शनिवार, २२ नोव्हेंबर, २०१४

आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी



ज्यांचे वय देखील शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीपेक्षा कमी असेल, अशा लोकांनी या नेत्याबद्दल बोलताना कोलांट्याउड्या असा शब्द वापरला, मग माझ्याही मनाला यातना होतात. कारण पवाराची राजकीय कारकिर्द आणि माझी पत्रकारिता जवळपास एकाच वेळी सुरू झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार, हे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धाने महाराष्ट्राला दिलेले दोन मोठे नेते होत. त्यांच्याच प्रभावाखाली गेल्या साडेतीन दशकात महाराष्ट्राने वाटचाल केली. त्या दोघांची तुलना होऊ शकत नसली, तरी त्यांच्यातले विरोधाभास त्यांच्या मैत्री इतकेच चमत्कारिक कोडे आहे. एकाने सतत सत्तेच्या छायेत राहून आपला प्रभाव पाडला; तर दुसर्‍याने सत्तेला सतत झुगारून आपला दबदबा निर्माण केला. एकाला सत्तेशिवाय जगणेच अशक्य वाटले, तर दुसर्‍याच्या हाताशी सत्ता येऊनही तिच्यापासून दुर रहात त्याने व्यक्तीगत दरारा कायम राखला. अशा दोन टोकाच्या व्यक्तीमत्वांनी महाराष्ट्राला दिर्घकाळ नेतृत्व दिले. त्यातले बाळासाहेब आज हयात नाहीत. पण शरद पवार कालबाह्य होत असताना, नव्या पिढीतल्या कोवळ्या पोरांशी लढताना दिसतात, तेव्हा म्हणूनच ती केविलवाणी धडपड नकोशी वाटते. कालपरवाच लोकसभा विधानसभा निवडणूका झाल्या. त्यात अपेक्षेप्रमाणे पवार व त्यांच्या पक्षाचे पानिपत झाले. खरे तर त्याच्याही आधी त्यांनी आपण होऊन बाजुला व्हायला हवे होते. पण क्षणभरही राजकारणाचा त्याग त्यांच्या मनाला शिवत नसावा. त्यातून मग अशी दुर्दैवी परिस्थिती उदभवली आहे.

लोकसभेपासून विधानसभेपर्यंत पवार यांनी आपली पुरोगामी प्रतिमा टिकवण्यासाठी भाजपावर ‘अर्धी चड्डी’ अशी टिका चालवली होती आणि अशा लोकांच्या हाती राज्याची सत्ता सोपवणार काय, असा सवाल थेट मतदाराला केला होता. पण त्याच निवडणूकीचे निकाल स्पष्टही झालेले नव्हते, त्याआधी थेट त्याच भाजपाला सरकार स्थापनेसाठी पाठींबाही पवारच देऊन मोकळे झाले. अर्थात त्यासाठी त्यांनी एक राजकीय तर्कशास्त्रही मांडले होते. राज्यात राजकीय अस्थीरता नको म्हणून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या पक्षाला जनतेने दिलेले कौल मान्य करून आपण बिनशर्त पाठींबा देत आहोत, असे त्यांनी म्हटले होते. पण आपल्याच विधानावर खुद्द पवारांचा तरी कितीसा विश्वास होता? जोपर्यंत निकाल स्पष्ट झालेले नव्हते, तोपर्यंत भाजपाचे बहूमत हुकल्याचे पवारांना कसे उमगले होते? निकालाचे आकडेच स्पष्ट नसताना भाजपाच्या सोबत अन्य कुठलाच पक्ष नाही, म्हणून त्यांना सरकार बनवण्यात अडचण येणार, हे ओळखायला पवार अंतर्यामी महंत आहेत काय? आदल्या दिवशीही भाजपा नेते जागा कमी पडल्यास शिवसेनेची मदत घेऊ असे म्हणत असताना, त्यांना बहूमताची अडचण आली आहे, याचा साक्षात्कार पवारांना कशाला व्हावा? अडचण येण्यापुर्वीच न मागितलेली मदत द्यायला धावण्याची ही धुर्त खेळी राज्याच्या स्थैर्यासाठी होती, यावर खुद्द पवार यांचा तरी विश्वास होता काय? त्यामुळेच पवारनिती म्हणूनच त्याकडे बघितले गेले आणि आता जी राजकीय अस्थीरता निर्माण झाली, त्याचे खापरही पवारांच्याच माथी मारले गेले. कारण आपल्या बिनमांगा पाठींब्याच्या घोषणेला महिना होत असताना त्यांनीच नेमके उलट अर्थाचे विधान करून टाकले. सरकार चालवायचा मक्ता आपण घेतलेला नाही, असे धमकीवजा विधान अलिबाग येथील चिंतन शिबीरात त्यांनी केले. आजचे त्यांचे विधान खरे मानायचे, तर मग महिनाभर आधी जुने विधान कशाला केले होते? तेव्हाही कोणी सरकार वा राजकीय स्थैर्याचा मक्ता शरद पवार यांना दिलेला नव्हता. मग मक्तेदार असल्यासारखी त्या पाठींब्याची घोषणा करायची काय गरज होती?

पवारांच्या याच परस्पर विरोधी विधानांमुळे वाहिन्यांवरच्या निवेदक वा वृत्तपत्रांच्या वार्ताहरांनी त्यांच्या अशा राजकीय खेळीला कोलांट्याउड्या असे संबोधन दिले. अर्थात असे पवारांनी प्रथमच केलेले नाही. त्यांच्या अर्धशतकाच्या राजकीय वाटचालीत गाजवलेले कर्तृत्व बघितले. तर अकस्मात उलट्या टोकाला जाण्याइतक्या भूमिका सहजगत्या बदलून त्याला तत्वाचा मुलामा चढवण्यात पवार वाकबगार राहिले आहेत. त्यांच्या उमेदीच्या काळातले ज्येष्ठ राजकीय नेते व कार्यकर्ते साधेसरळ अब्रुदार होते. त्यामुळे बोललेले शब्द वा घेतलेल्या भूमिकांविषयी ठाम असायचे, व्यवहारी नुकसान सोसूनही आपल्या भूमिकेवर ठाम रहाण्याला नेतृत्व मानले जायचे. सोयीनुसार भूमिका बदलून त्याला तात्विक मुलामा चढवण्याला संधीसाधूपणा समजले जायचे. असल्या प्रथा परंपरांना शरद पवारांनी त्याच उमद्या कालखंडात बेधडक फ़ाटा दिला आणि केव्हाही संधी मिळेल तिथे स्वार्थाला तत्वांचा मुलामा चढवण्यात धन्यता मानली. मोजक्या लोकांनी त्यांच्या अशा संधीसाधूपणाला धुर्तपणा ठरवण्याचे काम मस्त पार पाडले. मग अशा या भ्रामक प्रतिमेत खुद्द पवारच इतके गुरफ़टत गेले, की त्यातून बाहेर पडून खराखुरा शरद पवार होणे, त्यांना अशक्यच होऊन गेले. त्यांना आवडणार्‍या क्रिकेटच्या खेळात एकदोन सणसणित फ़टके मारणार्‍या फ़लंदाजाचा प्रेक्षक डोक्यावर घेतात. त्याचा फ़टका चुकीचा असला तरी चौकार-षटकार गेल्यावर त्याची चुक कोणी विचारात घेत नाही, तर भर पडलेल्या धावांचा गौरव होतो. तिथेच मग तो फ़लंदाज टाळ्यांच्या गजराचा हावरा होऊन गेला, तर अकस्मात बाद होतो आणि लौकरच क्रिकेटमध्येही आपली शान गमावून बसतो. मोठी खेळी करणेही त्याला मग शक्य होत नाही. पवारांच्या दिर्घकालीन राजकीय खेळीचा तसाच सत्यानाश होऊन गेला आहे. त्यांच्या प्रत्येक फ़सव्या संधीसाधू कृतीला धुर्त, मुरब्बी, मुत्सद्दी, उस्ताद अशी विशेषणे मिळत गेल्याने त्यांच मोहात सापडून पवार राजकारणाचे पावित्र्यच विसरून गेले. तिथेच त्यांची घसरगुंडी होत गेली. सहाजिकच ताज्या राजकारणात नुकसान किती झाले, त्यापेक्षा आपल्या लबाड खेळीवर पवार खुश आहेत.

दोन दशकापुर्वी हाच माणूस महाराष्ट्रातून राष्ट्रीय राजकारणात थेट पंतप्रधान पदावर दावा करायला गेला होता, यावर आज कोणाचा विश्वास तरी बसेल काय? राजीव गांधींची हत्या झाल्यावर कॉग्रेस पक्षात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती. ती भरून काढायला पवार संसदीय पक्षाचा नेता व्हायला दिल्लीला गेले होते. नरसिंहराव यांना आव्हान देण्यापर्यंत त्यांनी मजल मारली होती. त्यांचीच गुणवत्ता, अनुभव आणि कार्यक्षमता यावर मात करणार्‍या त्यांच्या धुर्तपणानेच त्यांचा बळी घेतला. महाराष्ट्रातल्याच खेळी तिथे करताना त्यांची अशी घसरगुंडी होत गेली, की त्यातून त्यांना अजून सावरता आलेले नाही आणि आता वेळ निघून गेली आहे. इथे ज्या स्थानिक व प्रादेशिक राजकारणात चलाख्या केल्या, त्यातून पवार क्रमाक्रमाने आपली विश्वासार्हता गमावत गेले होते. पण तीच प्रतिमा त्यांना राष्ट्रीय पातळीवर अडचणीची ठरली. देशभरच्या सर्वच राजकीय पक्षात पवारांचे दोस्त आहेत, असे अगत्याने सांगितले जाते. पण त्यापैकी किती पक्ष वा त्यांचे नेते पवारांवर विश्वास ठेवतात, या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे. आणि तीच पवार यांच्या राजकारणाची खरी शोकांतिका आहे. राजकारण हा कितीही संधीसाधूपणाचा खेळ असला, तरी तो विश्वासाच्या मैदानात खेळला जातो. म्हणूनच त्यात पवार क्रमाक्रमाने अपेशी ठरत गेले. त्यांची क्षमता-गुणवत्ता कोणी नाकारलेली नाही. पण त्या पात्रतेवर विश्वास ठेवून कोणी एक पाऊल पुढे टाकायला तयार नसतो. वाजपेयी सरकार एक मताने पडले, तेव्हा १९९९ सालात संसदेच्या पायरीवर उभे राहून पवारांनी घोषणा केली होती, ‘अभी सोनियाजीके नेतृत्वमे पर्यायी सरकार बनायेंगे’. ते शक्य झाले नाही आणि मध्यावधी निवडणुकांची घोषणा झाली, तेव्हा अवघ्या तीन महिन्यात सोनिया परदेशी असल्याचे सांगत पवारांनी कॉग्रेस फ़ोडली होती. मग त्याच निवडणूकीच्या निकालानंतर त्यांनी पुन्हा सोनियांशी जुळवून घेतले.

आता पवार बोलतील त्यावर तासाभराने त्यांचाही विश्वास नसतो, ही त्यांची ख्याती त्यामुळेच झालेली आहे. अशा पार्श्वभूमीवर निवडणूक निकालानंतर त्यांनी भाजपाला दिलेला पाठींबा आणि कालपरवा अलिबाग येथे त्याविषयी दाखवलेली अनिश्चीतता, तपासणे भाग आहे. तिथेही आदल्या दिवशी त्यांनी जी भूमिका मांडली, त्याच्या नेमकी उलटी भूमिका दुसर्‍या दिवशी घेतली. असे करायची त्यांना काय गरज होती? आपला फ़ायदा प्रत्येक राजकीय नेता बघतच असतो. त्यामुळेच शरद पवार यांनी नि:स्वार्थी निरपेक्ष आजकारण करावे, अशी कोणी अपेक्षा करू शकत नाही. पण दोन दिवसात उलटसुलट भूमिका मांडून पवार यांचा कुठला लाभ झाला? एकीकडे त्यांच्या पाठींब्याविषयी भाजपाच्या मनात शंका सुरू झाल्या आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्ष पाठीराख्यात चलबिचल निर्माण झाली. इथे पवार नावाच्या व्यक्तीमत्वाचा आणखी एक पैलू लक्षात घेण्यासारखा आहे. इतर राजकीय नेत्यांशी म्हणूनच पवारांची तुलना होऊ शकत नाही. कुठलाही लाभ किंवा तोटा विचारात न घेता पवार आपल्या खेळी करतात. प्रसंगी तोटाही ओढवून घेतात. पण आपण राजकारणात संदर्भहीन झालेलो नाही, असे भासवण्यासाठी काहीतरी विचित्र खेळी करून सर्वजनांना थक्क करून सोडण्याचा मोह त्यांना कधीही आवरता आलेला नाही. इथेही नेमक्या तशाच घटना घडलेल्या दिसतील. निकाल स्वच्छ होण्यापुर्वीच त्यांनी भाजपाला पाठींबा दिला होता. मग तीनदा त्यांनी पत्रकार परिषदा घेऊन भाजपाचे सरकार कसे अल्पमतातही चालू शकेल, त्याचे खुलासे देण्याचे कष्ट घेतले. भाजपाचे नेतेही आपले सरकार बहूमतात आहे किंवा नाही वा बहूमत कसे सिद्ध करणार; त्याविषयी मौन बाळगून होते. पण पवार मात्र अगत्यपुर्वक राष्ट्रवादीच्या गैरहजेरीने फ़डणवीस सरकारचे बहूमत कसे सिद्ध होऊ शकते, त्याची ग्वाही देत होते. त्यातून काय दिसत होते किंवा दाखवले जात होते? भाजपाचे सरकार कुठल्याही परिस्थितीत पडणार नाही, यासाठी वाटेल ते करायला पवार सज्ज आहेत. फ़डणवीस सरकारची भाजपापेक्षा पवारांना फ़िकीर आहे. त्याचा मराठीतला अर्थ, हे सरकार चालवण्याचा मक्ता खुद्द शरद पवार यांनीच घेतला आहे. असेच दिसत नव्हते का? पण मंगळवारी अलिबागेत शिबीरात बोलताना पवारांनी दुसर्‍या टोकाचे विधान केले. सरकार चालवायचा मक्ता आम्ही घेतलेला नाही.

ज्यांना सत्तेत सहभागी व्हायचे नाही व बाहेरून पाठींबा दिलेला आहे आणि ज्यांचा पाठींबा आपण घेतला आहे असे भाजपा अजून सांगायला धजावत नाही, त्याविषयी पवार यांची इतकी विधाने व अशा भूमिका धुर्तपणा म्हणायचा, की धरसोडवृत्तीचा नमूना म्हणायचा? यातून ज्या भाजपाला पवार मदत करत होते, त्यांचे राजकीय नुकसान व्हायचे ते झालेच. पण खुद्द पवार वा त्यांच्या पक्षाला तरी कुठला राजकीय लाभ होऊ शकला? आपल्यावरचे घोटाळ्याचे आरोप लपवायला आणि पापावर पांघरूण घालायलाच राष्ट्रवादीने पाठींबा दिल्याचा गवगवा होऊनच गेला. इतके झाल्यावर पवार म्हणतात सेना व भाजपा एकत्र आले नाहीत, तर राज्यात स्थीर सरकार येऊ शकणार नव्हते व त्यामुळे राष्ट्रपती राजवट येऊन सहा महिन्यात निवडणूका घ्यायची वेळ आली असती. पण सेना व भाजपा एकत्र येणार नाहीत, हे पवारांना अंतिम निकालापुर्वी कसे कळले? उलट त्यांनीच एकतर्फ़ी पाठींबा देऊन दोघांनी एकत्र येण्यात बिब्बा घातला होता. सहाजिकच यातला मानभावीपण लोकांनाही कळतो. पण लोकांना यातले काही कळत नाही, अशा भ्रमात पवार रहातात आणि आपलेच नुकसान झाले तरी अशा खेळी करीत रहातात. त्या फ़सण्यावरही तत्वज्ञान वा राजकीय तर्काचा मुलामा चढवतात. असल्या धुर्तपणाची लकाकी आता संपलेली आहे, त्या़चे त्यांना भान कशाला येत नाही, याचेच नवल वाटते. सततच्या असल्या चाली व खेळी बघून लोकांना आता पवार कुठे फ़सतील, हे समजू लागले आहे. परिणामी जे काही पवार बोलतात, त्याच्या नेमके उलटे वागतील, याविषयी लोकांना खात्री वाटू लागली आहे. त्यातून बाहेर पडण्याचे व नव्याने पक्षाची व आपल्या प्रतिमेची उभारणी करण्याचे वय राहिलेले नाही. पण सवय मात्र त्यांना शांत बसू देत नाही. म्हणून मग अशा पोरकट ठरणार्‍या कृती-उक्ती त्यांच्याकडून होत असतात.

दिर्घकाळ त्यांची राजकीय कारकिर्द व भलेबुरे दिवस बघणार्‍या व अभ्यासणार्‍या माझ्यासारख्या अनेक राजकीय पत्रकारांना त्याचे मानसिक क्लेश होतात. ज्याच्यापाशी कष्ट उपसण्याची जिद्द, गुणवत्ता व बुद्धी आहे आणि तरीही अशा हुशार मुलाने उनाडपणा करण्यात वेळ दवडून कॉपी करूनच मेरीट मिळवण्याचा अट्टाहास करण्यात उमेद वाया घालवावी, अशी एकूण पवार यांची वाटचाल म्हणावी लागेल. त्यांची धुर्त, मुरब्बी व चलाख प्रतिमा आरंभीच्या कालखंडात काही पत्रकारांनॊ उभी केली. पवार त्या प्रतिमेत इतके गुरफ़टून गेले, की स्वत:लाच त्यात हरवून बसले. पवार म्हटले की धुर्त आणि काहीतरी अजब खेळी करणारच, अशी जी समजूत आहे, तिला खतपाणी घालण्याच्या हव्यासाने एक चांगला पात्र राजकारणी महाराष्ट्राने गमावला. ज्याच्यापाशी पंतप्रधान होऊन राष्ट्रीय नेतृत्व करण्याची महत्वाकांक्षा होती, तितकीच कष्ट उपसण्याची उर्जाही होती. पण चलाखीच्या खेळाने त्याला व्यसनासारखे पछाडले आणि त्यात भरकटत जाताना, त्याला आपल्याच भल्याबुर्‍याचे भान ठेवता आले नाही. अशा व्यक्तीमत्वाला केविलवाणा बघताना कुठल्या राजकीय अभ्यासकाला यातना होणार नाहीत? सचिन इतकाच गुणी व पात्रता असलेला विनोद कांबळी अपयशी ठरून क्रिकेटबाहेर फ़ेकला गेल्याचा, कोणाला आनंद होऊ शकेल काय? विनोदच्या दुर्दशेचे खापर अन्य कोणावर फ़ोडता येत नाही, तसेच शरद पवार नावाच्या एका जिद्दी राजकारण्याच्या शोकांतिकेचे खापर इतर कोणाच्या डोक्यावर फ़ोडता येणार नाही. मग कुठल्या बिगबॉस मालिकेत पोरकटपणा करून आपले अस्तित्व टिकवायला धडपडणारा विनोद चमकतो, की केविलवाणा वाटतो? त्याला अशा कार्यक्रमात स्थान देणारे वा बोलावणारे त्याचा सन्मान करत नसतात वा त्या़च्या गुणवत्तेचा गौरव करत नसतात. ती विनोदमधल्या क्रिकेटरची विटंबना असते. आज पवार यांनी केंद्रापासून राज्यातल्या राजकारणात अस्तित्व राखण्यासाठी जे काही चाकविले आहे, त्यातून त्यांची तशीच दखल घेतली जात असेल, पण ती सन्मानजनक नाही, एवढे तरी त्यांच्या लक्षात कशाला येत नाही?

आपल्या मुलांच्या वयाच्या नेत्यांशी सध्या पवार धावायची शर्यत करतात आणि त्यातच त्यांची दमछाक होताना दिसते तेव्हा खरेच क्लेश होतात मनाला. त्यांच्या वयाला असली शर्यत मानवत नाही, त्याचप्रमाणे त्यात त्यांची दमछाकही बघवत नाही. वर्षभरापुर्वी भाजपाने नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली. तेव्हही पवार यांनी आपल्या अनुभवाचे बोल ऐकवले होते. एका बाजूला राजकारण खेळाताना पवारांनी क्रिडाक्षेत्रातही खुप गोष्टी केल्या. त्यामुळेच त्यांच्या क्रिडा विषयक ज्ञानाकडे दुर्लक्ष करता येत नाही. लोकसभा निवडणूकीला तब्बल आठ महिने शिल्लक असताना नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रचार मोहिमेची आघाडी उघडली होती. तेव्हा होऊ घातलेल्या चार विधानसभांच्या निवडणूकीत त्यांनी अग्रभागी राहुन सहभाग घेतला होता. त्याचप्रमाणे अन्य राज्यातही जाऊन मोठमोठ्या सभा घ्यायला आरंभ केला होता. त्याच संदर्भात पवारांनी एक वक्तव्य केले होते. मॅराथॉन ही जगातली सर्वात मोठ्या लांबीची धावस्पर्धा दौडणारा खेळाडू कधी घाई करीत नाही. अत्यंत संथगतीने आरंभ करतो आणि आपली शक्ती जपून वापरत अखेरच्या पल्ल्यात झेपावतो. उलट आधीच दौडत सुटलेला उतावळा धावक सगळी शक्ती पहिल्याच काही अंतरात धावताना थकून जातो आणि निर्णायक टप्पा आला, मग त्याची पुरती दमछाक होऊन जाते. असे विधान पवार यांनी केलेले होते. पण त्यांना त्यातून मोदींची घाई सुचित करायची होती. प्रत्यक्ष लोकसभा निवडणूका येतील तेव्हा मोदी थकलेले असतील व त्यांच्या प्रचाराची दमछाक झालेली असेल, असेच पवारांना सांगायचे होते. त्यांचा मुद्दा दुर्लक्षणिय नव्हता. पण त्यासाठी त्यांनी ज्या व्यक्तीकडे बोट दाखवले, त्यात गल्लत होती. कारण मोदी यांनी कुठल्याही पदापर्यंत पोहोचण्याचा उतावळेपणा केलेला नव्हता. पण उलट हे तत्वज्ञान सांगणार्‍या पवारांनाच ते उदाहरण चोख लागू पडत होते. आजची पवारांची दमछाक त्याचाच पुरावा आहे. मोदींनी खुप उशीरा निवडणूक व सत्तेच्या राजकारणात उडी घेतली आणि अल्पावधीत निर्णायक टप्पा गाठला. त्याच्या उलट पवारांची कहाणी आहे.

   पवारांनी पहिली निवडणूक तिशीच्या आधीच लढवली आणि तिशी पार होताना मंत्रीपदही मिळवले. अवघ्या दहा वर्षात मुसंडी मारून मुख्यमंत्री होण्यापर्यंत त्यांची मजल गेली. राजकीय मॅराथॉन शर्यतीमध्ये आज पवार कुठे येऊन पोहोचले आहेत? पंतप्रधानपद ही त्यांच्या राजकीय शर्यतीचे लक्ष्य नव्हते का? मग त्यात पवार कुठवर येऊन पोहोचले? कितीही शॉर्टकट मारून त्यांना पंतप्रधान पदाच्या रेषेपर्यंत पोहोचताही आलेले नाही. असे कशाला झाले आहे? ही शर्यत मॅराथॉनची आहे, हे तेव्हा पवारांच्या लक्षात आलेले नसावे. मोदींची गोष्ट एकदम वेगळी आहे. तुलनेने मोदी खुपच उशीरा या शर्यतीत उतरले. खरे सांगायचे तर त्यांना पक्षाने जबरदस्तीने सत्तेच्या शर्यतीत उतरवले. पन्नाशी ओलांडल्यावर पक्षाने लादल्याने त्यांना मुख्यमंत्री व्हावे लागले आणि पुढल्या घडामोडींनी उठलेले टिकेचे मोहोळ आवरताना मोदी कधी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येऊन पोहोचले; त्याचा त्यांनाही पत्ता लागला नाही. राजकीय कारकिर्दीला पद वा सत्ता मिळवण्याच्या हव्यासाने मोदींनी सुरूवात केली नाही. आपली शक्ती व सराव वाढवत नेल्याने आज पंतप्रधान पदाच्या शर्यतीत मोदी पहिल्याच प्रयत्नात जिंकले आहेत आणि पवार कुठल्या कुठे दूर फ़ेकले गेलेत. पवार त्या शर्यतीत उतरले तेव्हा मोदी आमदारकीच्याही जवळपास नव्हते. पवारांनी आपल्याला लागू होणारे निकष मोदींना लावण्याची अकारण घाई केली. म्हणून सव्वा वर्षापुर्वी त्यांनीच केलेले विश्लेषण आज खोटे पडले आहे. आपल्याच विश्लेषणात पवार यांची फ़सगत झाली आहे. पंतप्रधानपद दूरची गोष्ट झाली. महाराष्ट्रातील आपलेच बालेकिल्ले संभाळताना पवारांची तारांबळ उडालेली आहे. आणि त्याला दुसरा कोणीही जबाबदार नसून, खुद्द पवारांनी केलेली घाईगर्दीच त्याचे एकमेव कारण आहे.

दुर्दैव असे, की अजून कुठल्याही गोष्टीत धुर्तपणा म्हणून धांदरटपणा करण्याचा शरद पवार यांचा हव्यास काही सुटलेला नाही. म्हणून तर वयाने पोरसवदा वाटणार्‍या नव्या पिढीच्या देशभरातील वा राज्यातील नेत्यांकडून त्यांना पराभवाची चव चाखावी लागते आहे. राज-उद्धव किंवा गडकरी-फ़डणवीस यांच्याशी पत्त्याचे डाव खेळल्यासारखे राजकारण पवार खेळतात, तेव्हा म्हणूनच त्यांना अभ्यासलेल्यांना क्लेश होतात. या नव्या पिढीतले नेते वा पत्रकार पवारांच्या कृतीची टवाळी करतात, ते यातनामय असते. आताही निकालापुर्वी भाजपाला पाठींबा द्यायचा, मग गैरहजर राहून बहूमत सिद्ध करायला मदतीचा हात पुढे करायचा आणि पुन्हा सत्ता टिकवण्याचा मक्ता आपण घेतलेला नाही असे उफ़राटे विधान करायचे; असली स्थिती बघितली मग दया येते. कुठल्याशा चित्रपटात नुसत्याच नाचापुरता दिसणारा भगवानदादा किंवा गर्दीतल्या प्रसंगात भारतभूषण बघितल्यावर जुन्या पिढीतल्या चित्रपट रसिकाला अस्वस्थ वाटायचे, तशी माझ्या पिढीतल्या पत्रकारांची अवस्था होते. जग-काळ व समिकरणे आता बदलून गेलीत आणि म्हणूनच व्यवहारासह धुर्तपणाचे स्वरूपही आमुलाग्र बदलून गेले आहे. नवी पिढी राजकारणात पुर्वीच्या नेत्यांप्रमाणे निरागस वा भोळसट राहिलेली नाही. म्हणूनच त्यांना अशा खेळी पहिल्या फ़टक्यात कळतात. शरदरावांना हे कधी उमगणार?
(पुढारी रविवार पुरवणी ‘बहार’ २३/११/१४)

1 टिप्पणी:

  1. "ज्याच्यापाशी कष्ट उपसण्याची जिद्द, गुणवत्ता व बुद्धी आहे आणि तरीही अशा हुशार मुलाने उनाडपणा करण्यात वेळ दवडून कॉपी करूनच मेरीट मिळवण्याचा अट्टाहास करण्यात उमेद वाया घालवावी, अशी एकूण पवार यांची वाटचाल म्हणावी लागेल."
    एकदम सही भाऊ!

    उत्तर द्याहटवा