रविवार, १५ नोव्हेंबर, २०१५

अगतिक पत्रकारितेचे व्यथापुराण

ऑगस्ट महिन्यात माझ्या ‘जागता पहारा’ या ब्लॉगच्या वाचनाची संख्या दहा लाख पार करून गेली. अवघ्या २५ महिन्यात ह्या माध्यमातून मिळालेला इतका प्रतिसाद मलाही थक्क करून गेला. काही तरूण मित्रांच्या आग्रहाखातर मी सोशल माध्यमात आलो. साडेचार दशके छपाई माध्यमात काम केलेल्या माझ्यासाठी संगणकावर टंकलेखनही अशक्य होते. भले इमेल वा अन्य कारणासाठी संगणक वापरत असलो तरी कधीकाळी मराठीत टंकलेखनानेच लिखाण करीन असे स्वप्नातही वाटले नव्हते. त्याचेही कारण आहे. सलग शाईच्या पेनने लिहायच्या सवयीतून बाहेर पडून बॉलपेन वापरणेही ज्याला शक्य झाले नाही, त्याला टंकलेखनाचा विचारही कसा शक्य होता? एकप्रकारे हटवाद वा आडमुठेपणा म्हणायला हरकत नाही. पण २००९ च्या सुमारास ‘पुण्यनगरी’ दैनिकात ‘उलटतपासणी’ हे दैनंदिन सदर लिहू लागलो आणि त्याच्या लोकप्रियतेने माझ्यात हा मूलभूत फ़रक घडवून आणला. तिथे लेखाच्या शेवटी माझा मोबाईल क्रमांक छापलेला असायचा आणि नित्यनेमाने वाचकांच्या तुडुंब प्रतिक्रिया येत असत. त्यामध्ये शेकड्यांनी तरूण व विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्याच मुलांनी ब्लॉग-फ़ेसबुक अशा सोशल माध्यमात येण्यासाठी माझा पाठलाग सुरू केला. पण नव्याने टंकलेखन शिकून नेहमीच्या गतीने लिहीणे शक्य नसल्याचे सांगत मी टाळाटाळ करत राहिलो. मात्र त्यातले दोन तरूण कमालीचे चिवट निघाले. लागोपाठ तीन दिवस घरी येऊन माझ्या जणू मानगुटीवर बसले आणि त्यांनी मला प्रयत्न करायला भाग पाडले. ब्लॉग वा फ़ेसबुकवरचा माझा वावर हे त्यांचे कर्तृत्व आहे. तीन आठवडे सलग रिकाम्या वेळात टंकलेखनाचा सराव केल्यावर मला गती आली आणि थेट टंकेलेखनाने लेख लिहीण्यापर्यंत मजल मारू शकलो. मग वृत्तपत्रासाठी लिहीलेले लेख अशा माध्यमातून वापरू लागलो. मला त्यासाठी आग्रह धरणार्‍या त्या मुलांचा मुद्दा तेव्हा पटला नव्हता. पण आज त्याची महत्ता लक्षात येते.

तशी ती दोन्ही मुले इंजिनीयरींगचे विद्यार्थी होती आणि ‘पुण्यनगरी’कडे तसा सुशिक्षित वाचक फ़ारसा नव्हता. मग अशी मुले त्या दैनिकात माझे वाचण्यापर्यंत कशामुळे आली, याचे मलाही नवल वाटायचे. तर त्यांचे दुखणे वेगळेच होते. त्यांना माझे आवडलेले लेख आपल्या मित्रांना पाठवायचे असत आणि स्कॅन करून पाठवले तरी वाचायला त्रासदायक व्हायचे. पण ते मित्रांनी व त्यांच्या पिढीने वाचून विचार करायला हवा असा त्यांचा अट्टाहास होता. त्यातून ते माझ्या मानगुटीवर बसायला आलेले होते. ब्लॉगमुळे ते काम सोपे होईल असे त्यांचे मत होते. कारण होते माझी सडेतोड कोणालाही झोडपून काढणारी लेखनशैली! आजकाल कोणी इतके स्पष्ट व नाव घेऊन बेधडक लिहीत नाही आणि उलगडून राजकारण समजावत नाही. अन्य वृत्तपत्रातही तितके परखड लेखन नसते, असे त्यांचे मत होते. त्यासाठी त्यांनी आग्रह धरला होता. त्यातून २०१२च्या पुर्वाधात मी या माध्यमाकडे वळलो. फ़ेब्रुवारीच्या शेवटी माझे ‘पुण्यनगरी’तले लेख ‘उलटतपासणी’ याच नावाने ब्लॉग म्हणून प्रकाशित करू लागलो. त्याचा सारांश फ़ेसबुकवर टाकायचा आणि ब्लॉगचा दुवा जोडायचा. मग ज्यांना आवड असेल त्यांनी तिथे जाऊन संपुर्ण लेख वाचावा, अशी अपेक्षा होती. मात्र अशा रितीने वाचक गोळा होईल वा इंटरनेटच्या माध्यमातून वाचक इकडे मोठ्या प्रमाणात वळू शकतो, यावर माझा फ़ारसा विश्वास नव्हता. कारण इंटरनेट म्हणजे कटकटी, त्यासाठी संगणक हवा आणि तेवढ्या छोट्या पडद्यावर सरकून सरकून लेख वाचायचा, हे खुप त्रासदायक असल्याने माझे ठाम मत होते. पण सगळेच लेख निदान एका जागी सुरक्षित रहातात व जगाच्या पाठीवरून कुठेही ते मिळवता येतात, ही मला माझ्यासाठी सोय वाटली होती. म्हणून मार्च २०१२ पासून सातत्याने ‘उलटतपासणी’ हा ब्लॉग प्रकाशित होऊ लागला. फ़ेसबुकवर मित्र परिवार वाढण्यावर त्याचे भवितव्य अवलंबून होते आणि हळुहळू ब्लॉग लोकांपर्यंत पोहोचत होता. त्यात एक लाख लोकांनी ब्लॉगवरचे लेख वाचायला एक वर्षापेक्षा अधिक काळ गेला आणि योगायोग असा, की तोपर्यंत माझ्या ‘पुण्यनगरी’तल्या स्तंभावर गदा आली. हल्ली कुठलेही वृत्तपत्र आपल्या पायावर उभे राहू शकत नाही. त्याच्यापाशी उधळायला बुडवायला प्रचंड पैसा हवा किंवा राजकारण्याचा आशीर्वाद हवा. सहाजिकच त्यांच्या मर्जीला धुडकावून वृत्तपत्र चालवता येत नाही.

माझी पत्रकारिता नेहमी आडमुठी व स्वयंभू राहिली आहे. व्यावसायिक तडजोडी मला जमल्या नाहीत. म्हणून त्या आडमुठेपणाची ‘पुण्यनगरी’ने किंमत मोजावी असा होत नाही. माझे लेखन लोकप्रिय असले तरी त्या वृत्तपत्राच्या हिशोबाला परवडणारे नव्हते. सहाजिकच तिथून मे २०१३ मध्ये ‘उलटतपासणी’ बंद पडली. त्याबाबत चौकशी करणारे शेकडो फ़ोन पुढल्या काळात येत राहिले. याचा अर्थ लोकांना माझे लिखाण वाचायचे होते. पण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे साधन माझ्यापाशी नव्हते. पण आता गप्प बसण्याचीही गरज नव्हती. मला लिहायचे ते मुठभर लोकांपर्यंत घेऊन जाणारा ब्लॉग माझ्या हाताशी होता. मजेची गोष्ट अशी, की मे २०१३ मध्ये ‘पुण्यनगरी’तला स्तंभ बंद पडल्यावर मी फ़ारसे त्या ब्लॉगवर नव्याने लिहीले नाही. अगदी महिन्यातून तीन चार लेख सवड मिळतील तसे लिहायचो. पण आधीचे लेख होते. त्यातले संदर्भ असणारी घटना घडली, मग तेवढी नवी बाब सांगून जुन्याच लेखाचा दुवा फ़ेसबुकवर टाकायचो. पण तेही जुने लेख अगत्याने वाचणारा वा़चक मिळतच राहिला. मे २०१३ मध्ये ब्लॉगचे नित्यनेमाने लेखन थंडावले तोपर्यंत केवळ लाखभर लोकांनी ते लेख वाचलेले होते. पण त्यात आणखी ३०-४० लेखांची अडीच वर्षात भर पडली असूनही आज त्याची वाचनसंख्या तब्बल चार लाख ओलांडून पुढे गेली आहे. म्हणजे शिळेपाके म्हणावे असे तेच जुने लेख ताजे असताना वाचले गेले, त्याच्या तिप्पट नंतरच्या दोन वर्षात वाचले गेले. हा सगळा प्रकार मला तरी धक्कादायक वाटला.

मग काही दिवस तसेच गेले आणि नव्याने ब्लॉगवर लक्ष द्यायचे ठरवले. जुना शिक्का नको म्हणून ‘जागता पहारा’ असा नवा ब्लॉग लिहायचा सपाटा लावला. रोजच तिथे लिहायचा चंग बांधला. जणू दैनिक असावे, तसे तिथे काहीतरी रोज लिहायचा छंद जोपासला. जुलै २०१३ मध्ये त्याची सुरूवात झाली आणि आज ११ लाखाचा टप्पा ओलांडून हा ब्लॉग पुढे गेला आहे. नेमके सांगायचे तर २५ महिन्याच्या कालखंडात या ब्लॉगला अकरा लाख वाचनसंख्या लाभली आहे. अजूनही मला त्याचे नवल वाटते. कारण जुन, जुलै व ऑगस्ट अशा तीन महिन्यात लागोपाठ एक लाखाची संख्या तिथे आलेली दिसते आहे. ब्लॉग हे दैनिकाप्रमाणे लोक वाचतात, असा त्याचा अर्थ होतो. कुठल्या वर्तमानपत्र वा वाहिनीच्या संकेतस्थळाशी माझा ब्लॉग निगडीत नाही. निव्वळ फ़ेसबुक मित्र व त्यांनी पुढे सरकवलेले दुवे यातून ब्लॉगची वाचक प्रियता इतकी मोठी होऊ शकते, हा चकित करणारा प्रकार मला वाटला. पण आयुष्य छपाई माध्यमात घालवले असल्याने मला नेहमीच या माध्यमाच्या प्रसाराबद्दल शंका वाटत राहिली. म्हणून इतके लोक असा ब्लॉग कशासाठी वाचतात आणि इतके कटकटीचे असताना का वाचतात? आवडलेले लिखाण वाचणे अपेक्षित असते. पण बाजारात डझनावारी वृत्तपत्रे स्वस्तात, किंबहूना फ़ुकट म्हणावी इतक्या नगण्य किंमतीत उपलब्ध असताना, माझ्यासह अनेकांचे ब्लॉग इतके लोकप्रिय कशामुळे होतात, हा प्रश्न मला सतावत राहिला. त्याचे उत्तर शोधताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत राहिली, ती पत्रकारितेच्या विश्वासार्हतेची! सोपे स्वस्त छपाई माध्यम उपलब्ध असताना आज सोशल मीडीया म्हणून ओळखल्या जाणार्‍या अशा माध्यमांकडे वाचक कशामुळे आकर्षित झाला आहे? तर त्याला प्रचलित मुख्य प्रवाहातील पत्रकार संपादकांची दिवाळखोरी कारणीभूत आहे, असेच माझे ठाम मत झाले आहे. अर्थात तो त्या पत्रकार पेशापुरता विषय असता तर गोष्ट वेगळी! पण विषय तितका मर्यादित नाही. तो समाजातील प्रबोधनात्मक माहितीविषयक आरोग्याचा प्रश्न आहे. म्हणूनच आज घसरगुंडीला लागलेल्या पत्रकारिता व लोकप्रिय होत चाललेल्या सोशल माध्यमांचा गंभीर उहापोह आवश्यक बाब बनली आहे.

नुसतीच वृत्तपत्रांची लोकप्रियता घटलेली नाही. त्यांना बाजारात तग धरून टिकण्यासाठी लाजिरवाण्या कसरती कराव्या लागत आहेत. उदाहरणार्थ आपण आजच्या वृत्तपत्रिय बाजारातील विविध योजनांकडे बघू शकतो. कोणी वाचकांना आकर्षित करण्यासाठी अकस्मात पाच रुपयाची किंमत एक रुपया इतकी खाली आणतो, तर दुसरा कोणी रोजच्या अंकात काही कुपन छापून ती गोळा करण्याची स्पर्धा लावून लाखांची बक्षिसे जाहिर करतो. कोणी सहा महिन्यांसाठी अवघी दोनशे दिडशे रुपये वर्गणी भरून घरपोच अंक मिळण्याचे आमिष दाखवतो. तेव्हा नवल याचे वाटते, की हे लोक काय विकायला निघाले आहेत? वृत्तपत्र की साबण? तीन वड्या घेतल्यास चौथी वडी फ़ुकट, अशा उत्पादनाचा खप वाढवण्याच्या विविध योजना विसाव्या शतकाच्या अखेरीस झळकायच्या. ज्या वर्तमानपत्रात त्या झळकायच्या, ती वृत्तपत्रे आज त्याच बाजारू उत्पादनाच्या पद्धतीने आपला खप वाढवण्याची स्पर्धा कशाला करीत आहेत? जवळपास फ़ुकट वर्तमानपत्र घरी मिळेल, असे सांगायचे बाकी राहिले आहे. अशा योजना आणायला त्या वृत्तपत्रांकडे पैसा कुठून आला, असा प्रश्न कोणाला कशाला पडलेला नाही? अर्थात अशा फ़ुकट वा अल्पदरात मिळण्याने कुठलेही उत्पादन खपात वाढ दाखवू शकत नसते. आपण जो माल विकत घेतो, त्यात काही उपयुक्तता असावी, अशीही ग्राहकाची अपेक्षा असते, पुर्वीच्या काळात भांडवली वृत्तपत्रांनी वैचारिक वृत्तपत्रांना संपवण्यासाठी अधिक पाने कमी किंमतीत देवून बाजी मारली होती. मात्र त्यासाठी नुसतीच पाने अधिक दिली नव्हती, की लोकांनी ती जास्त व स्वस्त पाने घेतली नव्हती. त्यातली वाचनीयता टिकवण्याची काळजी त्यातले संपादक पत्रकार घ्यायचे आणि ग्राहकही रद्दी विकून येणार्‍या पैशावर डोळा ठेवून असायचे. आज कोणी रद्दीसाठी वर्तमानपत्राची चळत घरात बाजूला जपून ठेवत नाही. म्हणूनच वाढीव पानांची रद्दी ग्राहकाला आकर्षित करीनाशी झाली आहे. म्हणूनच अधिक पाने व कमी किंमत आकर्षण उरलेले नाही. पण दुसरी बाजूही तितकीच महत्वाची आहे. आज वाढलेल्या पानामध्ये वाचाय़चे काय, असा प्रश्न वा़चकाला सतावतो. कारण कुठल्याही वृत्तपत्राला आपला चेहरा वा काही ओळख उरलेली नाही.

गोविंद तळवलकर म्हणजे तर्कशुद्ध बुद्धीवादी अग्रलेख वा विवेचन किंवा निळूभाऊ खाडीलकर म्हणजे आक्रमक व सोप्या भाषेतील समजावणारे लेखन अशी ओळख आता कुठल्या वृत्तपत्राला उरली आहे? माजगावकरांचा ‘माणूस’, बेहर्‍यांचा ‘सोबत’ आणि नुसत्याच सविस्तर माहितीचे ढिग समोर टाकणारा ‘स्वराज्य’ ही ओळख आज कुठल्या नियतकालिकाला राहिली आहे? कुठलेही वृत्तपत्र घ्या आणि त्याच्यावरचे नाव बदला काहीही फ़रक पडत नाही; अशी सर्व ओळख हरवलेली वॄत्तपत्रे झाली आहेत. त्यातला कुठला मजकुर अगत्याने वाचावा, अशी स्थिती उरलेली नाही. साप्ताहिक, मासिक वा दैनिक अशा कुठल्याही प्रकारच्या नियतकालिकाला आपला असा चेहरा नाही. ही खरी समस्या आहे. एका बाजूला ही दुर्दशा आहे आणि दुसरीकडे त्यातील लेखनाची वाचनीयता जवळपास संपलेली आहे. एक ठराविक पद्धतीची पोपटपंची व खात्रीपुर्वक चुकीची माहिती, इतकीच हमी कोणीही देऊ शकतो. कालपरवाचीच गोष्ट घ्या. महाराष्ट्र सरकारने अविष्कार स्वातंत्र्याची मुस्कटदाबी करण्याचा अध्यादेश काढला म्हणून गदारोळ सुरू झाला. त्याला ‘लोकसत्ते’ची हेडलाईन कारणीभूत झाली. बातमी लिहीणार्‍याला सरकारी किचकट भाषा उमजली नाही आणि त्याने अकलेचे तारे तोडल्यावर कल्लोळ सुरू झाला. वाहिन्यांवर त्याचे धुमशान झाले. पण ज्या विषयावर बोलत आहोत, तो निदान आपण समजून घ्यावा, अशी कुणाला इच्छाही झाली नाही. प्रत्यक्ष गोष्ट नेमकी उलटी होती. ज्या दंडविधान कलमाने अविष्कार स्वातंत्र्याच्या राज्यघटनेतील तरतुदीला बाधा येते, त्याच्या संबंधात कोणती काळजी घ्यावी, त्याविषयीच्या सूचना अंमलदारांना देण्यासाठी हे परिपत्रक जारी करण्यात आलेले होते. तेही हायकोर्टाच्या आदेशान्वये काढलेले होते. म्हणजे जे होऊ नये त्याची काळजी सरकारने घेतली, तेच नेमके सरकार करणार असल्याचा उफ़राटा गवगवा या बातमीने केला. जसजसा त्यातला मुर्खपणा लक्षात आला तसतसा एकेकाने पाय काढता घेतला. पण मूळ बातमी देणार्‍या ‘लोकसत्ता’सह कोणीही आपल्या चुक वा मुर्खपणाची माफ़ी मागण्याचे सौजन्य दाखवले नाही. ही आजची बेताल व बेजबाबदार पत्रकारिता आहे. मग लोकांनी ते वाचावे कशाला आणि त्यावर विश्वास तरी कसा ठेवावा? तीस चाळीस वर्षापुर्वी कुठल्याही भाषेतील वृत्तपत्रात इतका राजरोस व ठळक मुर्खपणा होऊ शकला असता काय? मथळ्याची अशी खोटी बातमी देवूनही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याचे सौजन्य संपादक दाखवत नाहीत, ही आजच्या पत्रकारितेची गुणवत्ता वा सभ्यता झाली आहे. अर्थात हा नुसता नमूना आहे. रोजची सर्व दैनिके गोळा केली आणि त्यातला बेतालपणा व मुर्खपणा दाखवायचा म्हटले, तर दहा बारा पानी स्वतंत्र दैनिकच चालवले जाऊ शकेल, इतका भरपूर मालमसाला आज उपलब्ध असतो.

जेव्हा असा बेतालपणा वा खोटेपणा बेदरकारपणे होऊ लागतो, तेव्हा तो लपून रहात नाही आणि सामान्य जनतेच्याही लक्षात येऊ लागतो. तेव्हा तुमची विश्वासार्हता लयाला गेलेली असते. मग खरी वा वास्तविक माहिती मिळवण्यासाठी लोक अन्य मार्ग शोधू लागतात. पुर्वी त्यासाठी काही सोयी नव्हत्या. पण आज इंटरनेट, गुगल अशा अनेक मार्गाने कोणीही भरपूर माहिती विनाविलंब मिळवू शकत असतो तपासुन बघू शकत असतो. मोबाईल फ़ोन, व्हाटसप, फ़ेसबुक, अशा कित्येक साधनांनी कोणालाही योग्य माहिती सहज उपलब्ध होण्याचे मार्ग प्रशस्त झाले आहेत. थोडक्यात पत्रकार वा वाहिन्या वा त्यांच्या हातातली माध्यमे, ह्यांची माहिती क्षेत्रातील मक्तेदारी कधीच संपुष्टात आलेली आहे. उपरोक्त ज्या परिपत्रकाच्या बातमीने गोंधळ उडाला, तेव्हा फ़ेसबुक माध्यमातून शेकडयांनी परिचित माझ्याकडे त्याची चौकशी करू लागले. माझे मत व खरेखोटेपणा विचारू लागले. काहींनी तातडीने ब्लॉगवर लेख टाकायचा आग्रह धरला. पण मला प्रत्यक्ष परिपत्रकाची प्रत मिळालेली नव्हती. मात्र मूळ बातमीचा गोंधळ वाचताच लक्षात येत होता, पण त्यांना चुकीचे ठरवण्याच्या घाईत माझ्याकडूनही उतावळेपणाने नवी चुक होण्याचा धोका होता. जेव्हा तशी प्रत मिळाली, तेव्हा मला धक्का बसला. पण जे मला खटकले होते तेच शेकडो लोकांना खटकले होते आणि त्याला मी वाचकाच्या प्रगल्भतेचे लक्षण मानतो. खरे म्हणजे तेच आजच्या पत्रकारितेपुढले मोठे आव्हान झालेले आहे. आम्ही छापू वा सांगू तेच निमूटपणे मान्य करा वा स्विकारा; असे म्हणायचे दिवस सोशल माध्यमांनी संपवले आहेत. शिवाय थेट संपर्काची व शोधाची साधने सहज उपलब्ध आहेत. म्हणूनच आपण काय सांगत वा लिहीत आहोत, त्याविषयी काटेकोर असणे पत्रकारांसाठी सक्तीचे झाले आहे. मात्र त्याचे तसूभर भान आजच्या पत्रकार संपादकांमध्ये दिसत नाही. आपण प्रतिदिन विश्वासार्हता गमावत आहोत, याचेही भान पुर्णपणे सुटलेले आहे. त्याची सुरूवात आता झालेली नाही, तर आज दिसत आहेत ते दोन दशकापुर्वीच्या पापाचे दुष्परिणाम आहेत.  

साधारण तीन दशकापुर्वी याची सुरूवात झाली असे म्हणता येईल. आणिबाणी लादून इंदिरा गांधी यांनी अवघ्या देशालाच तुरूंगात टाकले होते. वास्तविक तेव्हा आजच्या इतकी माध्यमे शक्तीशाली नव्हती. पण त्यांचा शब्द प्रभावशाली नक्कीच होता. कारण जे छापून यायचे त्यावर सामान्य जनतेचा कमालीचा विश्वास होता. अमूकतमूक आपण पेपरात वाचले आहे, असे लोक मोठ्या छातीठोकपणे सांगत असायचे. त्याचा अर्थ असा, की वृत्तपत्रात छापून आले म्हणजे आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितले आहे, असे लोक गृहीत धरायचे. मात्र त्यात खोटेपणा असू नये याचीही तितकी काळजी पत्रकारांकडून घेतली जात असे. माहितीची अन्य साधने सामान्य लोकांपाशी नव्हती. साधा घरातला फ़ोन खेड्यापाडयात पोहोचला नव्हता. त्यामुळे वर्तमानपत्र हाच माहितीचा एक मार्ग लोकांपाशी होता. म्हणूनच वर्गणीवर ‘माणुस’ वा ‘सोबत’ यासारखी साप्ताहिके चालू शकत होती. त्यातून लोकांचे होणारे प्रबोधन पुरेसे होते. शिवाय कुठल्याही तालुक्यापर्यंत पोहोचलेली वृत्तपत्रे आपल्या लेख व अग्रलेखातून जनतेचे शंकानिरसन करायचे व्रत असल्याप्रमाणे काम करायची. किंबहूना त्यात शुद्धलेखनाची चुक राहिली तरी चर्चेचा विषय व्हायचा. ‘अमृत’सारख्या माहितीपुर्ण मासिकात ‘मुद्राराक्षसाचा विनोद’ असे एक वाचकांसाठी सदर होते. त्यात कुठल्या वर्तमानपत्रात काय मुद्रणदोष राहिला व त्यातून कोणती गंमत तयार झाली, त्याला प्रसिद्धी दिली जात असे. खेरीज ‘उपसंपादकाच्या डुलक्या’ असेही एक मजेशीर सदर कुठल्या तरी नियतकालिकात होते. त्यातून वाचक किती सुबुद्ध व जागरूक होता, त्याची साक्ष मिळू शकते. आज असे एक अख्खे दैनिक काढता येईल, अशी परिस्थिती आहे. कारण छपाईपुर्वी लिखाणावर करडी नजर फ़िरत नाही, की अग्रलेखातही भयंकर चुका असतात. अशी स्थिती कशामुळे आली? त्याची सुरूवात आणिबाणी उठल्यावर अविष्कार स्वातंत्र्य हे राजकीय हत्यार बनव्ण्यापासून झाली. आपापले राजकीय हेतू व अजेंडा पु्ढे सरकवण्याची प्रवृत्ती माध्यमात घुसू लागली. त्यातून कुठल्याही वर्तमानपत्रात जो तटस्थपणा होता, तो क्रमाक्रमाने लयाला जाऊ लागला. त्याच्याही आधीच्या काळात विविध राजकीय पक्ष वा संघटनांची मुखपत्रे होती. पण त्यांना वगळता बाजारात मिळणारी अन्य वृत्तपत्रे कुठल्याही अजेंड्यापासून अलिप्त असायची. साधारण १९८० नंतरच्या काळात त्यापासून वृत्तपत्रसृष्टी हळुहळू ढळत गेली.

राजकारणात आपला अजेंडा मागे पडलेला बघून डाव्या विचारसरणीच्या अनेकांनी माध्यमांच्या प्रभावाखाली आपला अजेंडा पुढे रेटण्याचा पवित्रा घेऊन माध्यमांच्या क्षेत्रात उडी घेतली. ठराविक विचारसरणी व भूमिकांचा आग्रह लिखाणातून व विवेचनातून डोके वर काढू लागला. डाव्यांमध्ये असलेले अनेक अभ्यासक व व्यासंगी लोक योजनापुर्वक त्यात आले आणि त्यांनी पुढल्या काळात महत्वाच्या वृत्तपत्रात आपले बस्तान बसवले. एकदा तेवढे साध्य गाठल्यानंतर तर भिन्न विचारांच्या कोणालाही तिथे शिरू द्यायचे नाही; असा परिपाठच होत गेला. त्यामुळे १९९० साल उजाडताना समाज एका बाजूला व वर्तमानपत्रातला बुद्धीवाद दुसर्‍या टोकाला; अशी विभागणी होत गेली. अनेक राजकीय विषय, मुद्दे व प्रकरणे अशी दाखवता येतील, की जनमानसाला तयार करण्याचा अजेंडाच माध्यमातून राबवला जात असावा, तसे लिखाणाचे स्वरूप होत गेले. उदाहरणार्थ एका बाजूला सुप्रिम कोर्टाने शहाबानु खटल्यात महत्वाचा निर्णय दिला होता. पण त्याला मुस्लिम धर्मांधांनी विरोध केला आणि निकालाचे समर्थन करायला भाजपा संघ पुढे सरसावले होते. तर बोटचेपी भूमिका घेत राजीव गांधी यांनी कोर्टाचा निर्णय उलटा फ़िरवला. त्यामुळे एकूण बहुसंख्य हिंदू समाजात संतापाची भावना तयार झाली. तेव्हा कुठल्याही बुद्धीप्रामाण्यवाद्याने कोर्टाच्या समर्थनाला उभे रहाणे संयुक्तीक ठरले असते. त्यासाठी मुस्लिम धर्ममार्तंडांचे कान उपटणे, ही वर्तमानपत्रांची व पत्रकारितेची नैतिक जबाबदारी होती. पण संघ हिंदूत्ववादी कोर्टाच्या समर्थनाला उभे रहातात म्ह्टल्यावर माध्यमात दबा धरून बसलेल्यांनी पुरोगाम्यांनी कोर्टाच्या निकालाचीही पाठराखण करण्याचे साफ़ टाळले. त्यातून जी अस्वस्थता तयार होऊ लागली, त्याला खतपाणी घालून संघाच्या शाखा अयोध्येतील रामजन्मभूमीचा विषय घेऊन पुढे आल्या. शहाबानू प्रकरणाने अस्वस्थ झालेल्या बहुसंख्य हिंदू समाजाला त्याचे प्रतिक्रिया म्हणून आकर्षण वाटू लागले. कोर्टालाही जर मुस्लिम धर्मांधता जुमानणार नसेल, तर त्यांना राजकीय उत्तर देणेच आवश्यक आहे, अशी धारणा त्यातून वाढीस लागली. त्याला अर्थात राजीव गांधी यांचे बोटचेपे धोरण जितके जबाबदार होते, तितकाच पत्रकारितेचा पक्षपाती पवित्राही कारणीभूत होता. इथून मग पत्रकारितेच्या विश्वासार्हतेला खरा फ़टका बसू लागला. तटस्थपणे जे समाजाच्या सामुहिक हिताचे व राष्ट्रहिताचे आहे त्याला आपल्या राजकीय हेतू व कारणास्तव गुंडाळून ज्यांनी तेव्हा लेखण्या चालवल्या, त्यांनीच राजकीय विश्वासार्हता व पर्यायाने पत्रकारितेला सुरूंग लावला होता. त्याचा परिणाम काय झाला?

१९७७ साली कॉग्रेस व इंदिरा गांधी यांच्या विरोधात जनतेने दिलेला कौल ज्यांनी धुळीस मिळवला, तेच लोक तीच भूमिका घेऊन आता वर्तमानपत्रात दबा धरून आपला अजेंडा पुढे करत होते. थोडक्यात मुठभर समाजवाद्यांनी जनता प्रयोगाला सेक्युलर भूमिका रेटून सुरूंग लावल्याने त्यांची राजकीय विश्वासार्हता घसरलेली होती. तेच आता माध्यमातून राजकीय अजेंडा राबवून संघ वा हिंदुत्वविरोधी अजेंडा पुढे रेटत होते. पण प्रत्यक्षात त्यासाठी चाललेल्या बौद्धिक कसरती सामान्य जनतेला पटणार्‍या नव्हत्या. म्हणूनच पत्रकारिताही शंकास्पद भासू लागली. १९९० चे दशक सुरू होईपर्यंत पत्रकारितेवर डाव्या विचारसरणीने पुरता पगडा मिळवलेला होता आणि त्याच दरम्यान जगाचा चेहरामोहरा बदलू लागला होता. भारतातील राजकीय समिकरणे बदलू लागली होती. पुन्हा नवा जनता प्रयोग सुरू झाला आणि ज्या संघाला बाजूला ठेवण्यासाठी १९८० पुर्वी जनता पक्ष मोडला होता, त्याच संघाच्या राजकीय आघाडी असलेल्या भाजपाला सोबत घेऊन नव्याने डाव्यांना समिकरण मांडावे लागले होते. पण तेही नेहमीप्रमाणे फ़सले आणि पुन्हा कॉग्रेसला सत्ता मिळाली. मात्र दरम्यान भाजपा हा देशातला पर्यायी राजकीय पक्ष म्हणून उदयास आला होता. त्याला जितके राजकारणात वावरणारे पुरोगामी कार्यकर्ते व नेते जबाबदार होते, त्यापेक्षा अधिक माध्यमात दबा धरून बसलेले डावे लेखक पत्रकार कारणीभूत होते. एका गटाने राजकीय विश्वासार्हता लयाला नेली, तर दुस‍र्‍याने पत्रकरितेसह बौद्धिक विश्वासार्हता रसातळाला नेली. योगायोग असा, की याच दरम्यान जगाची आर्थिक व राजकीय रचना आमुलाग्र बदलू लागली होती. तांत्रिक यांत्रिक प्रगतीने जगण्याचे संदर्भ बदलू लागले होते. जुन्या संकल्पना, व्यवस्था व रचना ढासळून पडत होत्या आणि पर्यायाने समाजातील परस्पर संबंधांच्या व्याख्याही बदलू लागल्या होत्या. पण मजेची गोष्ट म्हणजे त्याचेही अर्थ व अन्वय जुन्याच कालबाह्य संदर्भात लावण्यात हेच डावे पत्रकार गर्क होते. आपण लिहीतो वा सांगतो, त्यावर लोक डोळे झाकून विश्वास ठेवतात, अशा भ्रमात त्यांची पत्रकारिता चालू राहिली आणि निकामी निरूपयोगी होत गेली. लोक पर्याय शोधू लागले होते आणि नवे पर्याय पुढे येऊ लागले होते.

१९९० नंतरच्या दशकात अर्थकारणाचा चेहरामोहरा बदलला आणि परमीट-लायसन्सचा जमाना मागे पडला. खुली अर्थव्यवस्था भांडवलदारीच्या तालावर नाचू लागलेली होती आणि त्याच अर्थव्यवस्थेवर स्वार झालेल्या सत्तेला व सत्ताधीशांना खेळवण्यासाठी नवे साधन पैसेवाले, भांडवलदार शोधू लागले होते. कालपर्यंत सरकारने निश्चीत केलेल्या धोरणानुसार आपल्या लायसन्स वा परमीट मिळवण्याच्या रांगेत ताटकळत उभे रहाणार्‍यांना आता आपल्या धोरणानुसार सरकार चालावे, अशा महत्वाकांक्षांनी घेरले होते. मात्र त्यासाठी आता राजकीय नेते वा पक्षांची गरज उरली नव्हती. तर त्यांच्यावर लगाम असल्याप्रमाणे वापरता येईल, असे काही साधन शक्य दिसू लागले होते. राजकीय पक्ष व नेतेही आता जनतेचे सेवक उरले नव्हते, तर राजकारण पैसे कमावण्याचा पेशा झाला होता. त्यांना आपली जनमानसातील प्रतिमा उजळ करणारी साधने हवी होती. थोडक्यात पत्रकरिता हे आजवर प्रबोधनाचे साधन म्हणून विकसित झाले होते, त्याला मध्यंतरीच्या सेक्युलर पत्रकारांनी प्रसिद्धीचे हत्यार करून ठेवले होते. तिथे अशा तमाम लब्धप्रतिष्ठीत संधीसाधूंचे लक्ष गेले. मग हे नवे राजकारणी, व्यापारी, भांडवलदार, संधीसाधू वा दलाल नव्या युगाचे हत्यार म्हणून पत्रकारितेकडे आशेने पाहू लागले होते. त्यांना हे हत्यार आपल्या स्वार्थासाठी वापरायचे होते. मात्र त्यासाठी सुपारीबाज मारेकर्‍यासारखे काम करायला पत्रकार तयार व्हायला हवे होते. पण ती अडचण एव्हाना राहिली नव्हती. पत्रकारितेचे पावित्र्य केव्हाच संपले होते, तो निव्वळ दिवाळखोर धंदा झालेला होता. त्यात उत्पन्नाचे वा गुंतवलेल्या भांडवलाचे काही लाभ शक्य उरले नव्हते. लोकांचा विश्वास नव्हता की वाचनीयता उरलेली नव्हती. सहाजिकच वर्तमानपत्रांना उडवायला पैसे घालणारा कोणी हवा होता आणि पत्रकारांना आपल्या दिवाळखोरीचा बोजा उचलणारा कोणी हवा होता. दुसरीकडे विविध कारणास्तव आपली पापे झाकणारा व आपले हेतू तडीस नेणारा कोणी बुद्धीमान प्रेषित धंदेवाईकांनाही हवा होता. त्यातून मग विसाव्या शतकाच्या अखेरीस बुडीत पैसा घालवणार्‍या माध्यम समुहाचे नवे पेव फ़ुटले. एकाहून एक मोठे उद्योग समुह वा काळापैसावाले करोडो रुपये ओतुन माध्यमात प्रवेश करते झाले. तोवर किरकोळ पगारवाढ वा वेतनश्रेणीसाठी झुंजणार्‍या पत्रकारातील मुठभरांना हाताशी धरून ही मोहिम पार पाडली गेली. अवघी पत्रकारिता एकविसाव्या शतकाच्या उदय होईपर्यंत काळ्यापैशाची बटीक बनून गेली. १३०

कालपरवा ज्या इंद्राणी मुखर्जीचे प्रकरण चव्हाट्यावर आले तो आजच्या माध्यमांचा खरा चेहरा आहे. कोण ही इंद्राणी व तिचा माध्यमांशी संबंध काय? मुक्त अर्थव्यवस्था व जागतिकीकरणाने जे भांडवल कुठल्याही देशातून कुठल्याही देशात जाऊ व येऊ लागले, त्याचा परिपाक इंद्राणी मुखर्जी आहे. आसामची एक महत्वाकांक्षी तरूणी जिचे बालपण अत्याचार सोसत गेल्याने सूडभावनेने अवघे नातेसंबंध बघणारी व जग जिंकण्याची मनिषा बाळगलेली ही तरूणी; कुठल्या गुणवत्तेवर देशभरच्या मोठमोठ्या पत्रकारांना बोटावर खेळवू लागली? तो मागल्या पाव शतकातील भरकटलेल्या पत्रकारितेचा इतिहास आहे, म्हणायला हरकत नाही. मुक्त अर्थकारणाच्या आरंभी उपग्रह वाहिन्यांचे तंत्रज्ञान स्वस्तात व सहज उपलब्ध झाले. त्यातून मग स्टार नेटवर्क हे पहिले खाजगी प्रक्षेपण भारतासाठी सुरू झाले. ऑस्ट्रेलियातील मोठा माध्यम सम्राट रुपर्ट मर्डोक याच्या पैशावर हे नेटवर्क भारतात कार्यरत झाले व केबलमार्फ़त दिसू लागले. तेव्हा इथे पुरेशा कार्यक्रमांची निर्मिती सुद्धा होत नव्हती. वृत्तवाहिनीतर दूरची गोष्ट होती. कारण इथून थेट प्रक्षेपण करायची मुभा नव्हती की तितकी तांत्रिक सज्जता भारतात खाजगी क्षेत्रात झालेली नव्हती. म्हणूनच स्टार नेटवर्कचे प्रक्षेपण हॉंगकॉंग येथून होत असे. तरी त्याचा मुख्याधिकारी पीटर मुखर्जी भारतीय होता व भारतातून सुत्रे हलवित होता. भारतातून मालिकांची निर्मिती व्हावी व प्रक्षेपणही करता यावे, यासाठी त्याचे खास प्रयत्न चालू होते. त्यांच्याच सज्जतेतून काहीकाळ आपले प्रक्षेपण करीत ‘झी’ नामक वाहिनी काही तासाचे कार्यक्रम दाखवत होती. स्टारप्लस, एम टिव्ही व बीबीसी अशा तीन वाहिन्या त्यातून दिसत असत. बहुतेक कार्यक्रम इंग्रजीत होते. पण दूरदर्शनच्या मक्तेदारीला ते आव्हान देऊ लागले. निदान शहरी मध्यमवर्ग त्याकडे वळत होता आणि नवा प्रेक्षकवर्ग तयार व्हायला लागला होता. दिल्लीत नवनवे स्टुडीओ उभारण्याची तयारी सुरू झाली होती. दिल्ली नजिकच्या नॉयडा औद्योगिक परिसरात चित्रनगरीसाठी भुखंड राखीव करून त्याला प्रोत्साहन दिले गेले. पत्रकारितेचे हे नवे भावंड तेव्हा जन्म घेण्याच्या जवळ आले होते. त्यातून मग स्टारने एक एक वाहिनी भारतीय वा हिंदी करण्याचा प्रयास सुरू केला, तर झी स्वतंत्रपणे वाहिनी म्हणून अस्तित्वात आली. नरसिंहराव यांचे सरकार गेले आणि देशात भाजपा नवा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला तोच हा काळ!

भाजपाचे हे यश माध्यमातील सेक्युलर लोकांना नावडते व परवडणारे नव्हते. त्यातून मग भाजपा वगळून सगळे सेक्युलर असा नवा सिद्धांत पुढे आला आणि देवेगौडा देशाचे पंतप्रधान बनून गेले. पुन्हा जनता प्रयोग थेट कॉग्रेसच्या मदतीने जगवण्याचा प्रयास झाला आणि दोनच वर्षात अपेक्षेप्रमाणे धुळीस मिळाला. दरम्यान जनता प्रयोगातले काही वैफ़ल्यग्रस्त भाजपाच्या गोटात यायला सुरूवात झाली होती आणि त्यातूनच मध्यावधी निवडणूका अपरिहार्य होऊन शेवटी भाजपाच्या नेतृत्वाखाली एनडीए नावाचे नवे सरकार सत्तेत आले. पण दरम्यान एक नवी सुरूवात राजकारणात अनुभवास आली. १९९८ सालात सीताराम केसरी यांनी देवेगौडा सरकार काही महिन्यातच पाडले आणि मग पर्याय म्हणून इंद्रकुमार गुजराल यांना सत्तेत आणले. मात्र त्यांना सरकार चालवू दिले नव्हते. त्यातून वैतागलेला मतदार पुन्हा कॉग्रेसच्या झोळीत मते टाकील, अशा भ्रमात केसरी व अनेक सेक्युलर बुद्धीवादी होते. प्रत्यक्षात मात्र तसे काही घडले नाही किंवा घडणारही नव्हते. कारण यावेळी मतदाराने कुठल्याही जनता प्रयोगाला मते दिली नव्हती, तर कौल भाजपाला झुकता दिला होता. त्यालाच टांग मारण्याच्या सेक्युलर लबाडीचा लाभ कॉग्रेसला वा अन्य सेक्युलर पक्षाला होणेच शक्य नव्हते. मात्र तशी खुळी आशा माध्यमात टपून बसलेल्या अनेक पत्रकारांना होती. कारण आता पत्रकारिता जवळपास भाजपा विरोधकांची एक अघोषित आघाडी बनली होती. म्हणूनच निकाल लागेपर्यंत कोणाला लोकमताचा अंदाज येऊ शकला नाही. कॉग्रेसचे नुकसान झाले नाही, पण जनता पक्षासह अनेक डावे राजकीय गट धुळीस मिळाले. किंवा अनेकांनी आपला भाजपा विरोध सोडून एनडीएमध्ये सहभागी होण्याचा पवित्रा घेतला. पण त्या निवडणूकीचा पत्रकारितेच्या संदर्भातला भाग म्हणजे खाजगी वृत्तवाहिन्यांचा आरंभ! कॉग्रेस पक्षाचा प्रचार करायला सोनिया गांधी मैदानात उतरल्या होत्या आणि त्याचवेळी स्टार नेटवर्कने स्टारन्युज नावाची खाजगी वृत्तवाहिनी तडकाफ़डकी सुरू केली. ह्याला किती योगायोग म्हणायचे आणि किती नियोजनबद्ध खेळी म्हणायचे, हे ज्याचे त्याने ठरवावे.

राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर सोनियांनीच पक्षाचे नेतृत्व करावे म्हणून नारायण दत्त तिवारी व अर्जुन सिंग या वरीष्ठ नेत्यांनी त्यांच्या दारात धरणे धरले होते. पण त्यांना दाद न देणार्‍या सोनिया अकस्मात १९९८ सालात पक्षाच्या प्रचाराला पुढे आल्या, तेव्हा त्यांना साधे हिंदीही बोलता येत नव्हते. पण रोमन लिपीत लिहून दिलेली भाषणे त्या बोलून दाखवीत. मात्र राजीवची विधवा असल्याने त्यांच्याविषयी लोकांमध्ये सहानुभूती व आकर्षण होते. नेमक्या त्याचवेळी अकस्मात स्टारन्युज वाहिनी सुरू व्हावी, याला योगायोग म्हणता येत नाही. कारण त्यांच्यापाशी कुठलीही यंत्रणा नव्हती आणि ते काम प्रणय रॉय यांच्या खाजगी कंपनीकडे सोपवण्यात आले. दूरदर्शनच्या माध्यमातून निवडणूक विषयक चाचण्या व पुढे निकालाचे अत्यंत नेटके विवेचन व विश्लेषण करण्यातून रॉय यांनी भारतीयांना आपली ओळख करून दिलेली होतीच. शिवाय राजीव यांच्याच कृपेने ‘वर्ल्ड धीस विक’ नावाचा बातमीवजा कार्यक्रम दूरदर्शनवर सादर करण्याचा अनुभव रॉय़च्या गाठीशी होता. मात्र चोविस तास बातम्यांचा घाणा घालण्याइतपत सज्जता त्यांच्यापाशीही नव्हती. शिवाय खुप जिकीरीचे काम होते. थेट प्रक्षेपण अजून इथून खाजगीरित्या होऊ शकत नव्हते. अनेक मनोरंजनाच्या वाहिन्या सुरू झाल्या होत्या. पण त्यांचे कार्यक्रम परदेशातूनच प्रक्षेपित व्हायचे. ती मोठी कसरत वाहिन्यांना करावी लागायची. म्हणूनच बातमीदारी तेव्हा अवघड होती. असे असतानाही सोनियांच्या राजकारणात सक्रिय होण्याच्याच मुहूर्तावर पहिली वृत्तवाहिनी मर्डोकच्या नेटवर्कने सुरू केली, हे लक्षात घेतले पाहिजे. आणि त्यावरून मग तितक्याच निष्ठेने सोनियांचे कौतुकही होऊ लागले होते. मात्र त्याचा फ़ारसा उपयोग झाला नाही. भाजपाने सर्वात मोठा पक्ष होत आणि बहुमताचे दार ठोठावत यश मिळवल्यावर पर्याय राहिला नाही. भाजपाचे वाजपेयी सरकार सत्तेत आले. दरम्यान इथे महाराष्ट्रातही सत्तांतर घडले होते. थोडक्यात राजकारणाप्रमाणेच पत्रकारितेतही मोठी उलथापालथ सुरू झाली होती. छपाई माध्यमांचा जमाना मागे पडत होता आणि वाहिन्यांचा जमाना येऊ घातला होता. शिवाय पारंपारिक लेखक संपादकांच्या बुद्धी व लेखन कौशल्याची सद्दी संपत होती आणि पैसा ओतू शकणार्‍या व पत्रकारांना मांडलीक म्हणून सेवेत रुजू करून घेणार्‍या माध्यम कंपन्यांचा जमाना येऊ लागला होता. स्वाभिमानी व बुद्धीवादी पत्रकारांनी शरण जावे किंवा संपून जावे, इतकाच पर्याय शिल्लक ठेवलेला होता.

झपाट्याने पत्रकारिता शिकवणार्‍या महाविद्यालयांचे पेव फ़ुटले आणि त्यांना सामावून घेणार्‍या माध्यमांचेही पेव फ़ुटले होतेच. १९९८ सालच्या लोकसभा निवडणूकीचे निकाल लागायचे होते आणि मतमोजणी सुरू व्हायची होती. तो दिवस प्रणय रॉयसाठी मोठा निकराच्या लढाईचा होता. हिंदी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेत चालणार्‍या स्टारन्युज वाहिनीकडे सर्वांचे डोळे लागले होते आणि त्याचे दोन प्रमुख बातमीदार दोन प्रमुख पक्षाच्या दारात थेट प्रतिक्रिया द्यायला भल्या सकाळीच येऊन उभे होते. त्यातला श्रीनिवासन जैन भाजपाच्या मुख्यालयात होता, तर अर्णब गोस्वामी ओसाड निर्मनुष्य कॉग्रेस मुख्यालयाच्य दारात उभा होता. तिथे कोणीच दिसत नाही, असे प्रणयने विचारल्यावर कोवळ्या पोरासारखा लाजलेला अर्णब अजून आठवतो. आजचा आक्रमक अर्णब बघताना तेव्हाचा तो नवखा अर्णब गोस्वामी कोणी भलताच होता की काय अशीही शंका येते. बरखा दत्त, राजदीप सरदेसाई त्यांच्यातले ज्येष्ठ म्हणायचे. कारण स्टुडिओत बसून ते अखंड किल्ला लढवायचे. मात्र वाजपेयी यांचे नवे सरकार सत्तेत आले आणि त्याने माध्यमांसाठी बंधने खुली करून टाकली. प्रथमच देशातून थेट प्रक्षेपणाची दारे खुली केली. जगातल्या अनेक देशातील बातम्या व वाहिन्या दाखवणार्‍या यंत्रणा मुक्तपणे मिळू लागल्या आणि सोपे तंत्रज्ञान उपलब्ध झाल्याने किरकोळ वाटावे इतक्या गुंतवणूकीत वाहिन्या सुरू होऊ लागल्या. वाहिन्या इतक्या वेगाने येत गेल्या, की बघताबघता छपाई माध्यमांची जणू सद्दीच संपली. आपले अस्तीत्व टिकवण्याची केविलवाणी धडपड छपाई माध्यमांना करण्याची पाळी आली. कारण आता बातमीसाठी निदान शहरातल्या लोकांना वर्तमानपत्रावर अवलंबून रहाण्याची गरज उरलेली नव्हती. मोठ्या शहरात व महानगरात कुठलीही बातमी लोकांपर्यंत विनाविलंब पोहोचत होती. हे छपाई माध्यमांपुढले मोठे आव्हान होते. कारण आता त्यांना सनसनाटी उडवून देणार्‍या बातम्या शोधून आणणे भाग होते, किंवा माहित असलेल्या बातमीचे नवनवे पदर उलगडून दाखवण्याचा मार्ग उपलब्ध होता. संपादकीय वा बौद्धिक कौशल्य दाखवूनच वाचक टिकवण्याची धावपळ करण्याखेरीज पर्यायच नव्हता. नुसत्या बातमीसाठी वर्तमानपत्र खपण्याचे दिवस संपत चालले होते. 

मात्र दुर्दैव असे, की छपाई माध्यमात तोपर्यंत राजकीय बांधिलकीची निर्विवाद सत्ता आलेली होती आणि त्याचेच प्रतिबिंब वाहिन्यांवरही पडताना दिसत होते. आपण आपला राजकीय अजेडा लोकांच्या माथी मारू शकतो, याची खात्री असलेल्यांनीच पत्रकारिता जणू काबीज केली होती. त्यांना फ़क्त पैसा गुंतवणार्‍या मालकाची गरज होती आणि ज्यांना आपली हुकूमत सत्तेच्या केंद्रावर गाजवायची होती, ते अशा सुपारीबाज पत्रकार संपादकाचा शोध घेत होते. एकविसाव्या शतकाची सुरूवात अशी झाली. त्यात पत्रकारितेचे पावित्र्य आधीच लयास गेलेले होते. राजकीय बांधिलकीने पत्रकारिता तटस्थ राहिली नव्हती. तिला पैसा ओतणार्‍यांनी जणू आपल्या जनानखान्यात नेवून बंदिस्त करण्याचा घाट घातला होता. त्याला नामवंतांनीच प्रतिसाद द्यायला सुरूवात केल्यावर कशालाच धरबंद राहिला नाही. इंद्राणी मुखर्जीचा उदय त्यातलाच आहे. तिला त्याच काळात पीटर मुखर्जी सापडला आणि पुढला र्‍हास अतिशय वेगाने होत गेला. ‘आपल्याला हवे ते साध्य करण्यासाठी वाटेल त्या थराला इंद्राणी जाऊ शकते’ असे तिचा पहिला पती किंवा ज्याच्यापासून तिला दोन्ही मुले झाली तो दास नावाचा इसम म्हणतो. अशा महिलेने भारतातल्या एकाहून एक नामवंत संपादक पत्रकारांना बोटावर खेळवले, तोच हा काळ आहे. त्याची साक्ष अनेक वृत्तपत्रांचे संपादन करून नाव कमावणार्‍या शेखर गुप्ता व वीर संघवी यांचा समावेश आहे. त्यांनीच लिहीलेल्या लेखातून त्याचे भयंकर तपशील उपलब्ध आहेत. जी महिला आपल्या मुलांना कागदोपत्री हेराफ़ेरी करून भावंडे म्हणून दाखवते आणि पुढल्या काळात पैशाचे निमीत्त झाले म्हणून मुलीची थेट निर्घृण हत्या करू शकते, तिच्या इशार्‍यावर आपण वागलो वा खेळवले गेलो, याची कुठलीही घृणा या दोघांनी आपल्या लेखन किंवा बोलण्यात आजही दाखवलेली नाही. किळस येण्यासारखे जिचे वर्तन आहे, तिच्यापुढे आपली बुद्धी गहाण टाकण्याचे ज्यांना वैषम्यही वाटत नाही, त्यांना आज भारतीय समाजात मान्यवर संपादक बुद्धीजिवी म्हणून ओळखले जाते. अशी अवस्था देशातल्या राष्ट्रीय पातळीवरच्या संपादकांची असेल, तर आपापल्या पातळीवर जे स्थानिक संपादक वा भाषिक संपादक पत्रकार आहेत, त्यांच्या प्रामाणिकपणाविषयी काय बोलावे?  

वीर संघवी याला हाताशी धरून २००६ च्या सुमारास इंद्राणीने एक वाहिनी सुरू करायचे ठरवले. त्यासाठी स्थापन केलेल्या कंपनीचे ठराविक शेअर्स संघवीला संपादक म्हणून दिले होते. अनेक पत्रकार तंत्रज्ञांना नोकरीत घेतले गेले. पण शेवटी ती वाहिनी सुरूच झाली नाही आणि कंपनी विकली गेली. त्याबद्दल पत्रकारांनी तात्कालीन माहितीमंत्री प्रियरंजन दासमुन्शी यांच्याकडे दाद मागितली होती. त्यांनी अर्थमंत्री चिदंबरम यांच्याकडे तो विषय नेला. त्याच्या चौकशीचेही आदेश निघाले. पण आजवर त्या चौकशीतून काय निष्पन्न झाले, ते जगाला कळू शकलेले नाही. दरम्यान त्यात पावणे दोनशे कोटी रुपयांच्या रकमेची हेराफ़ेरी झाल्याचे म्हणतात. त्या कंपनीत अमेरिकन तुरूंगात पडलेला भारतीय घोटाळेबाज रजत गुप्ता याची गुंतवणूक होती म्हणतात. थोडक्यात जितके म्हणून उकरायला जाल, तितका उकिरडा घाणीचाच आहे. अशा पीटर मुखर्जी व इंद्राणीच्या संस्कारातून पुढल्या काळात अनेक वाहिन्यांचे संसार उभे राहिले. त्या दोघांच्या हाताखालून गेलेल्यांनी आपापली कंपनी काढून भारतात नेटवर्क व वाहिन्या सुरू केल्या. यापैकी कोणाला शिना बोरा खुनाला वाचा फ़ुटल्यावर अवाक्षर बोलावेसे वाटलेले नाही. कारण प्रत्येकाला आता आपल्या प्रतिष्ठेला लागू शकणारे ग्रहण उमजलेले आहे. जी कहाणी इंग्रजी वाहिन्या व वर्तमानपत्राची आहे, तीच कहाणी अन्य भाषिक माध्यमातल्या वाहिन्या व वर्तमानपत्राची सुद्धा आहे. मराठीत दोन वाहिन्या अशा आहेत, ज्यांचे भांडवल डान्सबार वा चिटफ़ंडातून आलेले आहे. तिथे संपादक पत्रकार म्हणून मिरवणार्‍या कुणाला अन्य क्षेत्रातील व्यक्तींचे पातिव्रत्य तपासण्याचा कुठला नैतिक अधिकार पोहोचतो? आपण कुठल्या ‘भक्कम’ पायावर उभे आहोत, याची तरी खातरजमा त्यांनी करून घेतली आहे का? सहारा नावाचे एक नेटवर्क आहे. त्याचा मालक मागली दोन वर्षे देणेकर्‍यांचे हक्काचे पैसे देऊ शकत नाही, म्हणून सुप्रिम कोर्टाच्या आदेशान्वये गजाआड पडलेला आहे. झी नेटवर्कच्या संपादकाला तर जिंदाल नावाच्या उद्योगपती राजकीय नेत्याने चोरट्या कॅमेराने खंडणी मागतानाच चित्रित केले आणि काही दिवस गजाआड पडायची वेळ आली. कोळसा घोटाळ्यात फ़सलेल्या त्या उद्योगपतीच्या संदर्भातल्या बातम्या वगळण्यासाठी व थांबवण्यासाठी शंभर कोटी रुपयांच्या जाहिराती द्याव्यात, असा सौदा करायला हे संपादक महोदय एका हॉटेलात बोलताना चित्रीत केलेले होते. ही आजच्या राष्ट्रीय पत्रकारितेची अवस्था आहे. 

प्रसार माध्यमांना प्रचार माध्यमे बनवण्याच्या कारस्थानातून हे घडत बिघडत गेले. त्याला कुठलाही बुद्धीवाद वा पावित्र्याचा विधीनिषेध राहिला नाही. आपण सांगू तीच बातमी व आपण दाखवू तेच सत्य, अशा मस्तवालपणातून एकप्रकारची सुपारीबाजी व गुंडगिरीच बोकाळत गेली. व्यक्तीगत चारित्र्यहनन वा बदनामी ही पत्रकारितेची हत्यारे बनत गेली. पर्यायाने पत्रकरिताच मारेकर्‍यांची टोळी बनत गेली. सार्वजनिक आयुष्यात सर्वच माणसे शुचिर्भूत नसतात आणि काहीतरी त्यांच्याकडून गडबड झालेली असते. त्याचे भांडवल करून त्यांना सतावण्याचे हत्यार अशी एकूण माध्यमांची उपयुक्तता बनत गेली. त्याचा पाया मात्र राजकीय बांधिलकीच्या आहारी गेलेल्या बेताल पत्रकारितेने केला. संपादकच राजरोस उचापती करू लागल्यावर खालच्यांचा कान पकडायला कोणी राहिला नाही, की संपादकांना तितके नैतिक धैर्य उरले नाही. विसाव्या शतकाच्या अखेरीस ‘महाराष्ट्र टाईम्स’सारख्या मान्यवर पत्रातील एका वार्ताहराला मंत्रालयातच आमदाराकडे खंडणी मागताना रंगेहाथ पकडले गेले. तेव्हा खरी मराठी पत्रकारितेची कसोटी लागली. कारण त्याची बातमी कुठल्याही वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली नाही. पण तोंडी इतका गवगवा झाला होता, की त्या वर्तमानपत्राला त्याचा जाहिर खुलासा मात्र संपादकाच्या नावाने द्यावा लागला होता. जी बातमीच छापली नाही, त्याविषयी खुलासा कशाला द्यायचा? झाकलेली अब्रु गेल्याचा तोच पुरावा नव्हे काय? पण सवाल एकट्या ‘महाराष्ट्र टाईम्स’चा नाही. बाकीच्या कुठल्याच वर्तमानपत्राने ही साधी बातमी कशाला छापली नाही? माफ़ियाच्या भाषेत त्याला ओमर्टा म्हणतात. एकमेकांशी कितीही लढू वा परस्परांचे मुडदे पाडू. पण कुठल्याही परिस्थितीत पोलिसांची मदत घ्यायची नाही, की आपसातील रहस्ये जगापुढे आणायची नाहीत, अशी शपथ अमेरिकन माफ़िया टोळीतल्या प्रत्येकाला घ्यावी लागते. ‘महाराष्ट्र टाईम्स’च्या शिरीष निपाणीकरला खंडणी प्रकरणी पकडल्यावर मराठी पत्रकारितेने ओमर्टाचीच साक्ष दिली नाही काय? मराठीतल्या मान्यवर दैनिकाचा वार्ताहर खंडणी घेताना पकडला गेला, त्यावर एकजात मौन कशाची साक्ष होती? मग खुलासा तरी काय आला? निपाणीकर त्यांच्या संपादक मंडळातला कुणी नोकरीतला पत्रकार नाही, तर प्रासंगिक स्थनिक बातम्यांसाठी नेमलेला वार्ताहर होता. सगळे पाप व गुन्हा त्याचा होता. बाकीचा ‘महाराष्ट्र टाईम्स’ व अन्य मराठी पत्रे धुतल्या तांदळासारखी पवित्र असल्याचाच देखावा त्यातून उभा करण्यात आला. पण म्हणून लोकांनी त्यावर विश्वास ठेवला असेल काय?

ज्याची साधी बातमीही कुठल्या वर्तमानपत्रात आली नाही, त्याचा खुलासा ठळकपणे द्यावा लागला, यातच पत्रकारितेच्या विश्वासार्हतेचे वाजलेले दिवाळे दिसून येते ना? कारण भले बातमी प्रसिद्ध झाली नसेल, पण गवगवा झालेला होता आणि सत्य किमान प्रमाणात का होईना वाचकांपर्यंत झिरपले होते. पुढल्या काळात झिरपण्याची गती वाढत गेली आणि माध्यमांनी लपवलेल्या बातम्या व सत्य, सामान्य लोकांना सहज उपलब्ध होऊ शकेल असे पर्यायच समोर येत गेले. त्यातून मग पत्रकारितेची उरलीसुरली विश्वासार्हता व गरज संपून गेली. नरेंद्र मोदी यांचा लोकसभेतील प्रचंड विजय हा राजकारणात सेक्युलर पक्षांचा भले पराभव असेल. पण विश्वासार्हतेच्या क्षेत्रात तो पत्रकारितेचा सर्वात दारूण पराभव आहे. मोदी भले कॉग्रेसमुक्त भारत बोलले असतील, पण व्यवहारात त्यांनीच पुढाकार घेऊन भारतीय माध्यमे पत्रकारितेला जणू निकालातच काढले. भारतीय समाजाला माध्यमांच्या गुलामीतून मुक्त केले, असेही म्हणता येईल. ज्या माध्यमातून मोदींना संपवण्याचा राजकीय डाव आधीच्या बारा वर्षात खेळला गेला, तोच माणूस माध्यमे व पत्रकारांना वाळीत टाकून देशातली सर्वात मोठी निवडणूक लिलया जिंकू शकला, हा म्हणूनच भारतीय पत्रकारितेचा सर्वात मोठा दारूण पराभव होता व आहे. २००२ च्या गुजरात दंगलीपासून माध्यमांनी व प्रामुख्याने त्यात दबा धरून बसलेल्या पुरोगामी पत्रकारांनी मोदींना लक्ष्य केलेले होते. मोदी व गुजरातच्या दंगलीचा आडोसा करून दिल्लीतील भाजपाचे राष्ट्रीय वर्चस्व संपवण्याचे राजकारण पक्षांपेक्षा माध्यमातून अधिक खेळले गेले. तरीही मोदींनी पुढल्या तीन निवडणूका गुजरातमध्ये जिंकल्या व तेच देशाच्या पंतप्रधान पदावर दावा करायला पुढे सरसावले. बारा वर्षे गुन्हेगार, मारेकरी वा खोटारडा म्हणून माध्यमे ज्याच्या मागे बदनामी करत हात धुवून लागली होती, त्याने इतकी मजल मारणे सोपे नव्हते. मात्र नुसता दावा करून न थांबता मोदींनी बहूमत मिळवण्याचा पराक्रमही केला. म्हणून त्याला पत्रकारितेचा दारूण पराभव म्हणावे लागते. कारण आधीच्या बारा वर्षात राजकीय पक्षांपेक्षा अधिक मोठे राजकारण मोदी विरोधात माध्यमे व पत्रकार करत होते. त्याची पुर्ण कल्पना असलेल्या मोदींनी म्हणून की काय पत्रकारांचीही विश्वासार्हता संपवण्याचा चंग बांधूनच लोकसभेची मोहिम राबवली. या काळात माध्यमांनी व पत्रकारांनी काय केले, ते त्याच्या खुप आधी ‘महाराष्ट्र टाईम्स’चे असताना कुमार केतकरांनी वर्तवलेले भाकित म्हणावे तसे लिहून ठेवलेले होते. 

‘सध्यातरी भारतात न्यायालयीन शुचिर्भूततेचा इतका दरारा तयार झाला आहे, की जामिन नाकारला जाणे याचा अर्थ गुन्हा सिद्ध झाला आहे, असा समज करून दिला जात आहे. त्याचप्रमाणे वृत्तपत्रांनी एखाद्या संस्थेला वा व्यक्तीला लक्ष्य केले, की त्याच्यावरील आरोप पुर्णत: सिद्ध झाले आहेत, असेही मानण्याची प्रथा पडली आहे. ‘शोधक पत्रकारिता’ हा या व्यवसायातील शहाजोगपणाचा नमूना ठरू पहात आहे. पत्रकारांनी व्यवस्थेवर अंकुश ठेवावयास हवा, परंतु परकारितेवर तो कोण ठेवणार? अजून तरी प्रेस कौन्सिल, न्यायालये किंवा पत्रकारांच्या संस्था याबाबत कोणतेही मानदंड निर्मांण करू शकलेले नाहीत.’

१६ आक्टोबर १९९६ च्या मटामधील ‘हितोपदेश’ शीर्षकाच्या अग्रलेखातील हा उतारा आहे. तेव्हा मोदी गुजरातच्याही सत्ताकारणात नव्हते आणि वाहिन्यांचेही पेव फ़ुटलेले नव्हते. पण केतकरांसारख्या व्यासंगी जाणत्याला पत्रकारिता कुठल्या दिशेने व किती वेगाने दिशाहीन भरकटत चालली आहे, त्याचा अंदाज आलेला होता. रमेश किणी मृत्यूच्या निमीत्ताने त्याचा अनुभव केतकरांनी संपादक म्हणून घेतला होता. पण पुढल्या काळात जसजशी माध्यमांची साधने व सुविधा वाढत गेल्या, तसतसा असल्या घसरगुंडीला धरबंदच राहिला नाही. आपण ठरवू ती दिशा व आपण सांगू तेच सत्य, इतक्या थराला पत्रकारांची मस्ती जाऊ लागली. ते बघणार्‍या व वाचणार्‍यालाही खटकत होते. राजकीय नेतेही भयभीत झालेले होते. पत्रकारिता जणू भस्मासूर झाल्यासारखा बेताल होत गेला. त्याला पर्याय आवश्यक होता. पण तो सोपाही नव्हता. नवे वृत्तपत्र काढणे वा पुढल्या काळात वाहिनीसारखे साधन उभे करणे, सामान्य माणसाला शक्य नव्हते. पण म्हणून पर्याय येणारच नाही असेही नसते. नरसिंहाचा अवतार कसा झाला? तसाच मग सोशल मीडिया नावाचा पर्याय साकारत गेला. बटू वामनाचा अवतार कसा किंचित आकाराने समोर आला आणि जग व्यापून शिल्लक उरला, तसा माध्यमांच्या भस्मासूराला पर्याय उभे रहात गेले. जितकी मुख्यप्रवाहातील माध्यमे अधिक बेताल होत गेली, त्यांना ही विस्कळीत व असंघटित सामाजिक माध्यमे पर्याय म्हणून पुढे येत गेली. नरेंद्र मोदींसारख्या धुर्त राजकारण्याने त्याचा चतुराईने वापर करून घेतला. पहिल्या पाचसहा वर्षात मोदींनी आपल्यावरील दंगलीचे बालंट पुसण्याचा कसोशीने प्रयत्न केला. पण त्याचा उपयोग झाला नाही. झोपलेल्यांना उठवता येते, पण झोपेचे सोंग घेणार्‍यांना जागवता येत नाही. मोदींना हे लक्षात आल्यावर त्यांनी आपल्या सफ़ाई व संपर्कासाठी सोशल माध्यमाचा सरसकट वापर सुरू केला. त्यातून आपले इतके अनुयायी व प्रचारक देशाच्या कानाकोपर्‍यात निर्माण केले, की त्यांच्यापुढे छपाई व वाहिन्यांचे माध्यम खुजे वाटू लागले. ह्या सामर्थ्यावर मग लोकसभेची लढाई लढताना मोदींना मुख्यप्रवाहातील माध्यमांची गरजच उरली नाही. उलट मोदींच्या लोकप्रियतेचा लाभ उठवण्यासाठी याच माध्यमांना मोदींचा पाठपुरावा करण्याची नामुष्की आली. तेव्हा त्यांच्यातल्या नामवंत संपादक वा पत्रकारांना खड्यासारखे बाजूला ठेवून मोदींनी साध्या प्रचाराच्या मुलाखतीही नाकारण्याचे धाडस केले. 

माध्यमातून राजकारण खेळले जाण्याच्या बदमाशीला मोदींनी दिलेला तो शह होता. कारण आदल्या वर्षभरात मोदींना पराभूत व नामोहरम करण्याचे राजकारण हेच पत्रकार खेळत होते. कर्नाटकातील भाजपाचा पराभव मोदींना खच्ची करणारा ठरवण्यासाठी बौद्धिक कसरती झाल्या. मग चार राज्यापैकी दिल्लीतच भाजपाचे बहुमत हुकले होते. तर मोदींचा करीष्मा शून्य असे भासवण्याची पत्रकारात स्पर्धाच झालेली होती आणि दिल्लीत यश मिळवलेल्या नवख्या केजरिवाल यांना मोदींचे लोकसभेचे प्रतिस्पर्धी म्हणून पेश करण्याचा विडा उचलला गेला होता. डिसेंबर ते मार्चपर्यंत केजरीवाल यांनाही घोड्यावर बसवून लोकसभेच्या मैदानात उतरवण्याचे राजकारण अन्य कोणाचे होते? ह्या सर्वातून मोदींना पराभूत करणे माध्यमातील या बांधिल पुरोगाम्यांना साधले नाही. पण त्यांच्या याच राजकारणाने पत्रकारितेची सगळी़च विश्वासार्हता पुरती लयाला गेली. त्याच दरम्यान नवनवी प्रसार साधने लोकांच्या हाती येत होती आणि सामान्य माणसालाही आपले मत खुलेपणाने कुठेही व केव्हाही मांडायला परवडणारी व्यवस्था मिळत गेली. तिचा उपयोग मोदी व त्यांच्या अनुयायांनी इतका केला, की मुख्यप्रवाहातील माध्यमांना आता त्याच सोशल माध्यमांच्या मागे मागे फ़रफ़टावे लागते आहे. एका बाजूला माध्यमे व पत्रकारिता बेताल होत गेली आणि त्याला वैतागलेल्या सामान्य माणसाच्या हाती अन्य साधने येत गेली. तो एकाच काळातला बदल असल्याने इतका मोठा आमुलाग्र बदल होऊ शकला. कारण आता याच प्रमुख माध्यमांची तपासणी नित्यनेमाने सामान्य माणुस करू शकतो आहे व नेमक्या चुकांवर आणि खोटेपणावर राजरोस बोट ठेवू लागला आहे. त्याला गप्प करणे माध्यमातील संपादक वा पत्रकारांना शक्य उरलेले नाही. शिरीष निपाणीकरचे वृत्त जसे झाकून ठेवले, तसे आता करता येत नाही. कारण माध्यमातून झाकलेले विनाविलंब सोशल माध्यमात झळकू लागते आणि त्याचा अधिक गाजावाजा झाल्याने मग मुख्यप्रवाहातील पत्रकारांना तो विषय घ्यावा लागतो. त्यात पुन्हा चलाखी झाली तर त्याचीही झाडाझडती वा पोस्टमार्टेम खुलेआम होते. असे पोस्टमार्टेम लोकप्रियतेचा कळस गाठते, अशी अवस्था आहे. काही ब्लॉग वा व्यक्तीगत मतप्रदर्शनाला तर अनेक वाहिन्या वा दैनिकांपेक्षा अधिक मान्यता या सोशल माध्यमात मिळालेली आहे. त्याची लोकप्रियता व प्रसार वाढतो आहे, तितक्या प्रमाणात सर्वच मुख्य माध्यमांचे व्यवसाय व हिशोब बिघडत चालले आहेत. मात्र त्यासाठी अन्य कोणाला जबाबदार धरता येणार नाही. मागल्या तीन दशकातील राजकीय बांधिलकीच्या जोखडात बांधली गेलेली पत्रकारिता व त्यातून आलेल्या बेतालपणाचे ते दुष्परिणाम आहेत. कुमार केतकरांनी एकोणिस वर्षापुर्वी सुचवले होते त्याचा अवलंब झाला असता, तर ही वेळ आली असती का? त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर कोणी दिले नाही. पण उत्तर टाळल्याने प्रश्न संपत नाही. उलट अधिक गंभीर बनतो. गुंतागुंतीचा होऊन जातो. आज जी पत्रकारिता म्हणून मिरवले जाते त्याला केतकर म्हणतात, तसे निव्वळ शहाजोगपणा म्हणावे लागते, ज्याच्यावर लोकांचा अजिबात विश्वास उरलेला नाही.

एकट्या कुमार केतकरांनाच तो धोका दिसला नव्हता. पत्रकारितेचे व अविष्कार स्वातंत्र्याचे दुसरे लढवय्ये शूरवीर निखील वागळे यांनी केतकरांपेक्षा अधिक स्पष्ट शब्दात येऊ घातलेल्या संकटाचे वर्णन केलेले होते. मात्र त्यांनाही त्याच मायाजालात फ़सण्याचा मोह आवरता आला नाही. १५ आक्टोबर १९९६ रोजी लिहीलेल्या कॅलिडोस्कोप या ‘महानगर’च्या साप्ताहिक स्तंभात वागळे काय म्हणतात वाचा,

 ‘आज दिनांक’च्या मृत्यूच्या निमीत्ताने वृत्तपत्रसृष्टीला लागलेल्या एका रोगाकडे मला सगळ्यांचं लक्ष वेधायचं आहे. भ्रष्ट पैशावर उभं रहाणारं ‘आज दिनांक’ हे काही एकमेव वृत्तपत्र नाही. आज संपुर्ण देशात अशा वृत्तपत्रांची लाट आली आहे. उद्योगपती, व्यापारी, राजकारणी, दारूवाले, ट्रकवाले, हॉटेलवाले यांच्याकडे वाममार्गाने मिळवलेला पैसा मुबलक आहे. हा पैसा वृत्तपत्रात घालून प्रतिष्ठा किंवा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न यापैकी अनेकजण करत आहेत. उत्तरेतल्या राज्यात तर अशा दैनिकांचं थैमान चालू आहे. एकट्या दिल्लीत उदाहरणादाखल तीन-चार नावं सांगता येतील. राष्ट्रीय सहारा, कुबेर टाईम्स, जेव्हीजी टाईम्स ही अलिकडच्या काळात जन्माला आलेली काही वृत्तपत्रं. यामागे चिटफ़ंडवाल्यांचा पैसा आहे. गरीब जनतेकडून मोठ्या लाभाचं गाजर दाखवून पैसा मिळवायचा आणि चिटफ़ंड निर्माण करायचे. नंतर हा पैसा वेगवेगळ्या धंद्यात गुंतवून स्वत:चं उखळ पांढरं करून घ्यायचं. हा उद्योग अनेकांनी आरंभला आहे. गरीबाला आवाज नसतो यावर यापैकी बहुतेकजणांचा विश्वास आहे. म्हणूनच पैसे परत मागणार्‍यांना ते न देण्याची हिंमत ही मंडळी दाखवतात. वृत्तपत्राच्या जोरावर मिळवलेल्या ताकदीचा उपयोग सरकारी अधिकार्‍यांना दाबण्यासाठी आणि आपले गैरव्यवहार झाकण्यासाठी ते करून घेतात. हजारो रुपये पगार देवून पत्रकारांना नोकर्‍या द्यायच्या, त्यांना गाड्या पुरवायच्या आणि छानछोकीच्या आयुष्याची चटक लावायची, असाही प्रकार ही मंडळी करतात. पत्रकार अचानक झालेल्या सुखप्राप्तीने खुश होतो आणि आपलं लेखन स्वातंत्र्य गमावून बसतो. हळूहळू राजकीय दलालीसाठी त्याचा वापर केला जातो. आपण कुणासाठी काम करतो आहोत, कशासाठी वापरले जात आहोत, याचं भान त्याला रहात नाही. वृत्तपत्राच्या जोरावर अनेक गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवाया ही मालक मंडळी करतात. राष्ट्रीय सहारा हे वृत्तपत्र याचं जळजळीत उदाहरण आहे. वृत्तपत्रसृष्टीत येणारा हा भ्रष्ट पैसा वेळीच रोखला नाही तर आपल्या सगळ्या स्वातंत्र्याचा बळी देण्याची पाळी पत्रकारांवर येईल. याचा पहिला फ़टका छोट्या वृत्तपत्रांना बसेल. देशातल्या बड्या वृत्तपत्रांची सुत्रं पत्रकारांच्या हातात कधीच नव्हती. त्यात आता छोट्या वृत्तपत्रांचाही बळी गेला तर सगळीच आशा संपून जाईल. युरोप अमेरिकेत रुपर्ट मर्डोकासारख्या बदमाशाने घातलेला हैदोस वृत्तपत्रसृष्टी अनुभवते आहे. आपल्याकडे सध्या दिसताहेत त्या याच मर्डोकच्या गावठी आवृत्त्या. म्हणूनच वृत्तपत्र स्वच्छ पैशावर कशी उभी रहातील याचा विचार झाला पाहिजे.’ .... ‘आज दिनांक’च्या मृत्यूच्या निमीत्ताने या गोष्टींचा गंभीरपणे विचार झाला तर बरंच काही साध्य होईल. नाहीतर नाटकं होतील, तमाशे होतील, हौतात्म्याचा आव आणला जाईल, पण वृत्तपत्रसृष्टीच्या पदरात काही पडणार नाही. म्हणून अंतर्मुख होऊन हा मृत्यू तपासायला हवा. असा मृत्यू आणखी कुणाच्याही नशिबी येऊ नये, या दिशेने ठोस प्रयत्न व्हायला हवेत. इमारत बांधण्यापुर्वी तिचा पाया मजबूत करणं शहाणपणाचं नाही काय?’

थोडक्यात पत्रकारितेला ग्रासायला आलेला विकृत भ्रष्ट पैसा व गुन्हेगारी प्रवृत्ती सर्वांना दिसत होती आणि तिच्या विरोधात आक्रमकपणे भाषणे देणारेच पुढल्या काळात प्रत्यक्षात त्याचे भागिदार व्हायला उतावळेपणाने धावत सुटले. केतकर असोत किंवा वागळे असोत. आजही ते पत्रकारितेचे पावित्र्य वा अविष्कार स्वातंत्र्याच्या गमजा करीत असतात. पण प्रत्यक्षात तो निव्वळ शहाजोगपणा असतो. नाटके, तमाशे व हौतात्म्याचा आव नक्की असतो. पण त्यात किंचितही सच्चाई वा प्रामाणिकपणा उरलेला नाही. किंबहूना आजची पत्रकारितेची अगतिकता व दुर्दशा करण्याला असेच म्होरके जबाबदार आहेत, म्हटल्यास वावगे ठरू नये. कुठल्याही स्वातंत्र्याला कुणी बाहेरचा आक्रमक येऊन संपवू शकत नाही वा गुलाम करू शकत नाही. तो दगाफ़टका आतूनच घरभेद्याने करावा लागतो, असे अब्राहम लिंकन यांच्यासारखा विचारवंत राजनितीज्ञ म्हणतो. ज्या अजाण व निरागस पत्रकारांना आजही पत्रकारिता शुचिर्भूत व स्वयंभू असावी असे वाटते, त्यांच्यासाठी लिंकनचे तेच शब्द मार्गदर्शक ठरू शकतील. म्हणूनच लिंकनचे नेमके शब्द सांगून हे पुराण संपवतो. ते वाचा, समजून घ्या आणि ठरवा स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे की आत्महत्येने संपायचे?

"Shall we expect some transatlantic military giant to step the ocean and crush us at a blow? Never! All the armies of Europe, Asia, and Africa combined, with all the treasure of the earth (our own excepted) in their military chest, with a Bonaparte for a commander, could not by force take a drink from the Ohio or make a track on the Blue Ridge in a trial of a thousand years. At what point then is the approach of danger to be expected? I answer. If it ever reach us it must spring up amongst us; it cannot come from abroad. If destruction be our lot we must ourselves be its author and finisher. As a nation of freemen we must live through all time or die by suicide."  - Abraham Lincoln

२ टिप्पण्या: