शनिवार, ८ सप्टेंबर, २०१२

धडपडणारी मुले नव्हे तर तडफ़डणारी मुले


अमळनेर गांवात आज विश्वधर्ममंडळाच्यावतीने थोर, पैगंबर महंमद यांची पुण्यतिथि साजरी होणार होती. विश्वधर्ममंडळ तेथे नवीनच स्थापन झाले होते. नवीन जीवनाचा तो एक लहानसा अंकुर होता. हजारो वर्षे जो विशाल भारत बनत आहे, त्याच्याच सिद्धीसाठी ते लहानसे मंडळ होते. जे महाभारताचे महान वस्त्र परमेश्वर अनंत काळापासून विणीत आहे, त्या वस्त्रांतील एक लहानसा भाग म्हणजे ते मंडळ होते.

हिंदुस्थानभर हिंदुमुसलमानांचे दंगे सुरू असताना असे मंडळ स्थापण्याचा बावळटपणा कोणी केला? ही स्वाभिमानशून्यता कोणाची? या दंग्याच्या आगीत तेल ओतल्याचे सोडून हे नसते उपद्व्याप कोण करीत होते?

काय सर्व हिंदुस्थानभर दंगे आहेत? नाहीत. ती एक भ्रांत कल्पना आहे. हिंदुस्थानांतील दहावीस शहरांत मारामारी झाली असेल. परंतु ही दहावीस शहरे म्हणजे कांही हिंदुस्थान नव्हे. लाखो खेड्यापाड्यांतून हिंदुमुसलमान गुण्योगोविंदाने नांदत आहेत. त्यांचे संबंध प्रेमाचे व जिव्हाळ्याचे आहेत. शेकडो प्रामाणिक मुसलमान नोकर हिंदूंची मुले खेळवीत आहेत. एकमेकांच्या ओटीवर हिंदुमुसलमान पानसुपारी खात आहेत. हिंदुमुसलमानात सलोखा आहे. 

परंतु वर्तमानपत्राना हे खपत नसते. ऐक्याचे व प्रेमाचे वारे पसरविण्याऐवजी वर्तमानपत्रे द्वेषमत्सराचे विषारी वारेच सोडत असतात. हिंदुमुसलमानांच्या दग्यांची, तिखटमीठ लावून विषारी केलेली वार्ता वर्तमानपत्रे जगभर नेतात, आणि कोट्यवधि हिंदुमुसलमानांची मने अशांत केली जातात. आग नसेल तेथे आग उत्पन्न होते. प्लेग नसेल तेथे प्लेगाचे जंतु जातात. हिंदुस्थानची दैना झाली आहे तेवढी पुरे, असे या वर्तमानपत्रांना वाटत नाही. भडक काहीतरी प्रसिद्ध करावे, पैसे मिळावे, अंक खपावे हे त्यांचे ध्येय. मग भारत मरो का तरो. समाजाला आग लागो की समाजाची राखरांगोळी होवो. 

मुंबईला एका इमारतीस आग लागते. परंतु आपण त्याच गोष्टीस महत्त्व देतो. मुंबईतील लाखो इमारती देवाने सुरक्षित ठेविल्या होत्या हे आपण विसरतो. त्याप्रमाणे एके ठिकाणी दंगा झाला तर त्यालाच आपण महत्त्व देतो. इतर लाखो ठिकाणी प्रेमळ शांतता आहे, ही गोष्ट आपण डोळ्याआड करून उगीच आदळआपट करु लागतो. प्रत्येक धर्मांतील संकुचित वृत्तीचे लोक अशा प्रकारे आपल्या श्वासोच्छवासाबरोबर अश्रद्धा घेऊन जात असतात. जगाची होळी पेटत ठेवतात.


   पुज्य सानेगुरूजी यांच्या ‘धडपडणारी मुले’ या ग्रंथातील ‘स्वामी’ नावाच्या कथेतील हा उतारा आहे. त्यात आजच्या सेक्युलर पत्रकारितेचे नेमके वर्णन आले आहे की नाही? गुरूजींना जाऊन आता सहा दशकांचा कालावधी लोटला आहे. मात्र त्यांच्या कथा व संस्काराची आठवण महाराष्ट्र विसरलेला नाही. पण दुर्दैव असे, की गुरुजींच्याच नावाने मळवट भरून मिरवणारे म्हणुन जे कोणी आजकाल समाजात उजळमाथ्याने वावरत असतात, त्यांनी मात्र गुरू्जींचे तेच विचार पुरते धुळीस मिळवले आहेत. आणि जर अशा सानेगुरूजी भगतगणांची नावे मी इथे सांगितली तर वाचकाला भोवळच येईल. कारण ज्यांना गुरूजी आपल्या कथेतून दंगलीत आगीचे तेल ओतणारे विघ्नसंतोषी म्हणुन दोष देत आहेत, ते बहुतांशी त्याच गुरूजींच्या परिवारातले आहेत ज्यांना सेवादलीय म्हणतात. सानेगुरुजी यांच्याच प्रेरणेने राष्ट्र सेवा दल नावाची संघटना स्वातंत्र्याच्या उदयकाली स्थापन झाली. आणि कायबीइन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांच्यापासून प्रकाश बाळ, हेमंत देसाई, निळू दामले, डॉ. कुमार सप्तर्षी, प्रताप आसबे, समर खडस अशी तमाम सेवादलीय मंडळी स्वत:वर गुरूजींचे संस्कार असल्याचा नित्यनेमाने दावा करीत असतात. पण त्यांनी कधीतरी गुरूजींची ही कथा वाचली आहे काय? किंवा त्यापासून बोध घेण्याचा प्रयास तरी केला आहे काय? असता तर त्यांनी नेमकी सानेगुरूजींना नको असलेलीच पत्रकारिता कशाला केली असती? अवघ्या देशाचे मला माहित नाही. पण आजच्या मराठी पत्रसृष्टीवर सेवादलीय लोकांचा मोठाच पगडा आहे. आणि त्यातून ज्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात, त्या आग विझवणार्‍या नसून आगीत तेल ओतणार्‍या असतील याची काळजी घेतली जात असते. किंबहूना राईचा पर्वत कसा करता येईल यासाठी अहोरात्र हातात भिंग घेऊन राई शोधत हे दिवटे फ़िरत असतात, हे आपण अनुभवत असतो. आणि असे करताना आपण सानेगुरुजींच्या भावना व विचार सातत्याने पायदळी तुडवतो, याची खंतही कोणाच्या चेहर्‍यावर दिसणर नाही.

   मला अचनक सानेगुरूजींची ही कथा गेल्या आठवड्यात आठवली. म्हणजे कंटाळा आला म्हणून मनोरंजनासाठी निखिल वागळेचा खुळेपणा मी बघत असतो. तर त्या दिवशी त्याने मनसेच्या आमदार प्रविण दरेकर यांच्यावर तोफ़ा डागण्याचा आवेश आणला होता. त्यात हा माणूस वेडगळ बोलण्याच्या नादात धडधडीत खोटे बोलू लागला, तेव्हा मला सानेगुरूजी आठवले. त्यांची स्वामी ही कथा आठवली. त्याच रात्री झोपण्यापुर्वी ते पुस्तक काढून आधी वाचले. मगच माझे समाधान झाले. मग मला दरेकर याच्यापेक्षा बिचार्‍या सानेगुरुजींचीच दया आली. दरेकरांपेक्षाही आज जे कोणी गुरूजींचे नाव घेतल्यावर हळवे होतात, त्या लोकांची अधिक कणव आली. कारण त्यातले बरेच निखिलला सेवादलीय समजतात. ज्याला आपण दैवत मानतो त्याच सानेगुरूजींच्या विचारांची अशी राजरोस पायमल्ली करणार्‍याचे कौतुक फ़क्त अंधभक्तांनाच असू शकते.

   त्या दिवशीच मला निखिलच्या आवेशातून गुरूजी का आठवले? तर नेमकी त्या दिवशी बहुतेक वाहिन्यांवर आणि वृत्तपत्रात गुरूजींनी वर्णन केलेली कृ्ती घडत होती. गुरूजी काय लिहितात? ‘ऐक्याचे व प्रेमाचे वारे पसरविण्याऐवजी वर्तमानपत्रे द्वेषमत्सराचे विषारी वारेच सोडत असतात. हिंदुमुसलमानांच्या दंग्यांची, तिखटमीठ लावून विषारी केलेली वार्ता वर्तमानपत्रे जगभर नेतात, आणि कोट्यवधि हिंदुमुसलमानांची मने अशांत केली जातात. आग नसेल तेथे आग उत्पन्न होते. प्लेग नसेल तेथे प्लेगाचे जंतु जातात. हिंदुस्थानची दैना झाली आहे तेवढी पुरे, असे या वर्तमानपत्रांना वाटत नाही. भडक काहीतरी प्रसिद्ध करावे, पैसे मिळावे, अंक खपावे हे त्यांचे ध्येय. मग भारत मरो कां तरो. समाजाला आग लागो की समाजाची राखरांगोळी होवो.’ निखिल वा अन्य वाहिन्या नेमके तेच करत होत्या ना?

   राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीत काही विधान केले होते. त्याला अवास्तव प्रसिद्धी देऊन ही माध्यमे व वाहिन्या काय करू इच्छित होत्या? तर त्यातून आग भडकावी. हिंसक प्रतिक्रिया यावी यासाठीच त्या विधानाला वारेमाप प्रसिद्धी दिली जात होती ना? आणि प्रसिद्धी देताना मुळच्या विधानाचा विपर्यास होईल याची पुरेपुर काळजी घेतली जात होती. उदाहरणार्थ, निखिलच्या कार्यक्रमात सहभागी झालेले बिहारचे आमदार व नितीशकुमार यांचे निकटवर्तिय देवेंद्र ठाकूर पुन्हा पुन्हा सांगत होते, की मुळात राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली; ती चुकीच्या बातमीवर केली आहे. बातमीच अफ़वा पसरवणारी आहे. बिहारच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्र सरकारला पत्र लिहून मुंबई पोलिसांनी बिहारमध्ये येउ नये व परस्पर कोणाला अटक करू नये असे कळवले आहे. आणि मुंबईचे पोलिस तसे वागले तर त्यांच्यावरच अपहरणाचे गुन्हे नोंदले जातील; अशी धमकी त्या पत्रात दिली आहे, अशी बातमी प्रसिद्ध झाली होती. राज ठाकरे त्यावर प्रतिक्रिया देत होते. पण मुळातच तसे पत्र बिहार सरकारने पाठवले नसेल तर ज्याने तसे छापले; ते वृत्तपत्र खरा गुन्हेगार आहे. पण त्याबद्दल कोणीच बोलत नव्हते. उलट त्या अफ़वेवर प्रतिक्रिया उमटली, त्यावरच कल्लोळ माजवला जात होता. आहेना गंमत? गुन्हा केला कुठल्या वृत्तपत्राने व पत्रकाराने. अफ़वा पसरवली त्या पत्रकाराने. त्याचा गळा पकडण्याऐवजी त्यावर प्रतिक्रिया देणार्‍यालाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जात होते. त्यासाठी राज्य सरकार राजवर कारवाई का करत नाही; असा जाबही विचारला जात होता. मग खरा जाब कोणाला विचारायला हवा होता?

   देशाचे नवे गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी अलिकडेच अफ़वा पसरवणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला होता. मग ज्या पत्रकाराने व वृत्तपत्राने ही अफ़वा छापली, त्याच्या विरुद्ध कारवाई का करत नाही; असा जाब शिंदे व राज्याचे गृहमंत्री यांना विचारला जायला हवा होता. पण असे कुठेच घडले नाही. ते राहिले बाजूला आणि निखिलकुमारांसह तमाम वृत्तपत्रे व वाहिन्या राज ठाकरे यांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभ्या करत होत्या. सानेगुरूजी यालाचा आगीत तेल ओतणे म्हणतात. देशबुडवेगिरी म्हणतात. आणि गुरूजींचे दुर्दैव असे, की त्यांच्याच संस्काराचे हवाले देणारे ते पाप आज करीत असतात. हा सगळा मामलाच गुन्हेगारी स्वरूपाचा होता. मात्र त्यातले गुन्हेगारच दुसर्‍या कुणा भलत्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरत होते. खोटे बोलण्यात कायबीइन लोकमतचा कोणी हात धरू शकत नाही. आणि निखिल वागळेला तर सत्याची शिसारीच येते. म्हणून त्याने त्याच कार्यक्रमात प्रविण दरेकर यांना खोटे पाडण्याचा प्रयत्न केला. अन्य राज्यात परप्रांतातून येणार्‍या कामगार स्थलांतरीतांची पोलिस नोंद करतात, असा दावा दरेकर यांनी केला होता. त्यासाठी त्यांनी एका कायद्याचाही संदर्भ दिला होता. पण ओरडा करीत निखिलने त्यांना खोटे ठरवले आणि दरेकर व राज ठाकरे खोटे बोलतात असा बेछूट आरोप केला. आणि म्हणूनच मला दरेकर शंभर टक्के खरे बोलतात याची खात्री पटली होती. दुसर्‍या दिवशी मी त्या सत्याचा शोध घेतला आणि निखिलसह कायबीइन लोकमतचा खोटेपणा चव्हट्यावर आला. तो मी मग लगेच इंटरनेतद्वारे फ़ेसबुकवर टाकला. त्याला नेटीझन्सकडून प्रचंद प्रतिसाद मिळाला.

   गेल्या मे महिन्यातच केरळच्या विधानसभेत कॉग्रेसप्रणित आघाडीचे गृहमंत्री राधाकृष्णन यांनी त्यांच्या राज्यात ६३,२०० इतक्या परप्रांतिय कामगारांची पोलिसांनी नोंद केली असल्याचे उत्तर दिले होते. ज्यांना हवे ते इंतरनेटवर त्या बातमीचा शोध घेऊ शकतात किंवा केरळ सरकारच्या दफ़्तरातली नोंद तपासू शकतात. म्हणजे तिथे त्या चर्चेत दरेकर खरे बोलत होते आणि ओरडा करून निखिल खोटेपणाचा आळ त्या सत्यवचन करण्यावरच घेत होता. अयोध्येतील राममंदिराचा निखिलला इतका तिटकारा का असावा; त्याचे उत्तर कदाचित त्याच्या अशा वृत्तीमध्ये सापडू शकते. राम हा सत्यवचनी होता आणि निखिलसह लोकमत वाहिनीला सत्याचेच वावडे आहे. म्हणजे स्थलांतरीतांची नोंद करणे हा घटनात्मक गुन्हा नाही, हे केरळच्या सरकारी कृतीने सिद्ध होते. मग राज ठाकरे यांच्य विरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्याचा आगह धरणारे काय देशप्रेमी म्हणायचे? ज्यांनी अफ़वा पसरवल्या त्यांना किंवा त्यांना पाठीशी घालणार्‍यांना काय राष्ट्रप्रेमी म्हणायचे? जेव्हा देशाच्या एकात्मकतेचे प्रतिक असलेल्या अमर जवान स्मारकाची अवहेलना व विटंबना झाली; तेव्हा मूग गिळून गप्प बसालेले निखिलसारखे शेळपट पत्रकार आणि नितीश, लालू, मुलायम, निरूपम किंवा आणखी जे कोणी असतील, ते राष्ट्रप्रेमी असतात काय? राष्ट्रीय स्मारकाच्या विटंबनेनंतर ज्यांची वाचा बसते, ते शुरवीर देशप्रेमी ही अजब व्याख्या झाली ना? सामान्य वाचक किंवा प्रेक्षक यांना मुर्ख वाटतो काय? नसेल तर इतके बेधडक खोटे व बिनबुडाचे आरोप करण्याची हिंमत यांना होतेच कशी? की त्यांना आगी लावणे, आगीत तेल ओतणे म्हणजे देशाची एकात्मता वाटत असते? निदान सानेगुरूजींची व्याख्या तरी तशी नव्हती.

   आता थोडे दुसर्‍या खोटेपणाकडे वळू. देशाचा कुठलाही नागरिक कुठल्याही शहरात व राज्यात जाऊ शकतो, असे दावे छती फ़ुगवून केले जातात. किंबहूना बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार त्यात खुपच आघाडीवर असतात. त्यासाठी ते उत्साहात भारतीय राज्यघटनेचा आधार घेत असतात. राज्यघटनेट्ने आणि बाबासाहेबांनी आम्हाला हा अधिकार दिला आहे, असा त्यांचा नेहमीचा दावा असतो. तो अधिकार काय एकट्या उत्तर भारतीयांना किंवा अबू आझमी व नितीशकुमार यांनाच मिळाला आहे? की प्रत्येक भारतीयाचा तो मूलभूत अधिकार आहे? जर तो सर्वांचा अधिकार असेल, तर बिहारमध्येही ज्या कोणा भारतीयाला जायचे असेल त्याला मुंबई इतकीच मोकळीक असायला हवी. इथे जी भाषा राज ठाकरे बोलतात, त्याचा निषेध करणार्‍या नितीशनी तरी तशी भाषा बोलू नये ना? त्याचे त्यांना सोयरसुतक असते काय? मुंबईत मनसे शिवसेनेने उत्तर भारतीयांनद्दल आक्षेप घेतले, मग राज्यघटना ज्यांना आठवते त्यांची ही घटना कधी कालपरवा उदयास आली आहे काय? की सहा दशकांपासून तिचा अंमल भारतात चालू आहे? असेल तर हेच नितीशकुमार गेल्या वर्षी कुठली भाषा बोलत होते? ती राज ठाकरे यांचीच भाषा नव्हती काय? की राज बोलले तर पाप व गुन्हा होतो आणि नितीश वा लालू, पास्वान बोलले मग पुण्य होते? गेल्या वर्षी नितीश काय बोलत होते आणि हेच निखिलसारखे पत्रकार कशाला त्यांची पाठ थोपटत होते? कुणाला आठवते काय?

   वर्षभरापुर्वी बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुकांचे वेध लागले होते. तेव्हा नितीशना मतदारांची मोठीच फ़िकीर होती. त्यामुळे आपल्या मतदार पाठीराख्यांच्या चिंतेने ग्रासलेले नितीश आपल्या मित्रपक्षालाच कुठल्या धमक्या देत होते? कोण आहे त्यांचा मित्रपक्ष? भाजपाने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना बिहारमध्ये आणता कामा नये, असा अट्टाहास कोणी चालविलेला होता? मोदींना बिहारमध्ये पाऊल टाकू देणार नाही, अशी भाषा कोण बोलत होता? ती भाषा राज ठाकरे यांच्यापेक्षा वेगळी आहे काय? दरेकरना दम देऊन राज ठाकरे कोण लागून गेलेत, असे विचारणार्‍या निखिलने त्याच कार्यक्रमात सहभागी झालेल्या बिहारी देवेंद्र ठाकूर यांना, हा सवाल कधी विचारला आहे काय? नरेंद्र मोदींना बिहार बंद करण्याची नितीश यांची भाषा कुठल्या राज्यघटनेत बसते? कारण राजने छटपूजेच्या निमित्ताने मुंबईत येऊ घातलेल्या नितीशनाही मुंबई बंद करू असे बजावले होते. तेव्हा नितीश म्हणाले होते, मुंबईत जायला व्हिसा लागत नाही. मग कुणा अन्य प्रांतातील भारतीयाला नितीशच्या बिहारमध्ये जायला व्हिसा लागतो काय? नसेल तर मोदींना बिहार बंद करण्याची भाषा त्यांनी का वापरली होती? आणि त्यांनी वापरली तेव्हा निखिल वा अन्य कुणा पत्रकाराने नितीशना जाब का विचारला नव्हता? की नितीश हा बिहारी व उत्तर भारतीय आहे म्हणुन त्यांना काहीही बरळण्याची राज्यघटनेने मुभा दिलेली आहे आणि मराठी नेत्यांनीच आपली भाषा वा शब्द तोलून मापून बोलावेत अशी राज्यघटनेत तरतूद आहे? नसेल तर यातला एकही माईका लाल पत्रकार तेव्हा नितीशच्या त्या बंदीच्या भाषेवर तुटून का पडला नव्हता? नितीश कोण लागून गेलेत, अशी भाषा निखिलसारख्या भडभुंज्याला का सुचली नव्हती?

   पुन्हा परिस्थिती उलटी दिसेल. तेव्हा त्याच भाषेसाठी व शब्दांसाठी हेच पत्रकार माध्यमे नितीशची पाठ थोपटत होते. त्यात नितीशचे कौतुक कशासाठी चालले होते? तर सेक्युलर माध्यमांच्या मनात नरेंद्र मोदींबद्दल अढी व द्वेष आहे. आणि माध्यमे ज्याचा द्वेश करतात, त्याला कुठलाही घटनात्मक अधिकार नसतो. त्यामुळे असे मोदी वा तत्सम भारतीयाचे घटनात्मक अधिकार पायदळी तुडवणार्‍याचे कौतुक होत असते. पण जेव्हा बाजू पलटते तेव्हा यांनाच राज्यघटना, मुलभूत नागरी अधिकार राष्ट्रीय एकात्मता अशा गोष्टी आठवू लागतात. अगदी स्पष्टपणे दिसेल असा हा भेदभाव आहे. एकीकडे समतेच्या गोष्टी करायच्या, सर्वांना समान न्यायाच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे प्रत्येक बाबतीत दुजाभाव दाखवायचा. राज हिंदी वाहिन्यांचा खेळ बंद करीन म्हणाले मग आविष्कार स्वातंत्र्यावर मोठाच हल्ला झाल्याचा कांगावा केला गेला. आणि जेव्हा ११ ऑगस्ट रोजी त्याच हिंदी वाहिन्यांच्या ओबी व्हॅन खरोखरच जा्ळल्या गेल्या, तेव्हा चकार शब्द त्यापैकी कोणी काढला नाही. म्हणजे बलात्कार झाला तर शब्द बोलायचा नाही आणि बघून घेईन म्हटले तर बलात्कार करून खुन पाडला असावा, इतका गदारोळ करायचा. इतका धडधडीत खोटेपणा चालू नाही काय?

   सानेगुरूजी खरेच किती द्रष्टे होते, त्याची यातून साक्ष मिळते. त्यांच्याच ‘धडपडणारी मुले’ या पुस्तकातील स्वामी या कथेतला उतारा मी आरंभी दिला आहे. त्यात त्यांनी सहा दशकांपुर्वी पत्रकारांचे अफ़वाबाज म्हणुन केलेले वर्णन किती सार्थ आहे त्याची जणु साक्ष देण्यासाठीच आजचे पत्रकार असे वागतात काय अशी शंका येते. पण त्याहीपेक्षा गुरूजींची दया येते, ती निखिल वा तत्सम त्यांच्याच राष्ट्र सेवा दलातील दिवाळखोर बेअक्कल मुले बघितल्यावर. आज गुरूजी असते आणि त्यांनी आपल्याच सेवा दलाचे संस्कार घेऊन निपजलेली अशी (समाजमनात विष कालवणारी) पिढी बघितली असती तर त्यांनी नवे पुस्तक त्यांच्यावर लिहिले असते व त्याला शिर्षक दिले असते, ‘तडफ़डणारी मुले’.
( प्रसिद्धी :प्रवाह, रविवार पुरवणी पुण्यनगरी ९/९/१२)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा