मंगळवार, २९ सप्टेंबर, २०१५

दोन भयकथा आणि विवेकबुद्धीला आवाहन!

सगळी माणसे सारखीच हळवी, सौम्य किंवा हिंस्र असतात. मात्र त्यांच्यात खुप खोलवर दडलेल्या अशा सर्व प्रवृत्ती समोरच्या प्रसंग वा परिस्थितीनुसार उफ़ाळून बाहेर येतात. कार्यरत होतात. समोर कोण आहे? तो आपल्या कळपातला की विरुद्ध कळपातला, ही जाणिव छुप्या प्रवृत्तींना कार्यान्वीत करत असते. त्यातला आक्रमक आपल्या कळपातला असेल, तर त्याच्या हिंस्त्रपणाला टाळ्या पिटून प्रोत्साहन दिले जाते आणि त्यात जखमी जायबंदी होणारा आपल्या कळपातला असेल, तर हळवेपणाची उबळ येत असते. बाकी सगळीकडे तोच प्रकार असतो. चराअच दिवसांपुर्वी ‘चिन्ह’ मासिकाचे संपादक सतीश नाईक यांची एक भयकथा सोशल मीडियात अनेकांकडून पुढे करण्यात आली. ‘सनातन संस्था हिडीस आहे. तिचे समर्थक अतिशय विकृत आहेत. भारतीय राज्यघटनेचा गळा घोटणार्‍या कारवाया ते करीत आहेत’ अशा शब्दात माझे मित्र सुनिल तांबे यांनी त्याचे वर्णन केले आहे. त्यात नक्कीच तथ्य आहे. कथेतले वर्णन खरेच घाबरवून सोडणारे आहे. पण तशीच आणखी एक भयकथा आहे, त्याविषयी आजवर किती काटेकोर मौन पाळले गेले आहे? योगायोगाने नाईक ज्या समाजवादी कळपातले आहेत, त्याच कळपातले दुसरे संपादक (आज विधान परिषदेतील आमदार) कपील पाटील यांनी तशीच भयकथा १९९६ सालात संगतवार कथन केलेली आहे. (जुनी रद्दी शोधून त्या प्रदिर्घ भयकथेतील साधर्म्य असलेला उतारा पुढे दिला आहे. जुनेपाने शोधण्यात विलंब झाल्याबद्दल क्षमस्व). तेव्हा कितीजण व्याकुळ झाले होते? कोणी त्यातल्या हिडीस हिंस्र श्वापदाच्या मुसक्या बांधण्याचा विचार तरी केला होता काय? की आज हळवेपणाचे प्रदर्शन मांडणार्‍यांनी कायम त्याच हिंस्र श्वापदाला टाळ्या पिटून प्रोत्साहनच दिले आहे? दोन्ही कथा पाठोपाठ वाचून प्रत्येकाने आपल्यात शिल्लक असलेल्या सारासार विवेकबुद्धीनुसार निर्णय घ्यावा. शक्य असल्यास आपल्यातल्या माणूसकीला साकडे घालावे आणि कळपाच्या बाहेर राहून आपण विचार करू शकतो किंवा जगाकडे पाहू शकतो काय, असा प्रश्न स्वत:लाच विचारावा. बघा जमते काय आणि किती?

----------------------------------------------
कपिल पाटील यांची भयकथा

 फ़ॉरेन फ़ंडींगवरून आठवलं, दिनू रणदिवेंचा उल्लेख वागळेंनी ‘कॅलिडोस्कोप’मध्ये केला आहे. प्रश्न विचारून वाचकांच्या मनात संशय निर्माण करण्यात वागळेंचा हात कोण धरणार? पण संयुक्त महाराष्ट्राचे एक शिल्पकार असलेल्या दिनू रणदिवे यांना वागळे यांनी जी अपमानास्पद वागणूक दिली आणि अपशब्द वापरले ते ऐकले की डोळ्यात पाणी येतं. रणदिवे यांच्याच तोंडून मी ते ऐकलं आहे. रणदिवे स्वत:विषयी फ़ार बोलत नाहीत. पण वागळेंच्या परवाच्या लिखाणानेते घायाळ झाले.

वसई विधानसभा निवडणूकीत रणदिवे यांनी विवेक पंडीत यांच्या विरोधात पत्रक काढलं होतं. पंडीत स्वयंसेवी संस्थेसाठी परकीय मदत घेतात. हा रणदिवेंचा आक्षेप होता. मीही विवेक पंडीत यांचा प्रचार केला आहे. पण रणदिवेंचा मुद्दा बिनतोड होता. हे मला सांगितलं पाहिजे. मी त्यावेळीही त्यांच्याकडे कबुली दिली होती. पण या पत्रकाने वागळेंच डोकं फ़िरलं. त्यांनी रणदिवेंना फ़ोनवर फ़ोन करून अक्षरश: छळलं. त्यांची टिंगलटवाळी केली. रणदिवे नंतर ‘आज दिनांक’साठी लिहू लागले. त्यांचा पहिला लेख आमच्याकडे येताच वागळेंनी त्यांना फ़ोन करून त्यांच्यावर अपशब्दांची बरसात केली. रणदिवे ‘आज दिनांक’मध्ये लिहीताच भ्रष्ट ठरले होते. त्या फ़ोनच्या वेळी मी नेमका रणदिवेंना घरी भेटायला गेलो होतो. फ़ोनवर बोलत असताना रणदिवेंचं वृद्ध शरीर अक्षरश: थरथर कापत होतं. त्यांच्या पत्नीही घाबरून गेल्या होत्या. माझ्या पोटातही गोळा उठला होता. रणदिवेंना आता काही होतं की काय अशी आम्हा दोघांना भिती वाटली. फ़ोन खाली ठेवताच रणदिवे खाली कोचावर कोसळलेच. चहा प्यायल्यावर ते थोडे सावरले. तो प्रसंग आठवला की आजही माझ्या अंगावर काटा उभा रहातो. इथं सांगितलं पाहिजे की, वागळेंची ‘साप्ताहिक दिनांक’मधून अचानक हाकालपट्टी झाली तेव्हा रणदिवेंनीच विश्वस्तपदाचा राजिनामा दिला होता. ‘महानगर’साठी रणदिवे पहिल्या दिवसापासून लिहीत होते. त्यांची वागळेंनी अशी गत केली.

(दै. ‘सांज दिनांक’ संपादक कपील पाटील, अबीर गुलाल, शनिवार ९ नोव्हेंबर १९९६)
----------------------------------------
सतीश नाईक यांची भयकथा ( समोर आली तशी)

Sunil Tambe
September 26 at 10:31am ·
सनातन संस्था हिडीस आहे. तिचे समर्थक अतिशय विकृत आहेत. भारतीय राज्यघटनेचा गळा घोटणार्‍या कारवाया ते करीत आहेत.

Sanket Kulkarni
काही महिन्यांपूर्वी एक मित्र म्हणाला, ज़रा जपून बोलत जा. परवा एका मिटिंगमध्ये तुझं नाव घेतलं गेलंय. ते काय असतं, हे या सतीश नाईकांच्या लेखातून अनुभवा.
आपल्या समाजाच्या पोटात काय ट्यूमर वाढतोय हे लक्षात येईल.

------------------------
सनातनी येती घरा…
------------------------

'नग्नता: चित्रातली आणि मनातली…' अंक प्रसिद्ध व्हायचा होता.त्याचं काम रितसर सुरु होतं.फेसबुकचा वापर करून त्या अंकाची गुणवैशिष्ट्यं जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहचवता येतील या दृष्टीने अंकांची सारी टीम काम करीत होती.जे आम्ही करीत होतो त्याला छान प्रतिसाद मिळत होता.

