शनिवार, ५ जानेवारी, २०१३

दिल्ली आणि मुंबईत नेमका फ़रक कुठला?






   माणसाचे माणूसपण त्याच्या भावनिक गुंत्यामध्ये सामावलेले असते. त्या भावनांचा विसर पडला; मग तुम्ही मुळात माणुसकीलाच मुकत असता. मग तुमच्यापाशी किती हुशारी आहे किंवा तुम्ही किती बुद्धीमान आहात, त्याने फ़रक पडत नाही. तुम्ही माणसात रहायला नालायक असता. कारण समाज म्हणून जगणार्‍यांना एकमेकांच्या सहवासातच जगावे लागत असते आणि म्हणूनच परस्परांच्या सुखदु:खाशी समरस सुद्धा व्हावे लागत असते. त्यापासून दुरावलात तर त्या समाजाचे काही बिघडत नाही, तुमचेच अडत असते. हे सत्य अगदी कुठल्या खेड्यात जन्मलेल्या किंवा कुठलेही शिक्षण न घेतलेल्या अडाणी माणसालाही नेमके ठाऊक असते. म्हणूनच ती माणसे कितीही अडचणी व संकटावर मात करून समाज म्हणून टिकून रहातात. उलट स्वत:ला बुद्धीमान व हुशार समजणार्‍यांना आपल्या बुद्धीमत्तेची झिंग कधीकधी इतकी चढते, की आपल्यामुळेच जग अस्तित्वात आले अशा मस्तीत ते वास्तवाचे भान सोडून बरळू लागतात. सहाजिकच शहाणे असूनही हास्यास्पद ठरत असतात. आपण शहाणे आहोत आणि म्हणून उर्वरित जग मुर्खांचे आहे; असे भास त्यांना होऊ लागतात. मग सभोवतालचे सत्य दिसत असूनही बघायची इच्छाच त्यांना होत नाही. आणि बघायची इच्छाच नसली, तर दिसणार कसे आणि दिसत असून बघायची इच्छाच नसली, तर दिसूनही बघणार कोण? परिणामी अशा लोकांना सामान्य जनतेला दिसणारे व कळणारे सत्य बघता येत नाही की उमगत नाही. तरीही आपण सांगतो, तेच सत्य;काही  अशा थाटात हे शहाणे सांगू लागतात, आणि लोक त्यांच्याकडे मुर्खाची बडबड म्हणून बघू लागतात. राजदीप सरदेसाई नावाचा असाचे एक शहाणा आहे. दिड महिन्यापुर्वी त्याने असाच एक शहाणपणा कारण नसताना केला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मुंबईत निधन झाले आणि बघता बघता मुंबईचे व्यवहार थंडावत गेले. मुंबई त्यांच्या मृत्य़ूनंतर त्यांना आदर दाखवण्यासाठी बंद झाली. त्यावर शहाणपणा करताना राजदीपने ट्विटरवर लिहिले होते, ‘दिल्लीत नेता मेला तर भयाने किंवा आदराने शहर बंद होत नाही, मुंबई बंद होते, याचा अर्थ काय?’ 

