुपककथा आहे. पण त्यातला मुद्दा महत्वाचा आहे. त्यातला बोध महत्वाचा आहे. सिंहाने सिंह असण्यातच त्याची शान असते. त्याने काय करावे आणि त्याच्या मर्यादा कुठल्या, त्याचा बोध यात आहे. नुसताच सिंह होऊन भागत नाही. सिंह असण्याच्या व त्याप्रमाणे वागण्याच्या अटींचे पालन करावे लागते. त्याकडे पाठ फ़िरवून भलत्याच कुणाच्या अटी मान्य करून सिंह आपले सिंहपण गमावत गेला; तर त्याच्या डरकाळीला कोणी घाबरण्याचे कारण उरत नाही. असा सिंह कुठे कोणी बघितला आहे काय? बहुतांशी नकारार्थीच उत्तर येणार याची मला खात्री आहे. म्हणून थोडी स्मरणशक्ती चाळवा.

   आजही ऐंशी वा नव्वदीतले काही म्हातारे आपल्यात जिवंत आहेत आणि त्यांच्याकडून अधुनमधून एक वाक्य हमखास ऐकायला मिळते. ‘यापेक्षा ब्रिटीशांही सत्ता बरी होती. त्या गोर्‍या साहेबाचा कायदा कसा धाकाचा होता. सरकारचा कसा दबदबा होता.’ अशी विधाने कानावर पडतात ना? त्यातला कायदा, सत्ता असे जे शब्द आहेत, तोच या कथेतला सिंह आहे. पासष्ट वर्षापुर्वी ब्रिटीशांनी या देशाची सत्ता सोडून भारतीयांच्या हाती सत्ता दिली, तेव्हा कायद्याचे राज्य कसे होते? पन्नास चाळीस वर्षे मागे गेले, तरी जो कायद्याचा दबदबा होता, तो आज कुठे बघायला तरी मिळतो काय? गुन्हेगार गुंड कायद्याच्या अंमलदार व अधिकार्‍यांना वचकून असायचे. आणि कायद्याचे अंमलदार कसे रुबाबदार सिंहासारखे असायचे. आंदोलनात किंवा दंगलीत दिसेल तिथे गोळी घाला असला आदेश दिला जायचा आणि काही तासात दंगली आटोक्यात यायच्या. तो कायद्याचा सिंह नुसता डरकाळी फ़ोडत नव्हता. जर डरकाळीने भागले नाही तर त्याचे पंजे, त्याच्या नख्या व धारदार दात शिकार करू शकत होते. त्याच्याच भयाने गुन्हेगारांची पाचावर धारण बसत होती. गुन्हेगारांची पोलिस म्हटले की गाळण उडायची. कोर्टात जायला लोक घाबरायचे. कायद्याच्या राज्याचा असा दबदबा होता. ज्याच्या हाती कायदा तो सिंह असायचा. त्याच्यापुढे कोणाची डाळ शिजत नव्हती. गुन्हे करायला गुंड घाबरत असे, तसाच आंदोलन दंगल करायला नागरिकही घाबरत होता. पण त्याच कायद्याला माणूसकी शिकवण्याचा प्रयास झाला; तिथे कायदा राजकन्येच्या प्रेमात पडला आणि त्याची क्रमाक्रमाने दुर्दशा होत गेली. ब्रिटिशांची सत्ता किंवा त्यानंतरचा काही काळ जे कायद्याचे राज्य होते, ते आज रसातळाला गेले आहे म्हणजे नेमके काय झाले आहे, त्याचीच ही उपरोक्त कहाणी आहे. त्यातला सिंह म्हणजे कायदा आहे. कायद्याच्या राज्याची सुरूवात आपल्या देशात कधी व कशी झाली, तो इतिहास आठवा; मगच तो कायदा सिंह कशाला वाटायचा व त्याच्या डरकाळीचा दबदबा कशामुळे होता, त्याचा अंदाज येऊ शकेल.