असाच एक दिवशी सायंकाळी फोन वाजला. कुणी बाई बोलत होत्या.मी अमूक तमूक बोलतोय, ठाण्यातूनच बोलतेय.असं असं माझं नाव (ते नावही आता मी विसरून गेलोय.) असा असा माझा मुलगा पुण्याच्या एका आर्ट स्कूलमध्ये शिकतो.त्याला आता जेजेत प्रवेश घ्यायचाय तर त्यासाठी तुमचं मार्गदर्शन हवंय वगैरे… त्या बाई सांगत होत्या.

असे फोन वारंवार येत असतात.आणि त्यांना मी नेहमीच मला जमेल तसे योग्य ते मार्गदर्शन करतो आणि माझ्या कामाला लागतो.तसं मी ते केलं आणि फोन खाली ठेवला.मी हा प्रसंग विसरूनदेखील गेलो.पण त्या बाई बहुदा ते विसरल्या नसाव्यात.त्यांनी दोन-तीन दिवसांनी पुन्हा फोन केला,म्हणाल्या तुम्ही सांगितलं ते पटलंय. पण मला आणखी थोडं जाणून घ्यायचंय. मी तुम्हाला येवून भेटू का ? खरं तर या गाठी-भेटी प्रकरणांचा उबग येवूनच मी मुंबई सोडायचा निर्णय घेतला होता आणि या बाई आता भेटायला यायचं म्हणतायत, तर मी जरासा कावूनच गेलो.पण मग विचार केला आपल्या सल्ल्यामुळे कुणाचं जर भलं होत असेल तर आपण कशाला अडवा ? असा विचार करून काहीशा अनिच्छेनंच त्यांना म्हणतो की ' या ' पण ते ' या ' म्हणताना ' अहो पण मी शहरापासून लांब राहतो,भिवंडी वगैरे आमच्या इथून जवळ आहे ' असं सांगायला देखील विसरलो नाही.तर यावर त्या बाई म्हणाल्या काही हरकत नाही मला चालेल.आता यावर आपण काय बोलणार ? मी आपलं मुकाट्यानं त्यांना पत्ता देवू लागलो तर त्या म्हणाल्या ' नाही,नको ! आहे मजजवळ ! ' हे ऐकलं अन मात्र मी जरासा चक्रावूनच गेलो.आपला नवा पत्ता आपण अजून जवळच्यादेखील कुणाला दिला नाहीये आणि या अपरिचित बाईजवळ तो आला तरी कसा ? अशी एक शंका मात्र माझ्या मनात उभी रहिली.पण कामाच्या गडबडीत ती कडे माझं जरासं दुर्लक्षच झालं.फोन ठेवताना त्या बाई अमूक दिवशी अमूक वाजता येणार आहे.आणि हो सोबत दोन-तीनजण माझेच नातेवाईक येणारेत तर चालेलना ? त्यांनाही तुम्हाला शिक्षणाबाबत काही विचारायचं आहे वगैरे.मी म्हटलं ठीक आहे या !

एके दिवशी सकाळी….मी काम करीत बसलो असताना.बायको काहीशी भांबावून दोन मजले चढून वर आली. ही एवढी दोन जिने चढून वर आली म्हणून मी जरा अचंबीतच झालो,तर ती म्हणाली कुणी एक बाई तुला भेटायला आलीये,तू वेळ दिली होती म्हणतायेत.मी म्हटलं हो. बसव त्यांना खाली,मी आलोच,तर ती म्हणाली अरे पण त्यांच्या सोबत चार पुरुषदेखील आहेत.आणि सगळे कपाळावर लाल टिळा लावलेले आहेत.मला काही त्यांचं लक्षण बरं वाटत नाहीये.तू आधी खाली चल.

हातातलं काम तसंच बाजूला ठेवून मी खाली आलो तर घरातल्या चारीच्या चारी खुर्च्या भरलेल्या अन दिवाणावर त्या बाई बसलेल्या.काही तरी वेगळं जाणवलं खरं पण काय ते नेमकं मला सांगता येईना आणि समोर हे असे पाच जण बसल्यानं मला त्यावर विचारही करता येईना.

नमस्कार, चमत्कार झाल्यावर त्यांना जे काही कलाशिक्षणाविषयी सांगावयाचं होतं किंवा जे काही ' मार्गदर्शन ' वगैरे करावयाचं होतं ते मी केलं आणि चहापान झाल्यावर उठू लागलो तर त्यातले एक टिळेधारी ' चिन्ह ' च्या आगामी अंकाविषयी विचारू लागले.मी आपला मोकळेपणानं त्यांना माहिती देवू लागलो.मग आणखी एका टिळेकरांनी त्या संभाषणात भाग घेतला.आणखी एक प्रश्न,उपप्रश्न.आणखी एक टिळेकर त्यात सहभागी,असं करता करता चर्चा-वादविवाद कधी सुरु झाला ते मला कळलंच नाही.

आर्ट कॉलेजवरून ही चर्चा आता थेट ' चिन्ह ' च्या लेखावर येवू पाहत होती.मी जरासा सावध झालो.मग प्रश्न आला अंकात काय काय आहे ? मी सांगितलं असं असं आहे.तर त्यातला एक टिळा म्हणाला आणखी काय आहे ? मी मनात म्हटलं ' हे काय आपली उलट तपासणी घेतात की काय ? मी त्यांचा टिळा पाहून मुद्दामच संभाषणात हुसेनचं नाव घ्यायचं ठरवलं आणि तसं वाक्य टाकलंही.तर अपेक्षेप्रमाणे एक गदाटोळ उठलाच.

हुसेन नाव घेताच.ते चारी टिळे आणि ती टिळा झणझणलेच.त्यातला एक टिळा म्हणाला आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ती हुसेनचा लेख अंकात छापू नका ? मी मनातल्या मनात म्हटलं,आयला,हे मार्गदर्शन घेता घेता थेट शहाणपणाच शिकवायला लागले की.मी ठरवलं आता यांना अंगावर घ्यायचंच.आणि घेतलंही.

का ? का ? का हो का ?
तर एक टिळा म्हणालं ' तो ' हिंदूंच्या विरोधी आहे.दुसरा म्हणाला,त्याने हिंदू देवतांचा अपमान केलाय.तिसरा म्हणाला,त्याने सरस्वती नग्न चितारलीये !
वगैरे…वगैरे…वगैरे….
वगैरे…वगैरे…वगैरे….
वगैरे…वगैरे…वगैरे….

आता त्यांच्या टिळ्यामागचं रहस्य हळू हळू माझ्या लक्षात येवू लागलं होते.मग मी थेटच विचारलं की तुम्ही कोण ? तर म्हणाले ' आम्ही असं असं करतो तसं तसं करतो. हिंदू धर्माच्या प्रसाराचं आणि रक्षणाचं काम करतो.म्हणूनच तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्या अंकात हुसेनवाला लेख छापू नका.बाकी तुमच्या अंकाविषयी आमचं काही म्हणणं नाही.फक्त हुसेनवरचा लेख छापायचा नाय ?
आता माझी सटकू लागली होती.
मी विचारलं ' ही विनंती की धमकी ? '
तर एक टिळा म्हणाला ही विनंती आहे पण…

तर मी म्हटलं
' मी स्वतंत्र भारताचा नागरिक आहे.'
मी भारतात राहतो,पाकिस्तानात रहात नाही.मला माझ्या घटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क बहाल केला आहे.त्याला तडा जाईल असं कोणताही कृत्य मी करणार नाही.मी लेख छापणार ! तो माझा हक्क तर आहेच पण अधिकारदेखील आहे.आणि माझा अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये कुणी अशी लुडबुड केली तर ते मला चालणार नाही.मी ते खपवून घेणार नाही.
संपादक म्हणून,लेखक म्हणून,चित्रकार म्हणून आणि माणूस म्हणून घटनेनं मला जे अधिकार दिलेत ते मी बजावणारच.

तर ते तिघेही म्हणाले ' हे फायनल ?'
मी ठामपणे म्हणालो,होय,हे फायनल
जाता जाता म्हणाले…पहा विचार करा !
मी म्हटले ' नाही ! '
हे असं उत्तर देताना मला ठाऊक नव्हतं की नंतर काही होईल किंवा होणार आहे.तसा विचारही माझ्या मनात डोकावला नाही.

आणि बरंच काही मी बोललो.
जवळ जवळ तीन-साडेतीन तास ते घरात होते.हे सर्वच लिहायचं तर त्याचं एक पुस्तकच होईल.म्हणून सारांशानंच हे देतोय.

मी नंतर माझ्या कामात गढूनदेखील गेलो.

दुसऱ्या दिवशी सोमवार होता.
सकाळी फिरून आलो तर फोन वाजू लागलेला.

' कोण नाईक बोलताय का ?'
'होय बोला !'
मी अमूक तमुक बोलतोय,काल आमची ठाण्यात मिटींग झाली.आमची माणसं तुमच्याकडे आली होती.त्यांना तुम्ही उद्दाम उत्तरं दिलीत.अपमान केलात.आज आमची मिटींग आहे.त्यात ठरेल काय करायचं ते ? समजेल तुम्हाला लवकरच.' बरं ओके ' असं म्हणून मी फोन ठेवून दिला.

नंतर काही वेळाने आणखी एक फोन आला ' कोण नाईक का ?'
होय बोला.
' अरे तुम्ही हिंदू ना,तुम्हाला आपल्या धर्माची जरादेखील चाड नाही.'
म्हटले हे सारं तुम्हाला कोणी सांगितलं ! तर तो माणूस म्हणाला ' सनातन प्रभात ' मध्ये वाचा अगदी हेडलाईन आलंय.
जास्त माज करू नका !

आता मात्र माझी सटकली.तोपर्यंत शांत राहू पाहणारा मी उसळलोच. प्रचंड आवाज चढवला.आणि त्या माणसावर तुटूनच पडलो.तर तो तितक्याच शांतपणे (हे बहुदा त्यांना त्यांच्या साधनेत शिकवलेलं असावं.) मला उत्तरं देत राहिला.मग आणखी एक फोन आला,मग दुसरा आला,मग तिसरा,मग चौथा,पाचवा,सहावा,सातवा,सत्ताविसावा,सत्तेचाळीसावा,सत्तावनावा वगैरे वगैरे
पहाटेपासून रात्री मध्यरात्रीपर्यंत कधीही फोन वाजे.आणि मग यथेच्छ गालीप्रदान सुरु होई.बाई,पुरुष,वृद्ध,तरुण साऱ्यांचेच फोन येत होते.बापरे साऱ्यांचीच भाषा एकच,भयंकर शिवराळ,अत्यंत अर्वाच्य शिव्या (हेही बहुदा साधनेतलंच असावं.)आणि नको नको ते बोलणं.आधी आधी मी रोखठोक उत्तर देवू लागलो मग माझ्या लक्षात आलं की असं करण्यानं आपण आपलीच शक्ती आटवणार आहोत.यात काहीच अर्थ नाही.शहाणपणा नाही.

मुंबई,नवी मुंबई,रायगड,गोवा,सांगली ,इचलकरंजी,कोल्हापूर,कर्नाटक कुठून कुठून फोन येत होते. सारेच्या सारे गालीप्रदान करणारे,काय बोलतोय ते ऐकूनच न घेणारे,धमक्या देणारे,बघून घेवू म्हणून दरडावणारे.मीच नाही तर माझी पत्नी,वृद्ध आई-वडील यांचा देखील उद्धार करणारे.बापरे ! आताही ते आठवलं की अंगावर काटाच उभा राहतो.सारं घर डिस्टर्ब झालं होतं.
मग नंतर कळलं ते असं की,ते जे टिळाधारी आले होते त्यांनी ते सारं 'सनातन प्रभात'
या त्यांच्या वृत्तपत्रात तिखट मीठ लावून छापून आणलं होते.त्यांनी माझे सारे फोन आणि ई मेल इतकंच नाही तर मी ज्या घरात तात्पुरता रहात होतो त्या घराचा पत्तादेखील दिला होता.त्यामुळे ते फोन मला येत होते.ते फोन कमी पडले म्हणून की काय मग भयंकर भयंकर SMS देखील येवू लागले.तेही कमी पडतील असं वाटून मग त्यांनी माझ्यावर ई मेल्सचा देखील मारा सुरु केला.

ती बातमी त्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर देखील टाकली होती.त्यामुळे भारताच्या विविध राज्यातूनच नाही तर जगातल्या विविध देशातून मला ई मेल देखील येवू लागले.हे कमी पडेल का काय असं वाटून अत्यंत घाणेरडी पोस्टकार्ड देखील मला येवू लागली.जवळजवळ ८-१५ दिवस हेच सारं चालत होतं.

ज्यांनी हे केलं होतं त्यांना विचारावं तर ते फोन घेईनाच.दुसऱ्या फोन वरून फोन करून फोनवरच हासडलं तर त्यातल्या एकानं माझ्याविरुद्ध डोंबिवली पोलिस स्टेशनात जावून तक्रार केली,का मी त्यांना धमकी दिली म्हणून.तिकडून मला फोन - भेटायला या,अशी अशी धमकी तुम्ही दिलीय म्हणून. म्हटलं ' नाही येणार काय करायचे ते करून घ्या ! '

आता माझ्या लक्षात आलं की हे प्रकरण आपल्याला वाटतंय तेवढं हे प्रकरण सोपं नाहीय.याला अनेक कंगोरे आहेत.आणि ही आलेली लोकं पण काही सरळ नाहीत.म्हणून मी ज्या पोलिस ठाण्याच्या कक्षेत आमचं गाव येतं त्या नारपोली पोलिस स्टेशनात रितसर तक्रार नोंदवली.पो.ऑफीसर ताठे. मोठा छान माणूस निघाला त्यांनी सारं ऐकून घेतले.म्हणाले ' काळजी करू नका.आम्हाला ठाउक काय ते कोण आहेत ते ! गडकरीमध्ये बॉम्बस्फोट केला होता तेच हे असणार.त्यांच्यावर आमचं लक्ष आहे.काही काळजी करू नका.त्यांनी लागलीच हाताखालच्या माणसांना सूचना दिल्या.तक्रार करून मी घरी परतेपर्यंत घरी दोन पोलिसदेखील येऊन गेले.म्हणाले,काळजी करू नका.आम्ही आहोत.

त्याच दिवशी रात्री ठाण्याच्या कुठल्यातरी पोलीस स्टेशनातून फोन आला.कुणा तरी एका बाईनं तुमच्याविषयी तक्रार केली आहे की,तुम्ही तिचा अपमान केला.तिला धमकी दिली,तिला वाईट वागणूक दिली वगैरे.काय म्हणणं आहे तुमचं ? म्हटलं त्यांनी विनयभंगाची वगैरे तक्रार तर नाही ना नोंदवली ? तर तो पोलीस हसायलाच लागला,म्हणाला नाही ! तर त्यावर मी सुटकेचा मोठा निश्वास टाकला.आणि त्याला प्रश्न केला की हे सारं मी कुठं केलं ? तिच्या घरी केलं की माझ्या घरी ? की सार्वजनिक स्थळी केलं ? याची पण नोंद केलीय का ? तर तो पोलीस आणखीनच जाम हसायला लागला.म्हणाला पाहतो मी सारं ! नावं देवू का त्यांची आणि फोन नंबर उपयोगात येतील नंतर,म्हटलं नको ! गरज नाही त्यांची.

फोन तर येतच होते,ई मेल येतच होते.शिवाय पत्रेही येतच राहिली.आठ-पंधरा दिवस हे सारं चाललं.मग हळू हळू थांबलं.

' चिन्ह ' चा तो ' नग्नता ' विशेषांक नंतर रितसर प्रसिद्ध झाला आणि गाजलादेखील त्यात तो हुसेनवरचा लेख होताच.दुर्देवानं नंतर काही दिवसातच हुसेन यांचं निधन झालं.त्यामुळे त्या लेखाचा उत्तरार्ध कोलते सरांनी लिहायलाच हवा असा मी त्यांना आग्रह केला आणि त्यांनी तो मानलादेखील.तो उत्तरार्धदेखील त्या अंकात मी प्रसिद्ध केला.तो लेख तर खूपच गाजला.हे सारं आठवलं ते पानसरेंच्या हत्या प्रकरणात,कुणा समीर गायकवाड नावाच्या माणसाला पोलीस अटक केलीय ही बातमी वृत्तवाहिन्यांवर ऐकली तेव्हा आणि साऱ्या बऱ्या वाईट आठवण्यांना उजाळा मिळाला.

आता हे सारं आठवून लिहिताना मजेदार वाटतंय पण तेव्हा त्या अर्वाच्य फोननी अक्षरशः हैराण करून टाकलं होतं.बोलणारे समोर आले असते तर कदाचित त्यातल्या एखाद्याच्या गळा दाबायलादेखील मी प्रवृत्त झालो असतो की काय असं मला तेव्हा सारखं वाटे.निम्म्याहून अधिक फोन कॉल्स हे महिलांचे होते.बापरे ! काय त्यांची भाषा होती.माझी पत्नी आणि वृद्ध आई वडील यांच्याविषयी त्या महिलांनी काढलेले उद्गार हे फोनमधून महिलांसारखाच आवाज येत होता म्हणून महिलांचे मानायचे,अन्यथा…. असो.इंद्रायणी मुखर्जी प्रकरणाआधी स्त्रीयांमधल्या हिंन्स्त्रतेचा मी पाहिलेला तो पहिला अविष्कार असावा.

रात्री झोपेत कधी मला दचकून जाग येई.फिरायला गेलो असताना आपल्याला कोणीतरी लाठ्याकाठ्या,तलवारीनं किंवा गोळी मारली आहे आणि आपण कोसळलो आहोत.आणि आपला कुत्रा ते पाहून घाबरून घराकडे एकटाच धावत सुटलाय असे काहीतरी विचित्र भास होत.दाभोलकर,पानसरे प्रकरणं नंतर झाली,पण तेव्हा मात्र मला असे काही तरी विचित्र भास होऊन दचकून जाग देखील येई.

' आमचं लक्ष आहेच पण घरातून बाहेर पडताना योग्य ती खबरदारी घ्या.माथेफिरू लोकं आहेत ' अशा पोलिसांच्या सूचना होत्या.त्यामुळे योग्य ती खबरदारी घेत होतो.माध्यमांमधून या प्रकरणाला नक्कीच प्रचंड प्रसिद्धी मिळाली असती,पण तो मोह देखील मी टाळला.कारण त्यामुळे मी अंकांच्या निर्मितीच्या कामावर परिणाम झाला असता.कदाचित गेल्या शतकातल्या पहिल्या ठरू शकणाऱ्या ' नग्नता ' सारख्या धाडसी विषयावरच्या अंकाच्या प्रकाशनाला आडकाठीदेखील येऊ शकली असती.आणि ते मला होऊ द्यायचं नव्हतं.मुख्य म्हणजे तो हुसेनवरचा तो लेख मला काहीही करून छापायचाच होता.आणि मी तो लेख छापलाच.
काहीही घडलं नाही.पुढं घडणार देखील नव्हतं हे मला ठाऊक होतं.कारण तसं पाहिलं तर तो लेख हुसेन यांच्यावर एक प्रकारे टीका करणारच होता.पण मी हे त्यांना का सांगू ?त्यांची ही असली सेन्सरशीप का मानू ? कोण लागून गेले ते ?
अरे हट….

या साऱ्या गदारोळात आपण डगमगलो नाही, वा घाबरलोही नाही किंवा गांगरूनदेखील गेलो नाही.
ताठ राहिलो.अन्य कुणाला वाटो न वाटो पण याचा माझा मलाच अभिमान वाटतो.

सतीश नाईक
संपादक ' चिन्ह '

४ टिप्पण्या:

  1. घरी येवून दम दिला, अंगावर आले टाईप मध्ये जे लिहले आहे तेवढे जरा अतिशयोक्ती चे वाटते. मिटिंग मध्ये ठरेल टाईपची धमकी हि खोटी वाटते. बाकी प्रसंग योग्य आहे. अतिशयोक्ती टाळली असती तर जास्त चांगले झाले असते.

    उत्तर द्याहटवा
  2. भाऊराव,

    जेव्हा सतीश नाईक सनातनचा नसलेला बागुलबुवा उभा करतात तेव्हा तो उर्वरित समाजाला एक गर्भित इशारा असतो. नाईकांना खरे बॉम्ब फोडून निरपराध्यांचे जीव घेणाऱ्या अतिरेक्यांवरून दुसरीकडे लक्ष वळवायचं असतं. त्यासाठी नकली बॉम्ब फोडणारे कुणीही चालतात. स्वत:चं म्हणणं खरं ठरावं या हट्टापायी सतीश नाईक नीतिमत्ता गुंडाळून ठेवत आहेत. मग निरपराध लोकांचं रक्त सांडलं तरी त्यांना चालेल. जोवर त्यांना स्वत:ला भोगावं लागत नाही तोवर त्यांचा निर्लज्जपणा चालूच राहणार आहे.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    उत्तर द्याहटवा
  3. गडकरी बॉम्बस्फोट हे बॉम्बस्फोट नव्हते. दिवाळीतील लक्ष्मी तोटे आणि सुतळीबॉम्ब बॉम्ब फोडणे म्हणजे बॉम्बस्फोट नव्हेत . पण एकदा अतिशयोक्ती अलंकार वापरायचाच असे ठरवले कि नुसती टाळी वाजवली तरी ते म्हणणार कि अणुबॉम्ब चा स्फोट केला .

    उत्तर द्याहटवा
  4. या पोस्ट ला सोडून पण विषयाला धरून काहीसे --- नो उल्लु बनाविंग ----- सनातन ने स्पष्ट आरोप केलाय कि १.५ कोटी रुपयासाठी श्याम मानव ने दाभोलकरांना मारलेय आणि तसे पुरावे आहेत. मग मानव सनातन विरुद्ध बदनामी ची फिर्याद करायचे सोडून भलतेच संमोहन वगैरे काय बरळत आहेत. सरळ पोलिसात कोर्टात तक्रार का करत नाहीत???? सनातन ने मुलींना पळवले म्हणतात तर पोलिसात तक्रार का करत नाहीत ??? ज्या मडगाव बॉम्बस्फोट चा उल्लेख वारंवार केला जातो, त्या स्फोटाच्या आरोपातून सनातनच्या साधकांना कोर्टाने निर्दोष सोडलेय हे का सांगितले जात नाही ??? त्या कोल्हापूरच्या गायकवाड विरुद्ध कोणते पुरावे आहेत ??? भाजी कापायचे ३ चाकू ??? मडगाव स्फोटातील कोर्टाने निर्दोष सोडलेल्या व्यक्तीशी संभाषण ??? २३ सिमकार्ड ??? ( गायकवाड चे मोबाईल चा व्यवसाय आहे ) .

    उत्तर द्याहटवा