   अनेक शिवसेनप्रेमींना त्याचा रागही आलेला होता. राजदीपलाही तेच हवे होते. आपण शिवसेनेला घाबरत नाही; हे दाखवण्य़ासाठीच त्याने असे डिवचणारे शब्द जाहिरपणे लिहिले होते. त्यातून नुसते शिवसैनिकांना डिवचणे एवढाच त्याचा हेतू नव्हता; तर मुंबईकरांना तुम्ही सेनेला घाबरता, अशी हेटाळणी सुद्धा करायची होती. त्यातून दिल्ली कशी राजकीय व सामाजिक पातळीवर समजदार लोकांचे शहर आहे; अशी शेखी सुद्धा मिरवायची होती. पण म्हणून ते वास्तव अजिबात नव्हते. जेव्हा आपल्याला प्रामाणिकपणे एखादा मुद्दा मांडायचा असतो; तेव्हा त्यातले वास्तव खोटे पडणार नाही, याची काळजी घ्यायला हवी असते. पण राजदीपचा हेतू शुद्ध नव्हता, की त्याच्या निर्बुद्धतेला कधी वास्तवाचे भान नसते. त्यामुळेच नसलेली अक्कल वापरून तोंडघशी पडण्यातच त्याला नेहमी धन्यता वाटत आलेली आहे. बहुतांश लोकांना आता अशा अर्धवटरावांच्या अकलेचा अंदाज आलेला असल्याने; कोणी त्यांच्या मुर्खपणाची सहसा दखल घेत नाही. पण लोकांचे काम कधीकधी परिस्थिती व नियती आपल्या हाती घेते. इथे राजदीपच्या बाबतीत नेमके तेच घडले. त्याच दिल्लीत जिथे नेता मेला म्हणून व्यवहार बंद होत नाहीत; तिथे महिनाभरात परिस्थिती अशी निर्माण झाली, की राजकीय नेते जिवंत आहेत, त्याचाच दुखवटा साजरा करण्यासाठी भयभीत दिल्लीकरांनी दोन आठवडे दिल्ली बंद करून टाकली. शिवसेनेच्या प्रभावाखालची मुंबई आणि सेक्युलर माध्यमांच्या लाड्क्या सोनिया गांधी व मनमोहन सिंग यांच्या प्रभावाखालची दिल्ली, यात नेमका कोणता फ़रक आहे; ते राजदीपसारख्या मुर्खांना कळावे म्हणून की काय नियतीने अशी परिस्थिती आणली. कुठला फ़रक आहे दिल्ली आणि मुंबईमध्ये?

   आपल्या नेत्याचे निधन झाले तर आपला त्राता कोण राहिला नाही, अशा भावनेने मुंबईची जनता व्यवहार बंद ठेवून रस्त्यावर येते आणि त्याला श्रद्धांजली वहाते. त्याचे नेमके उलट टोक दिल्ली आहे. तिथे गेले दोन आठवडे लोक रस्त्यावर उतरले आहेत, ते राजकीय नेते मेल्यामुळे नाही; तर जिवंत असून मुर्दाडासारखे वागत असल्याने. कसे उलटे टोक आहे ना? दिल्लीकरांना आपले नेते जिवंत आहेत; याचीच भिती वाटू लागली असून ते मरत नाहीत, याचे अतीव दु:ख झाल्याने रस्त्यावर उतरावे लागले आहे. दिल्ली बंद करावी लागली आहे. योगायोग कसा आहे बघा. दिल्लीत बलात्काराची घटना घडली त्याच्या नेमक्या एक महिना आधी, मुंबईत शिवसेनाप्रमुखांचे निधन झाले होते आणि जवळपास त्याच तारखेला डिसेंबरमध्ये दिल्लीतली घटना घडून प्रक्षोभ सुरू झाला. फ़रक एकच आहे. दिल्लीत कोणी नेता मेलेला नाही, तर जिवंत आहेत. लोकांचा प्रक्षोभ किंवा दु:ख कशासाठी आहे? नेते जिवंत आहेत म्हणूनच ना? पण हे वास्तव दिल्लीत बसून राजदीपला कधी कळणार आहे का? ही आजच्या आपल्या विद्वानांची दुर्दशा आहे. त्यांची लोकभावना व जनमानस यांच्याशी किती फ़ारकत झाली आहे; त्याचा अंदाज येऊ शकतो. लोक मुंबईत रस्त्यावर आले; तेव्हा दु:ख अनावर झाल्याने त्यांनी तसे केले, त्याचे भान अशा विद्वानांना नसते. आणि दुसरीकडे दिल्लीतही लोक खवळलेत कशाला; त्याचाही यांना थांगपत्ता लागलेला नाही. म्हणूनच दिल्लीतल्या नेताविहीन संतप्त जमावाला कोणी अराजक म्हणतो आहे, तर कोणी त्याला व्हायरस म्हणतो आहे. धावत्या बसमध्ये मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याने लोक भयभीत होऊन रस्त्यावर आले, तर लोक का चिडलेत, तेच ज्यांना कळत नाही, त्यांना माणसे तरी म्हणता येईल काय? आणि ज्यांना माणूस म्हणता येत नाही, त्यांची बुद्धी माण्ससारखी काम करणार कशी? मग ते अशी खुळ्यासारखी मते व वक्तव्ये करू लागतात व लिहू लागतात.

   आता जरा त्यांना बाजूला ठेवून देशाचे भावी पंतप्रधान म्हणून राजदीप ज्याचा अधुनमधून उल्लेख करतो; त्या राहुल गांधींची बुद्धीमत्ता तपासून पाहू. एकटा राजदीप नव्हे, कुमार केतकरांपासून अनेक विद्वान, राहुलमध्ये भावी पंतपर्धान बघत असतात. त्यांचे अशा बलात्काराबद्दल कुठले मतप्रदर्शन समोर आलेले नाही. पण समजा त्यांना मत व्यक्तच करायचे असते; तर ते काय म्हणाले असते? मुंबईतल्या बॉम्बस्फ़ोटानंतर त्यांनी त्याचा संकेत दिलेला आहे. अवघ्या दिड वर्षापुर्वी मुंबईत काही बॉम्बस्फ़ोट झाले होते. तेव्हा राहुल गांधी ओरिसात भुवनेश्वर येथे होते. त्यांनी त्या स्फ़ोटानंतर आपल्या गृहमंत्र्यांची पाठ थोपटली होती. ते म्हणाले होते, ‘देशातला प्रत्येक घातपात थांबवता येणार नाही. नव्याण्णव टक्के अशा घटना बंदोबस्त व जागरुकतेमुळे रोखण्यात आलेल्या आहेत. एखादा टक्का घटना घडायच्याच. त्या थांबवणे अशक्य आहे.’ हे राहुल गांधींचे तर्कशास्त्र आहे. त्यानुसार दिल्लीच्या बलात्काराबद्दल ते काय म्हणतील ते समजू शकते ना? देशातल्या ९९ टक्के महिला मुली सुरक्षित आहेत. एक टक्का महिलांवरचे बलात्कार होणारच. ते थांबवता येणार नाहीत. शंभर टक्के बलात्कार थांबवणे अशक्यच आहे. दिल्लीचे लोक रस्त्यावर त्याच कारणास्तव रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना अशा भावी पंतप्रधानाचीच भिती वाटू लागली आहे. कारण त्याच्या तर्कशास्त्रानुसार शंभरातल्या ९९ महिलांना सुरक्षित ठेवायचे असते आणि एकीवर बलात्कार झाला तर ते फ़ारसे मनावर घ्यायचे नसते. दिल्लीचे लोक त्यालाच घाबरले आहेत. त्यांना आपल्यावर असे लोक राज्य करतात आणि ते जिवंत आहेत, याचीच भिती वाटते आहे. असे लोक जिवंत व सत्तेवर असणे; म्हणजे राजरोस बलात्कार, अपहरण होणार याचीच हमी असणार ना?

   अर्थात राजदीपलाही अशाच राज्यकर्त्यांचे कौतुक आहे. त्याच्यासारख्या बहुतेक संपादक, पत्रकार, बुद्धीमंतांना हेच कायद्याचे राज्य वाटते. त्यामुळेच दिल्लीचे नागरिक एका सामुहिक बलात्काराने चिडून रस्त्यावर का उतरले, त्याचे या शहाण्यांना नवल वाटते आहे. तर ‘दिव्य मराठी’चे अग्रलेख लिहिणार्‍या शास्त्रींना असे चिडून रस्त्यावर येणे व्हायरस वाटतो आहे. त्याचा अर्थ काय घ्यायचा? बलात्कार होतच रहाणार आणि ते सहन करण्याची लोकांनी तयारी ठेवली पाहिजे. ती तयारी नसेल तर असे लोक म्हणजे अशी जनता सेक्युलर भारतात जगायलाच नालायक आहे. आता मग आपण माघारी मुंबईला येऊया. जेव्हा ठाकरे निधनानंतर राजदीपने ट्विटरवर आपली अक्कल पाजळली होती, तेव्हाच पालघर येथील एका मुलीने तसेच काही आपल्या फ़ेसबुकवर लिहिले होते. त्यातून कल्लोळ माजला तर भावना भडकवल्या म्हणून पोलिसांनी तिच्यावर गुन्हा नोंदवला होता. तेव्हा हेच तमाम विचारवंत पत्रकार संतप्त होऊन मैदानात कुठल्या भूमिकेतून उतरले होते? आपले मत व्यक्त करणार्‍या त्या मुलीच्या अविष्कार स्वातंत्र्याची सर्वांना फ़िकीर लागली होती. त्यावरून इतका कल्लोळ माजवण्यात आला, की त्याची दखल तात्काळ प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष अध्यक्ष न्या. मार्कंडेय कटजू यांच्यापासून केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्यापर्यंत तमाम लोकांना घ्यावी लागली होती. पालघरच्या एका मुलीच्या अविष्कार स्वातंत्र्यासाठी इतके हळवे झालेले हे तमाम सेक्युलर विचारवंत आणि पत्रकार; दिल्लीतल्या सामुहिक बलात्काराविषयी मात्र कमालीचे उदासिन आहेत. एका मुलीच्या अब्रूचे धिंडवडे निघाले व तिच्या जिवाशी खेळ खेळला गेला; त्या मुलीबद्दल संपुर्ण उदासिन असलेलेच लोक दुसर्‍या मुलीच्या भ्रामक मतस्वातंत्र्याचा बाबतीत मात्र कमालीचे हळवे होतात, हा विरोधाभास कोणी तपासून तरी बघितला आहे काय? असे का होत असते?

   ती शाहीन नावाची मुलगी फ़ेसबुकवर आरंभी काय म्हणते? ‘जगात रोजच माणसे मरत असतात, पण जग चालूच असते.’ याचा अर्थ काय होतो? जगात जी सात आठशे कोटी लोकसंख्या आहे, त्यापैकी कोणीतरी आज मेला असेल. तिच्या लेखी बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीला काहीही मोल नाही. अब्जावधी मानव प्राणीमात्राप्रमाणे तोही एक आहे. त्या दिवशी जगात हजारो मृत्यू झाले असतील. मग याचे कौतुक कशाला? असे तिला त्या आरंभीच्या विधानातून सुचवायचे आहे. ते समाजातील एका मोठ्या नव्हेतर प्रचंड लोकसंख्येच्या भावना दुखावणारे नाही काय? त्या मुलीचा बाप किंवा कोणी कुटुंबातला कोणी अगदी नैसर्गिक मृत्य़ुने मरण पावला असताना, कोणी तिला असे बोलले तर काय होईल? म्हणजे तिच्या घरात शोकाकुल वातावरण असताना शेजारी उभा राहुन वा तिला ऐकू येईल, अशा आवाजात कोणी असेच मत व्यक्त केले; मग तिची प्रतिक्रिया काय असेल? समजा कोणी तिथे जाऊन म्हणाला, ‘त्यात काय मोठे जगात रोजच माणसे मरतात, तुम्ही कशाला रडत बसला आहात, चला उठा कामाला लागा, जग चालुच असते ना?’ ही जी कोणी मुलगी आज अविष्कार स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा झालेली होती, ती असे तिला ऐकू येईल अशा सुरात बोलणार्‍याला हारतुरे देईल काय? की असे जो कोणी बोलेल त्याच्या अंगावर धावून जाईल? त्याच्यावर शिव्यांचा वर्षाव करील, की स्तुतीसुमनांचा वर्षाव करील? तिला असे बोलणार्‍याचे अविष्कार स्वातंत्र्य मान्य होईल काय?

   अशा मुलीला लोकभावना कळत नसते, समाजात जगताना आसपासच्या लोकांच्या भावनांची कदर करायची असते याचे भान नसते, त्यांना माणसे तरी म्हणता येईल काय? राहुल गांधी, राजदीप सरदेसाई, किंवा ही शाहीन यांच्या भाषा व विधानाचा गर्भितार्थ कोणी कधी गंभीरपणे समजून घेण्याचा प्रयत्न तरी केला आहे काय? त्यामागची प्रवृत्ती कधी आपण उलगडून बघितली आहे काय? त्यातली पाशवी वृत्ती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे काय? माणसामध्ये आणि पशूमध्ये एक अत्यंत मोलाचा व सुक्ष्म फ़रक आहे. माणूस हा सहभावनेने एकत्र वागणारा, जगणारा प्राणी आहे. पशू कळपात जगतात ते सहभावना किंवा सहवेदना म्हणून नव्हे; तर सुरक्षेची गरज म्हणून झुंडीने जगतात. पण बाकी त्या कळप वा झुंडीमधे त्यांचे वर्तन अत्यंत आत्मकेंद्री व स्वार्थी असते. एकमेकांच्या तोंडचा घास हिसकावून घेण्याची स्पर्धाच चालू असते. दुसरा जखमा वेदनांनी व्याकुळ झाला असतानाही, कळपातले त्याच्याकडे अत्यंत त्रयस्थपणे तुच्छतेने बघत असतात. कारण तो दुबळा असेल, जखमी असेल तर कळपाला आता त्याचा उपयोग उरलेला नसतो. नेमका याच्या उलटा प्रकार माणसामध्ये आढळतो. आपल्यातल्या जखमी, दुर्बळ गरजूसाठी माणसातले सबळ, सशक्त स्वत:च्या तोंडचा घास भरवून; त्याला जगायला मदत करत असतात. स्वत: झीज सोसून मरू घातलेल्या निकामी माणसाला, आप्तस्वकीयालाही जगवायला धडपडतात, कष्ट उपसतात. अडीअडचणी, गैरसोय सहन करतात, त्यांना माणसांचा समूदाय किंवा मानव समाज म्हणतात. त्याचा कुठला लवलेश या उपरोक्त विधानांमध्ये दिसतो काय? राजदीप, राहुल वा शाहीन यांची तीन विधाने मी मुद्दाम इथे नमूना म्हणून पेश केली आहेत. बाकीच्या तथातथित विद्वान, सेक्युलर व अविष्कार स्वातंत्र्यवाद्यांची अशी शेकडो विधाने व वाक्ये मी दाखवू शकतो. त्यात पाशवी उर्मटपणा, मुजोरी व अहंकार ओसंडून वहाताना दिसू शकेल. त्यात शिकारी श्वापदाच्या वृत्तीचा हिंस्र चेहरा बघता येईल. त्यात कुठेही मानवी भावनांचा लवलेश आढळून येणार नाही.

   तुम्ही कधी डिस्कव्हरी वा नॅटजिओ वाहिन्या बघत असाल तर त्यातल्या सिंहीणी, वाघीणी कशा आपल्या पिलांचा मायेचे चाटतांना दिसतील. पण जेव्हा झेब्रा, हरीण वा अन्य सावजाचे पिलू असेल, तर त्यावर हिंस्र आवेशात हल्ला करताना दिसतील. त्यापेक्षा अशा शहाण्यांचे वर्तन व मनोवृत्ती वेगळी आहे काय? ज्या तीन महनीय लोकांची वक्तव्ये मी इथे सादर केली आहेत, त्यांना कुठल्या संदर्भात माणसे म्हणायचे त्याचे उत्तर कोणाकडे आहे काय? माणूस म्हणून ज्या मूलभूत प्रेरणा किंवा प्रवृत्ती व जाणिवा असायला हव्यात; त्याचाच ज्यांच्याकडे अभाव आहे, ते आपल्याला माणूसकी व मानवी मूल्यांचे धडे शिकवू बघतात, हीच आजच्या बुद्धीवादी मुठभरांची शोकांतिका आहे. ते आपले माणूसपणच विसरून गेलेत किंवा गमावून बसले आहेत आणि तावातावाने मानवी समाजाच्या उत्थानाच्या गप्पा मारत असतात. त्यांच्या अशा वागण्यला प्रतिष्ठा मिळाल्यानेच समाजातील अमानुष विकृती सोकावत चालल्या आहेत. त्याचेच दुष्परिणाम मग दंगली, घातपात, बलात्कार व असहिष्णूता अशा स्वरूपात आपल्याला भोगावे लागत असतात. जेव्हा त्यांच्या अशा मुर्खपणाचा विपरित परिणाम समाजाला भोगावा लागत नसतो, तोपर्यंत त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य असते. पण जेव्हा त्यापासून समाजाच्या माणुसकीलाच काळीमा फ़ासली जाण्याचे परिणाम घडून येऊ लागतात, तेव्हा समाज टिकवण्यासाठी व सुरक्षित भवितव्यासाठी अशा प्रवृत्तीच्या मुसक्या बांधाव्याच लागतात. त्यांना स्वातंत्र्य म्हणजे उर्वरित करोडो, लाखो लोकांच्या जगण्याच्या स्वातंत्र्यावरची गदा असते.

   जे लोक गुजरातमधल्या सोहराबुद्दीन नामक एका गुंडाला पोलिसांनी खोट्या चकमकीत ठार मारले त्याच्या न्यायासाठी गेली आठ वर्षे आपली सर्व बुद्धी पणाला लावून ओरडा करीत आहेत; त्याच सेक्युलर माध्यमांना दिल्लीत एका निरागस, निरपराध मुलीवर अमानुष बलात्कारासाठी दोन आठवडे लोक रस्त्यावर येऊन न्याय मागतात, तो अतिरेक वाटतो, यातूनच त्यांच्या पाशवी मानसिकतेची प्रचिती येत असते. सामान्य जनता व नागरिक म्हणजे त्यांना त्यांच्या सेक्युलर प्रयोगशाळेतील मुकी जनावरे वाटतात. अन्यथा त्यांनी दिल्लीतल्या निदर्शनांना व्हायरस किंवा मुजोरांची मस्ती कशाला म्हटले असते? त्यांना शिवसेनाप्रमुखांच्या श्रद्धांजलीसाठी लोकांनी बंद पाळला तर कशाला पोट दुखावे? जेव्हा शिकारीत मारली जाणारे सामान्य प्राणी एकजुटीने श्वापदांच्या विरोधात जमा होऊ लागतात, तेव्हा त्यांना धडकी भरत असते, त्यातलाच हा प्रकार आहे ना? आजच्या बुद्धीवादी वर्गाचे हितसंबंध व स्वार्थ इथल्या एकूणच भ्रष्ट व्यवस्थेमध्ये सामावलेले आहेत. आणि म्हणूनच माध्यमातले संपादक, पत्रकार, त्यांच्याच पठडीतले विचारवंत, अभ्यासक प्रत्येक लोकचळवळी विरुद्ध कंबर कसून उभे रहाताना दिसतील. त्या लोकभावना व लोकचळवळीची हेटाळणी करताना दिसतील. प्रत्येक मानवी भूमिका व भावना-जाणिवेची टवाळी करताना दिसतील. त्यामागचा क्रुर हेतू समजून घेण्याची गरज आहे. सावजाने तक्रार करणे कुठल्या शिकारी श्वापदाला आवडू शकते? बलात्कारी गुंडाला तरी विरोध वा प्रतिकार करणारी महिला गुन्हेगारच वाटत असते ना? त्या बसमधील बलात्कारातला प्रमुख आरोपी काय म्हणाला? तिने प्रतिहल्ला चढवला म्हणून इतके घडले. त्याच्या या वाक्यात आणि सुजय शास्त्रीच्या ‘दिव्य मराठी’च्या अग्रलेखात नेमका कितीसा अरक आहे? दिल्लीतल्या आंदोलनाचे विरोधक बुद्धीचे बळ पणाला लावून प्रत्यक्षात कोणाचे समर्थन करत आहेत? बलात्काराचेच समर्थन करीत नाहीत काय? बलात्काराने, अन्यायाने चिडून उठण्याला त्यांचा आक्षेप आहे. म्हणजेच निमूट अन्याय अत्याचार सहन करा, असाच त्यांच दावा नाही काय? फ़्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी राजवाड्यावर चाल करून गेलेल्या मोर्चाला राजकन्या काय म्हणाली होती? ‘खायला पाव मिळत नाही? मग केक खा’, त्यापेक्षा आजच्या पत्रकार बुद्धीमंतांचे दावे वेगळे आहेत काय? राष्ट्रपती भवनाच्या दिशेने गेलेल्या निदर्शकांवर लाठीमार झाला, त्याचे समर्थन करणारे त्याच फ़्रेंच राजकन्येचे आप्तस्वकीय नाहीत काय? मुंबई व दिल्लीच्या जनतेमध्ये तसूभर फ़रक नाही. सामान्य जनता आणि भांडवली गुंतवणुकीने श्रीमंती आलेल्या श्वानवृत्तीच्या इथल्या मुजोर बुद्धीमंत पत्रकारांच्या जीवनमूल्यांमध्ये मोठा फ़रक पडला आहे.

२ टिप्पण्या:

  1. एकदा आपण स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेतलं की हिंदू, हिंदूत्व याच्यावर टीका करायला मोकळे होते असं बरखा, राजदीप, सागरिका, अर्नब यांना वाटत असावं. त्यांना जनक्षोभाच्या रोजच्या रोज मिळणा-या प्रतिक्रियांमुळे त्यांची वृत्ती गेंड्याच्या कातडीसारखी झाली आहे. कुणाच्याही चितेवर आपली पोळी भाजून घ्यायला ते तयार असतात.

    उत्तर द्याहटवा
  2. Excellent article as usual. Same Rajeep Sardesai had defended Dawood as 'Patriot' after the Mumbai riots in 1992-93. Please read the article "Patriots & Psychopaths" at the following link: http://www.mediacrooks.com/

    उत्तर द्याहटवा