   आपल्याला १८५७ चे बंड आठवते. मोठ्या कौतुकाने आजही त्याचे स्मरण केले जाते. पण त्यानंतर अवघ्या तीनच वर्षांनी आपल्या देशात कायद्याचे राज्य सुरू झाले, याचे कितीजणांना स्मरण आहे? आजही वापरात असलेला भारतीय दंडविधान हा देशातला पहिला नागरी प्रशासन राबवणारा कायदा आहे. तो १८६० सालात अस्तित्वात आला. म्हणजेच १८५७ नंतर अवघ्या तीन वर्षांनी. त्याचे कारणही तेच बंड होते. सरकार व सत्ता यांची हुकूमत लिखित स्वरूपात अवघ्या लोकसंख्येला निमुटपणे मान्य करायला भाग पाडणारा असा तो भारतातला पहिलावहिला लिखित कायदा आहे. आणि तो बिनतक्रार का स्विकारला गेला? त्याबद्दल तक्रार करायची कोणाला हिंमत का झाली नाही? त्या कायद्याचा इतका दबदबा कशामुळे होता. राजीखुशीने लोकांनी ब्रिटीशांचा तो कायदा मान्य केला होता, की त्यामागे दहशत होती? १८५७ चे बंड मोडून काढल्यावर ब्रिटीश सेना व सैनिकांनी शांतता कशी प्रस्थापित केली होती? जनतेला त्यांनी विश्वासात घेऊन त्यांना माणूसकीचे धडे दिले नव्हते. तर सत्तेची गुर्मी व क्रौर्याची साक्ष दिली होती. बंडात सहाभागी झालेले किंवा त्याला सहानुभूती असलेले जे कोणी होते; त्यांची अतिशय अमानुष पद्धतीने कत्तल करण्यात आलेली होती. जिथे वधस्तंभ नसतील तिथे झाडांना लटकावून शेकडो हजारो भारतीयांना क्रुरपणे फ़ाशी देण्यात आलेले होते. कुठे नुसत्या संशयामुळे, कुठे किरकोळ पुराव्याच्या आधारे लोकांचे सत्ताधार्‍यांनी जीव घेतले होते. थोडक्यात आपल्या अमानुष व पाशवी क्रौर्याचा साक्षात्कार ब्रिटीश सत्तेने भारतीयांना घडवला होता. त्यातून जी भीषण दहशत भारतीय समाजामध्ये ब्रिटीश सत्तेबद्दल निर्माण झाली, त्याच भयगंडावर स्वार होऊन दंडविधान नावाचा पहिला कायदा अस्तित्वात आला. प्रत्येकवेळी हत्यार उपसून हिंसेने हुकूमत दाखवण्याची पाळी येऊ नये, म्हणून १८५७ च्या त्या क्रौर्याला दिलेले शब्दरूप म्हणजे भारतातला पहिला नागरी कायदा होता.

   तोपर्यंतचे सत्ताधीश आपापली सत्ता प्रस्थापित केल्यावर स्थानिक सुभेदार, जमीनदार व संस्थानिक, वतनदारांच्या मदतीने सत्ता राबवित होते. त्यामुळे प्रत्येक गावात वस्तीत व प्रदेशात वेगवेगळे मनमानी करणारे कायदे होते. राजा खुश असला मग बाकी कोणीही काहीही करायला मोकळा होता. ती पद्धत ब्रिटिशांनी मोडीत काढली व संपुर्ण हिंदूस्तानसाठी लिखित स्वरूपाचा पहिला कायदा दंडविधानाच्या रुपाने अंमलात आणला. तो कायदा सामान्य जनतेपासून सुभेदारांपर्यंत मान्य झाला, कारण झुगारणार्‍याला आपल्या जीवाची भिती होती. सत्तेला आव्हान म्हणजे जीवावर बेतणार होते, आणि या कायद्याचे स्वरूप पाहिल्यास जो कोणी गुन्हा करील त्याला कायदा मोडणारा म्हणजे सरकारविरोधी मानला जात होते. आणि सरकार विरोधी म्हणजे थेट क्रुर शिक्षेचे भय होते. भारतात कायद्याचे राज्य आले ते असे हिंस्र सिंहाचे रूप धारण करून. त्याच्या हिंसक आक्रमक क्रौर्याची साक्ष देऊनच लिखित कायदा भारतात आला. त्याचा अर्थ लावणे ज्याच्या हाती होते, त्याच्या मर्जीनुसारच तो चालत होता. म्हणून अंमलदाराचा दबदबा होता. सत्तेची भिती अशी काळजाचा थरकाप उडवणारी होती. त्या भितीनेच मुळात कायद्याचे राज्य प्रस्थापित केले होते. तुमचे कृत्य कायद्याचा भंग करणारे असेल, अवज्ञा करणारे असेल; तर कठोर शिक्षा होऊ शकते आणि त्यातून सुटका नाही, अशी मानसिकता तयार करण्यात आली. १८५७ च्य भीषण कत्तलीने ती आधीच आयती तयार होती. त्याच भयगंडाला कायदा असे नाव देऊन त्याच्या शब्दरूप व्याख्या तयार करण्यात आल्या. शिक्षेच्या भयाने कायद्याचे काटेकोर पालन व्हायला मदत झाली. परंतू पुढल्या लोकशाही व एतद्देशीय सत्तेने तो धाक पुरता संपुष्टात आणला. सामाजिक दृष्टी, सुधारणांची संधी, माणूसकी, अशा विविध राजकन्यांच्या प्रेमात कायदा फ़सत गेला आणि त्याचा धाक संपत गेला. आज त्याला गुन्हेगार काय सामान्य नागरिकही भिक घालत नाही अशी दुर्दशा झालेली आहे. पण दुसरीकडे असे कायदे आजही याच भारतात कार्यरत आहेत. अत्यंत परिणामकारक पद्धतीने राबवले जात आहेत.

   दुर तिकडे पाकिस्तानात दडी मारून बसलेला दाऊद वा छोटा शकील, आणखी कुठे मलेशियात बसलेला राजन वा असाच कोणी नुसत्या फ़ोनवर धमक्या देतो आणि इथले उद्योगपती, व्यापारी किंवा चित्रपट निर्माते कलावंत त्याला हवे तसे काम करतात, खंडण्या देतात. जी मंडळी देशातल्या प्रस्थापित सत्तेला जुमानत नाहीत. आयकर बिनदिक्कत बुडवतात, तीच ही मंडळी आहेत ना? मग तेच लोक परदेशी बसलेल्या फ़रारी गुन्हेगारांच्या धमक्यांचे निमुट पालन का करतात? तर त्यांच्या धमक्या पोकळ नसतात. त्यांना क्रौर्याचे दात, पंजे व नख्या असतात आणि त्यांचा वेळ आल्यास वापर होणार, अशी खात्री असते. ज्यांनी आदेश पाळला नाही त्यांचे मुडदे पाडले जातात, या क्रौर्याची साक्ष जो देतो, त्याचे कायदे पाळले जातात. त्याला कायद्याचे राज्य म्हणतात. दाऊद, गवळी, राजन वा शकील यांचे आजही आपल्या देशात राज्य आहे. ते खरे कायद्याचे राज्य आहे. त्यांचा दबदबा आहे. पण ज्याला आपण कायद्याचे राज्य म्हणतो, त्याची अवस्था मात्र गोष्टीतल्या सिंहासारखी झालेली आहे. त्याचा कुणावर वचक नाही, त्याची कुणाला भिती वाटत नाही. म्हणूनच कोणी त्या कायद्याला दाद सुद्धा देत नाही. कायदा हल्ला करणार्‍या क्रुर सिंहासारखा असावा लागतो. त्याची हुकूमत असते, तिला कायद्याचे राज्य म्हणतात. आपल्या देशातला कायदा दात, नख्या व आयाळ गमावलेला पिंजर्‍यातला नुसता डरकाळ्या फ़ोडणारा सिंह आहे. त्याला दाऊद, राजन, शकील यांनाही पंजा मारता येत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा