शनिवार, २० ऑक्टोबर, २०१२

केजरिवाल, शिसोदिया; दमाणिया दमानी घ्या




  आठदहा वर्षापुर्वी जेव्हा नव्यानेच भारतात नव्या उपग्रह वाहिन्यांचे पेव फ़ुटले तेव्हा ‘सास भी कभी बहू थी’ नावाची मालीका खुप गाजत होती. मला त्या नावाचेच वैचित्र्य वाटायचे. त्याच वेळी नव्याने एकदोन वृत्तवाहिन्या सुरू झाल्या होत्या. स्टार वाहिन्यांचे जाळे सर्वात आघाडीवर होते. त्यांची स्टारन्युज आणि त्यांच्या मागोमाग निघालेल्या झी न्युज अशा दोनच वृत्तवाहिन्या होत्या. मग त्यातूनच फ़ुटून अनेकांनी हिंदी-इंग्रजी वाहिन्या सुरू केल्या. त्यांचे प्रादेशिक भाषेतही जाळे पसरत गेले. पण आरंभीच्या त्या कालखंडात एका वाहिनीवर एका वृद्ध हिंदी भाषिक पत्रकाराने केलेली भविष्यवाणी माझ्या कायम स्मरणात राहिली आहे. कोणी महिला वार्ताहर त्याचे कुठल्या तरी विषयावर मत विचारत होती, तर तो म्हणाला, ‘आता आपल्या देशामध्ये टेलिव्हीजनचा जमाना आलेला आहे. त्यामुळे आपण सगळेच चारित्र्यहीन बनून जाणार आहोत. यापुढे कोणीही चारित्र्य व पावित्र्याचा दावा करू शकणार नाही.’ त्याला आता दहा वर्षे तरी होऊन गेली असावित. आणि आज ज्या भानगडी रोजच्या रोज वाहिन्यांवरून उजेडात आणल्या जात आहेत व त्यांचे खटले वाहिन्यांच्या चव्हाट्यावर चालू आहेत, तेव्हा त्या वृद्ध पत्रकाराचे शब्द एखाद्या भविष्यवाणी सारखे वाटू लागतात. कारण आता कुठलाही कागद पुरावा असतो आणि कोणीही गुन्हेगार असतो. फ़क्त तुम्ही आरोप करण्याची आणि तुमचा आरोप थेट वाहिनीवर प्रक्षेपित करण्याची सुविधा तुमच्यापाशी असली पाहिजे.

   आता त्या रॉबर्ट वड्रा याचीच गोष्ट घ्या. त्याच्यावर जे आरोप होत आहेत व त्यासाठी कागदपत्रे दाखवली जात आहेत; त्यात काहीच नवे नाही. अण्णा हजारे यांच्यापासून विभक्त झालेले सहकारी अरविंद केजरीवाल यांनी पहिल्या दिवशी आरोप करताना जे काही कागदपत्र समोर आणले, त्यात नवे किंवा गुप्त असे काहीच नव्हते. तो तपशील व कागदपत्रे वर्षभर सगळ्या प्रमुख वृत्तपत्रे व माध्यमांकडे पोहोचलेली आहेत. पण कोणाही मोठ्या माध्यमाने त्यावर चकार शब्द बोलला नव्हता. केजरीवाल यांनी माध्यमांना उल्लु बनवून थेट प्रक्षेपणाची सोय केली नसती; तर आजही वड्राचे प्रकरण गुलदस्त्यामध्ये राहिले असते. आपण काही मोठ्या गौप्यस्फ़ोट करणार असल्याची हवा निर्माण करून; केजरीवाल यांनी वाहिन्यांना गाफ़ील पकडले. थेट प्रक्षेपण सुरू झाल्यावर त्यांनी वड्राच्या शिळ्या कढीला ऊत आणला. पण सोनिया व त्यांच्या जावयाचे नाव प्रक्षेपित झाल्यावर कुठल्या वाहिनीला प्रक्षेपण थांबवता येणार नव्हते. त्यामुळेच मग माध्यमांची गोची झाली. कारण त्यांनीच हाताशी माहिती असून वर्षभर दडपून ठेवलेली ही भानगड चव्हाट्यावर आली. मग सलमान खुर्शिद यांचेही तसेच प्रकरण उघडकीस आणले गेले. त्यात सुद्धा नवे काहीच नाही. त्याच्याही पुढे भाजपाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांचे फ़ुसके प्रकरण आहे. कारण त्यात वशि्लेबाजी असली तरी भ्रष्टाचार म्हणावे असे काहीच नाही. कारण सत्तेत असल्याचे अनेक फ़ायदे प्रत्येकजण घेत असतो. तसेच ज्याला किरकोळ लाभ गडकरी यांनी घेतले आहेत. त्यालाच भयंकर भ्रष्टाचार म्हणायचे असेल, तर आज अवघा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणार्‍या तमाम मोठ्या वाहिन्या किंवा वृत्तपत्रांच्या वाट्याला काय काय आले, त्याचाही पाढा वाचावा लागेल. पत्रकार वा माध्यमांनीही सत्ताधार्‍य़ांच्या मदतीने आपली कितीतरी तुंबडी भरली आहे, सवलतीच्या किंमतीमध्ये भूखंड घेऊन त्याचा व्यापारी वापर करणारी माध्यमे कमी नाहीत. मंत्रालयासमोरच बॅकबेवर दोन इंग्रजी वृत्तपत्रांच्या उंच इमारती उभ्या आहेत. त्यांना ज्या कार्यासाठी ते भूखंड देण्यात आले, तिथे त्यांचे तेच काम चालते का? की उंच इमारती उभ्या करून पत्रकारिता अन्यत्र अडगळीच्या जागेत टाकून देण्यात आली आहे?

   तळे राखी तो पाणी चाखी असे आपले बापजादे म्हणत आले. तेव्हा सत्तेच्या इर्दगिर्द वावरणारे सत्तेचे थोडेफ़ार लाभ उठवणार, हे मान्यच करायला हवे. पण तळे राखताना जर कोणी पंप लावून सगळे तळेच उपसू लागला, तर बोंब ठोकायची वेळ येत असते. आणि पाणी चाखणारा आणि पंपाने पाणी उपसणारा यात फ़रक करावा लागतो. पण त्याचेही आज कोणाला भान उरलेले नाही. म्हणूनच कशाला काय म्हणायचे; याचाही गोंधळ माजलेला आहे. एकीकडे तळे पंप लावून उपसल्यावरही न थांबता तळ्यातला गाळ काढणारे आणि त्याच्याही पुढे जात भराव घालून तळेच बुजवणारे आहेत. तर दुसरीकडे तळ्याचे पाणी चाखले त्यांनाही त्यांच्याच पंक्तीमध्ये बसवले जाणार असेल; तर मग आता आपल्या देशात सगळीच बजबजपुरी माजली म्हणावी लागेल. कधीकधी असे वाटते, की जाणिवपुर्वक अशी दिशाभूल चालली आहे काय? ओळखीचा वा सोयीचा फ़ायदा घेणे आणि गैरफ़ायदा घेणे यात फ़रक करण्याचा विवेक असायलाच हवा. त्याचे भान सुटले मग संपले. ज्या कारणास्तव गडकरी यांच्यावर आरोप केले जात आहेत, त्यासाठी ते दोषी असतील, तर मग कुठल्याही विश्वस्त निधी, सामाजिक संस्था किंवा संघटना यांना सार्वजनिक व्यवस्थेकडून दिली गेलेली प्रत्येक मदत भ्रष्टाचारच ठरतो. मग त्यात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला मिळालेल्या जमीनीपासून सर्वच संस्थांना व त्यांच्या संचालकांना गुन्हेगारीच्या पिंजर्‍यात उभे करावे लागेल.

   अर्थात केजरीवाल यांनाही हे सर्व कळते. पण त्यांना राजकारणात उतरायचे आहे आणि तसे करताना आपणच धुतल्या तांडळासारखे स्वच्छ आहोत; असा आभास त्यांना निर्माण करायचा आहे. तेव्हा सत्ताधारी पक्षासोबतच प्रमुख विरोधी पक्ष बदनाम केला नाही, तर आपल्या धडपडीचा लाभ विरोधी पक्षाला मिळेल अशी त्यांची भिती आहे. म्हणुनच कॉग्रेस व भाजपा यांना एकाच तागडीने तोलण्यासाठी त्यांनी गडकरी यांचा फ़ुसका बार उडवला आहे. त्यालाही हरकत नाही. पण अशा थिल्लरपणामुळे त्यांच्या आरोपबाजीमधले गांभिर्य संपून गेले आहे. कारण गडकरी यांनी तात्काळ आपल्यावरील आरोपाची चौकशी करा आणि हवे तर आपल्याविरुद्ध खटले भरा; असे प्रतिआव्हान दिले आहे. रोजच सनसनाटी माजवण्याच्या नादी लागलेल्या वाहिन्यांना असे आरोप खुप आवडत असले तरी सामान्य माणसाचे डोके ठिकाणावर असते. गर्दी व सतत प्रसिद्धीच्या आहारी गेल्याने केजरीवाल विषयाचे गांभिर्य संपवून टाकत आहेत. त्यामुळेच भ्रष्टाचार विरोधी लढ्याची धार बोथट झाली आहे. पण त्याला महत्व नाही. कारण केजरिवाल किंवा माध्यमे काय सांगतात, त्यापेक्षा आपल्या विवेकबुद्धीला काय पटते यावरच लोक निर्णय घेत असतात.

   यात एबीपी माझा या वाहिनीने दोन शेतकर्‍यांकडे धाव घेतली आणि केजरिवाल पुरते उघडे पडले. कारण खुर्सापुर नामक ज्या गावातल्या घाडगे व भगत अशा दोन शेतकर्‍यांच्या जमीनी गडकरी यांनी लाटल्याचा आरोप केज्रिवाल यांनी केला, त्या दोघांशी ‘माझा’ वाहिनीच्या प्रतिनिधींनी थेट संपर्क साधला. तर त्या दोघांनी आपले गडकरी वा त्यांच्या संस्थेशी कुठले भांडण नाही, त्यांनी आपली जमीन लाटली नाही; असे स्पष्टच सांगून टाकले. तेवढेच नाही तर सरकारने त्यांच्या अधिगृहित जमीनीचा ताबा संस्थेला दिला असतानाही संस्थेने या दोन्ही शेतकर्‍यांना ती जमीन तशीच कसू दिल्याचेही निष्पन्न झाले. याचा अर्थच केजरीवाल पुरते खोटे पडले आणि गडकरी यांच्यावर त्यांनी केलेले आरोप निराधार असल्याचे स्पष्ट झाले. अर्थात त्याचा अर्थ गडकरी एकदम स्वच्छ चारित्र्याचे आहेत, असे मानायचे कारण नाही. युतीच्या काळात मंत्री असताना त्यांनी जी सत्ता भोगली त्याचे भरपूर लाभ त्यांनी घेतलेले आहेत. त्यातूनच त्यांना आजचे वैभव प्राप्त झाले आहे, याबद्दल दुमत होण्याचे कारण नाही. मात्र गुन्हेगारी स्वरूपाचे काही त्यांनी केले, असा केजरिवाल यांचा दावा तद्दन खोटा आहे. खरे सांगायचे तर तो खोटाच असणार याची मला तरी खात्री होती. कारण हा सगळा आरोप अंजली दमाणिया या महिलेच्या प्रयत्नातून झालेला आहे. दोनतीन आठवड्यापुर्वी ही महिला अचानक वाहिन्यांवर झळकू लागली. तोवर कधी तिचा चेहरा वाहिन्यांनी दाखवला नव्हता. जेव्हा प्रथमच त्यांनी गडकरी यांच्यावर आरोप केला तेव्हापासून त्यांची देहबोलीच त्यांचा खोटेपणा दाखवत होती. झी वाहिनीच्या एका कार्यक्रमात विरोधी नेते एकनाथ खडसे यांच्यासह अंजली दमाणीया समोरासमोर आल्या; तेव्हाच त्यांचा खोटेपणा उघड झाला होता.

   ज्या कागदपत्रांचा दाखला देऊन दमाणिया आरोप करीत होत्या, त्यात त्यांचाच स्वार्थ लपून रहात नव्हता. त्यांनी बेकायदा खरेदी केलेली जमीन धरणाच्या क्षेत्रामध्ये बुडीत जाणार असल्याने, ती वाचवण्यासाठी त्यांनी आधी राजकीय नेत्यांकडे धाव घेतली. विरोधी नेते म्हणून भाजपाने त्यांना मदतही केली. त्यात कुठेही गडकरी यांचा संबंध येत नव्हता. विरोधी नेते खडसे आणि भाजपा आमदार देवेंद्र फ़डणिस यांनी दमाणीयांना मदतही केली. पण तेवढ्याने त्यांचे काम झाले नाही. तेव्हा कायदेबाह्य मार्गाने व वशिल्याने आपली जमीन वाचवण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले. त्यातच त्या गडकरी यांच्यापर्यंत पोहोचल्या असाव्यात असे दिसते. अजितदादांवर दडपण आणुन आपली जमीन वाचवण्यात गडकरी यांनी मदत करावी; अशी त्यांची अपेक्षा असावी. अन्यथा त्यांनी गडकरी यांच्याकडे जाण्याचे कारणच स्पष्ट होत नाही. गडकरी-पवार यांच्या संबंधांचा त्या सतत उल्लेख करतात, या व्यवहारी संबंधाचा वापर त्यांची जमीन सोडवण्यासाठी गडकरी यांनी केला नाही; म्हणून चिडून जाऊन दमाणीया उलटल्या, असाही याचा अर्थ निघू शकतो. कारण खडसे यांनी आमनेसामने बोलताना त्यांना खुले आव्हान दिले होतेच. पण त्याचवेळी दमाणीया कशा स्वार्थाने प्रेरित झाल्या आहेत, त्याचाही पर्दाफ़ाश खडसे यांनी केला होता. आपली जमीन धरणातून वाचवावी आणि बदल्यात जवळचीच आदिवासीची जमीन ताब्यात घ्यावी; असे त्यांचे पत्र उपलब्ध आहे. अशी महिला आज शेतकर्‍याच्या जमीनीसाठी गडकरी यांच्या विरोधात लढायला उभी राहिली, हाच एक विनोद नाही काय?

   गरीब शेतक‍याच्या जमीनी गडकरी यांच्या संस्थेने लाटल्या, असा त्यांचा आरोप आहे. पण त्या दोन्ही शेतकर्‍यांची नावे दमाणीयांनी पत्रकारांना दिल्लीत सांगितली, ते दोघे जमीन अजून आपणच कसत असल्याचा दावा करतात. तेवढेच नाही, तर कागदोपत्री ताबा गडकरी यांच्या संस्थेकडे असूनही त्यांनी जमीन कसू दिली, असेही मान्य करतात. म्हणजेच गरीब शेतकर्‍याच्या जमीनी लाटल्या; हा दमाणीयांचा दावा साफ़ खोटा पडतो. कारण कायद्याने शक्य असूनही संस्थेने त्या दोन्ही शेतकर्‍यांवर कुठलीही जबरदस्ती केलेली नाही. उलट त्यांना शक्य होईल तेवढी सवलतच दिली आहे. मग असा बिनबुडाचा आरोप केजरिवाल व दमाणिया का करतात, असा सवाल निर्माण होतो. दोघांचे हेतू वेगवेगळे आहेत. केजरिवाल यांना कॉग्रेसप्रमाणेच भाजपाही घोटाळेबाज असल्याचे दाखवायचे आहे. तर दमाणियांना आपली जमीन धरणाखाली जाण्यापासून वाचवण्यात गडकरींनी पवारांकरवी मदत केली नाही; त्याचा सूड घ्यायचा आहे. आणि त्यांचा तो सूडभावनेचा आवेशही लपणारा नाही. एकनाथ खडसे यांचाशी झालेल्या आमनेसामने कार्यक्रमापासून बुधवारच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेपर्यंत, दमाणिया यांचा आवेश म्हणजे उसने अवसान आहे; हे त्यांच्या एकूण शारिरीक हालचालीतूनच स्पष्ट होते. जेव्हा माणसाकडे आपल्या सत्यतेचे कुठलेच पुरावे व उत्तरे नसतात, तेव्हा तो तावातावाने उलटे आरोप करू लागतो किंवा प्रत्युत्तरे देऊ लागतो. दमाणियांचे बोलणे व त्यातला आवेश हा त्याचाच पुरावा आहे. आणि भगत व घाडगे या दोन्ही शेतकर्‍यांनी तो पुरता उघडा पाडला आहे.

   याचा अर्थ भाजपा हा धुतल्या तांदळासारखा स्वच्छ चारित्र्याचा पक्ष आहे; असे मानायचे अजिबात कारण नाही. सत्ता माणसाला भ्रष्ट करते हा सिद्धांतच आहे. तेव्हा कमीअधिक सता उपभोगलेल्या भाजपाला स्वच्छ चारित्र्याचा दावा करता येणार नाही. पण म्हणुन दिर्घकाळ सता उपभोगणार्‍या कॉग्रेसच्या निगरगट्ट नेत्यांशी भाजपाची तुलना करणेही लोकांची फ़सवणूक ठरेल. दारातले जास्वंदीचे झाड तोडणार्‍याची तुलना, वड किंवा पिंपळाचा वॄक्ष तोडणार्‍याशी करणे असाच तो प्रका्र आहे. ज्याप्रकारे रॉबर्ट वड्रा यांच्यासाठी कायदे वाकवण्यात आले किंवा सरकारी धोरणांची व निर्णयांची हेराफ़ेरी करण्यात आली, त्याकडे पाहिल्यास गडकरी यांचे प्रकरण नगण्यच म्हणायला हवे. आणि अशा फ़डतुस विषयाचे इतके अवडंबर माजवून केजरिवाल यांनी गेल्या वर्षभरात संपादन केलेल्या विश्वासाला तडा दिला आहे. त्यांच्यासारख्या चाणाक्ष माणसाला दमाणिया यांची देहबोली कळायला हवी होती. त्या महिलेचा आवेश व त्यांच्या कडची कागदपत्रे पाहिल्यास असे धा्डसी आरोप तोंडघशी पाडतील, हे सहज लक्षात येऊ शकते. कारण ज्या आधारावर गडकरी यांच्यावर आरोप झाले आहेत, त्याला भ्रष्टाचार वा घोटाळा म्हणायचा असेल तर सामान्य माणसाने कुठलीही सरकारी सवलत वा लाभ मिळवणेच घोटाळा ठरू शकतो.

   जलसंपदा घोटाळा, वड्रा प्रकरण, खुर्शिद यांनी लुटलेले अनुदान आणि कोळसा खाण वाटपातली नियमबाह्यता हा सरकारी अधिकाराचा गैरवापर होता. त्यात सरकारी धोरण कोणाला तरी लाभ मिळावा म्हणुन बदलण्यात आले किंवा लाभ घेण्यासाठी नवे धोरण आखण्यात आले. गडकरी यांच्या संस्थेची कहाणी तशी नाही. जे सरकारचे धोरण होते, त्यानुसार त्यांनी सवलती व लाभ घेतले आहेत. आणि तसे कोणी घ्यायचे नसतील तर त्या योजना योजल्याच कशाला जातात, असाही प्रश्न विचारणे भाग आहे. की राजकारणात असल्यावर कुठलेही कायदेशीर व्यवहारी लाभ घेता कामा नयेत, असे नियम आहेत का? मग आज केजरीवाल ज्या घरात वास्तव्य करतात, ते सरकारी घर आहे. कारण त्यांची पत्नी सरकारी सेवेत आहे. तिला सरकारी सेवक म्हणून निवासस्थान मिळाले आहे. त्याच घरात नवरा म्हणुन केजरिवाल यांनी वास्तव्य का करावे? तोही भ्रष्टाचार व घोटाळाच नाही काय? पत्नी सरकारी सेवक असल्याचा लाभ घेऊन केजरिवाल सरकारी निवासस्थानात वास्तव्य करणार आणि तसेच अन्य कोणी सरकारी सवलत वा धोरणाचे लाभ घेतले तर घोटाळा कसा होतो?

   या सगळ्या गडबडीत केजरिवाल व दमाणिया यांनी एक गोष्ट माध्यमांपासून मोठ्या खुबीने लपवून ठेवली, ती म्हणजे त्या दमाणीया बाईंची स्वत:ची जमीन. ती जमीन कोंडाणे धरणात बुडत होती आणि तीसुद्धा त्यांनी बेकायदा खरेदी केलेली जमीन. त्यामुळे चौकशी करून तिथल्या तहसिलदारांनी ती जमीनखरेदीच रद्दबातल केली आहे. पण याचा उल्लेख कुठेच होताना दिसत नाही. विरोधी नेते एकनाथ खडसे व दमाणिया यांना झी२४ तास वाहिनीने समोरासमोर आणले; तेव्हा खडसे यांनी त्याचा पर्दाफ़ाश केला होता. पण त्यानंतर कुठेच त्या वास्तवाचा उल्लेख होत नाही आणि दमाणीयांनी ते कुठे स्पष्ट्पणे सांगितलेले नाही. याचा अर्थ काय? केजरिवाल यांच्या सोबत असले, मग तुम्ही कोणतेही बेकायदा कृत्य करायला मोकळे आहात आणि तुम्ही ज्यांच्याकडे आरोपी म्हणून बोट दाखवाल, त्यांचे मात्र सगळे व्यवहार व कागदपत्रे ठिकठाक असली पाहिजेत? गडकरी यांचे व्यवहार वशीलेबाजीचे असतील, पण निदान नियम व कायद्याच्या चौकटीत बसणारे आहेत. दमाणिया बाईंचे काय? शेतकरी नसताना त्यांनी बेकायदा शेतजमीन खरेदी केली, ती बुडते म्हणून त्यांना भाजपा नेत्यांनी वशिले लावून जमीन वाचवून दिली पाहिजे आणि नाही तर तेच भाजपावाले गुन्हेगार? समजा गडकरी यांनी शरद पवार यांच्याकडे आपले वजन वापरून दमाणीयांची जमीन वाचवली असती तर? सलमान खुर्शिदवर खोटी कागदपत्रे व प्रतिज्ञापत्रे केल्याचा आरोप केजरिवाल करतात, मग दमाणियांनी शेतजमिन खरेदी करताना काय केले आहे? की दमाणिया केजरिवाल यांच्यासोबत आहेत म्हणून त्यांना सर्व गुन्हे माफ़ असतात?

   खुद्द केजरिवाल यांचे तरी काय? त्यांच्याकडे महाराष्ट्रातील सिंचन घोटाळ्याची सर्व कागदपत्रे वाय. पी. सिंग यांनी दिली होती. त्यातला मोठा घोटाळा लवासाच्या जमीनीचा आहे. पण त्यावर अवाक्षर न बोलता तेच केजरिवाल फ़ुसक्या गडकरी प्रकरणावर आदळाआपट कशाला करतात, असा सवाल त्यांना सिंग यांनी पत्रकार परिषद घेऊनच केला आहे. दुसरीकडे दोन्ही शेतकर्‍यांनी गडकरी यांच्या बाजूने साक्ष दिल्यावर दमाणियाबाई ते शेतकरीही दबावाखाली बोलतात अशी नवी लोणकढी थाप ठोकली आहे. गडकरी यांची श्रीमंती किंवा वैभव त्यांच्या मंत्रीपदाच्या कारकिर्दीनंतर वाढले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात खुप काही मोठे घबाड नक्कीच मिळू शकते. पण ते शोधण्याचाही प्रयत्न न करता केजरिवाल यांनी एकप्रकारे गडकरींवर उपकारच केले म्हणायचे. कारण उद्या तसे काही मिळाले व कोणी घोषित केले, तरी दमाणियाबाईंच्या अशा उथळपणामुळे आता को्णी गडकरी विरोधातल्या खर्‍या पुराव्यावरही विश्वास ठेवणार नाही. केवळ मोठ्मोठे सनसनाटी आरोप करून आपण भ्रष्टाचार विरोधातले मसिहा आहोत, अशी प्रतिमा निर्माण करून निवडणुका जिंकू शकतो, अशा भ्रमात केजरिवाल असतील, तर त्यांचा लौकरच भ्रमनिरास होईल. आज अण्णांचा भ्रमनिरास झाला म्हणून त्यानी सावधपणा म्हणून बाजूला होण्याचा निर्णय घेतला असावा. दोन दशकांपुर्वी खैरनार अशाच मस्तीत होते. केजरिवाल त्याच दिशेने व वाटेने निघालेत. पण खैरनार यांच्यापेक्षा केजरिवाल यांच्या गाडीचा वेग अधिक वाटतो. तेव्हा सोबत दमाणीयांना घेण्यापेक्षा जरा दमानी घ्या एवढाच त्यांना सल्ला द्यावासा वाटतो.
( प्रसिद्धी :प्रवाह, रविवार पुरवणी पुण्यनगरी २१/१०/१२)

२ टिप्पण्या:

  1. मलाही गेले काही दिवस आश्चर्य वाटत होते कि लोकांना भाजप (नेते ) भ्रष्टाचारी नाहीत असे का वाटते ? आणि आता खरच लांडगा आला रे आला असे होणार आहे . गडकरींची खरी लफडी बाहेर आली तरी कोणीही त्यावर विश्वास ठेवणार नाही .

    उत्तर द्याहटवा