शनिवार, १९ जानेवारी, २०१३

आपल्या धडावर आपलेच डोके असावे


    ‘मी ब्राह्मणांवर प्रेम करीत असताही जर ते माझे द्वेष व तिरस्कार करतील तर मलाही जशास तसे वागावे लागेल. त्यांची माझ्याशी प्रेमाची वागणूक आढळून येईल तर मी माझ्या घरच्या देवांची पूजा व इतर धर्मकृत्ये ब्राह्मणांकडून करवून घेण्याचे चालू ठेवीन. नाहीतर ब्राह्मण पुजार्‍यांना बंद करून माझ्या घरच्या देवांची पूजा मी मराठे पुजार्‍यांकडून करवून घेईन. ते मला मनुष्य समजत असतील तरच त्यांच्याकडे पुजारीपणा ठेवीन आणि जर का ते मला जनावराप्रमाणे समजतील तर मी ठेवणार नाही.’

      ‘राजकारण’कर्त्यासारख्या (दामलेशास्त्री) मजवर टिका करणार्‍यास माझी विनंती आहे, की त्यांनी माझे समग्र भाषण देऊन प्रत्येक पॅरेग्राफ़समोर त्यावर आपली टिका असेल ती छापावी. असे केले म्हणजे लोकांस आपले मत देण्यास बरे पडेल. अर्धाअधिक मजकूर गाळून थोडेसे अवतरण घेतल्याने; माझ्या सांगण्याचा विपर्यास होतो. ‘राजकारण’कर्त्यास अशी विनंती करणे, हे मी मोठे धाडस करितो अशीही भिती वाटते. कारण मग त्यास विरुद्ध टिका करण्यास स्थळे कमीच सापडतील’

   तब्बल ब्याण्णव वर्षापुर्वीच्या राजर्षी शाहू महाराजांच्या एका भाषणातला हा उतारा आहे. नेमके सांगायचे; तर १५ एप्रिल १९२० रोजीचे हे भाषण आहे. नाशिक येथे श्री. उदाजीराव मराठा विद्यार्थी वसतीगृहाच्या इमारतीच्या पायाभरणी समारंभातले प्रमुख पाहुणे म्हणून महाराजांनी जे सर्वस्पर्शी विस्तारपुर्वक भाषण केले होते, त्यातला हा उल्लेख आजच्या संबंधातही तेवढाच मोलाचा ठरावा. शाहू महाराजांनी जी ब्राह्मणी वर्चस्ववादाच्या विरोधात मोहिम त्या काळात छेडली होती आणि दुसरीकडे समाजसुधारणा व तात्कालिन राजकीय सुधारणांचे काम चालविले होते; त्याचा उहापोह त्यांनी या भाषणातून केलेला होता. महाराजांवर त्यावेळी व आजही धर्मविरोधी व ब्राह्मणांचा द्वेष करणारे असा आरोप होतो. त्याचाही समाचार त्याच भाषणातून घेतलेला आहे. जातीपातीच्या वर्चस्ववादाने समाजात जो उचनीच भाव पसरला होता, तो मोडीत काढून, तमाम समाजाला एकत्र आणायचे जे प्रयास चालू होते, त्यात आपली बुद्धी विघ्नसंतोषी वृत्तीने वापरणार्‍यांना महाराजांनी दिलेला तो इशारा होता. यातले शब्द व त्यांची योजना काळजीपुर्वक वाचली; तर असे दिसेल की महाराज आपल्या नुसत्या अपमान व अवहेलनेने व्यथित झालेले नाहीत. ज्याप्रकारे कारस्थानी वृत्तीने व टोळीबाज मानसिकतेने, त्यांना बदनाम व अपमानित करण्याचे प्रयास चालू होते, त्याने चिडून उठलेले दिसतील. 

   आपण ब्राह्मणांवर प्रेम करीत असूनही ते (ब्राह्मण) आपला द्वेष व तिरस्कार करतात व आपल्याला जनावरासारखी वागणूक देतात; ही त्यांची तक्रार आहे तेवढीच वेदना सुद्धा आहे. म्हणजे आपल्याला कुणाही ब्राह्मणाचा द्वेष वा तिरस्कार करायचा नाही. पण ते तसे वागत असतील, तर त्यांना तसाच प्रतिसाद द्यावा लागेल, असा त्यात इशारा आहे. इतके महाराज का चिडलेले असावेत? तर साक्षात राजा असून व त्याच्याच अनुदानावर उदरनिर्वाह करणार्‍यांनी, त्या राजाला अपमानित करायचे उद्योग चालू होते. सामान्य माणसाचे किंवा अस्पृष्य जातीच्या लोकांचे सोडाच; खुद्द राजालाही तुच्छ ठरवणार्‍या अभिजन वर्गाच्या प्रवृत्तीने महाराज संतापले होते. आणि तो अभिजनवर्ग म्हणजे बुद्धीचा मक्ता आपल्याकडेच आहे; अशी समजूत असल्याने मुजोर झालेला ब्राह्मणवर्ग होता. त्या समजाला कोणी आव्हान दिलेले नव्हते. पण स्वत:ला तुम्ही शहाणे समजत असला; म्हणून इतरेजनांना तुच्छ लेखून सातत्याने त्यांची अवहेलना कराण्याचा अधिकार गाजवला जात होता, त्याच्या विरोधात महाराजांनी शड्डू ठोकला होता. आपल्याच अनुदानावर पोसला जाणारा हा मुजोर वर्ग आपल्यालाच असे वागवत असेल, तर सत्ताहीन, शक्तीहीन व संपत्तीहीन सामान्य लोकांची काय कथा? हे लक्षात आल्यानेच शाहू महाराजांनी या बौद्धिक मुजोरीचे कंबरडे मोडायचा विडा उचलला होता. त्यासाठी त्यांनी तळागाळातल्या विविध समाजघटकांच्या शिक्षणांला प्रोत्साहान दिले, सवलती दिल्या. पण नुसत्या सवलती देऊन ते थांबले नाहीत. तर या मुजोरीशी दोन हात करायलाही शाहू महाराज पुढे आलेले होते. आणि त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या त्या भाषणात पडलेले होते.

   महाराजांना धर्मकार्य वा कर्मकांडात ब्राह्मणांचा त्रास झाला व अडवणूक झाली असेल हा त्यांचा व्यक्तीगत विषय होता. म्हणूनच त्यांनी त्याला फ़ारसे महत्व दिलेले दिसत नाही. पण त्यांच्या कार्यात बाधा आणणार्‍यांचे प्रयत्न मुळातच बौद्धिक मुजोरी व मक्तेदारीचे होते, आणि त्यामुळेच तात्कालीन ब्रह्मवृंद विचलित होऊन महाराजांच्या विरोधात एकवटला होता. संघटित हल्ले केल्याप्रमाणे खोटेनाटे आरोप करीत होता, लिहित होता. अशाच त्यावेळच्या एका नियतकालिकात जो अवास्तव टिकेचा प्रकार घडला होता, त्यावर महाराज तुटून पडले आहेत. पण आपल्यावरचे नुसते आरोप त्यांनी खोडून काढलेले नाहीत. तर त्या आरोपबाजी व टिकेच्या आडची बदमाशी त्यांनी चव्हाट्यावर आणलेली आहे. टिका व बदनामी, यात खुप मोठा फ़रक असतो, महाराजांनी टिकेचे त्याही भाषणात स्वागत केले आहे आणि जरूर टिका करा, म्हणजे मला सुधारण्यास मदत होईल; असेही उदगार काढलेले आहेत. पण टिकेच्या आडून बदनामीचे कारस्थान चालवले जाते, त्या बौद्धिक बदमाशीवर महाराजांनी नेमके बोट ठेवले आहे. ते काय म्हणतात? ‘अर्धाअधिक मजकूर गाळून थोडेसे अवतरण घेतल्याने माझ्या सांगण्याचा विपर्यास होतो.’ 

   आपल्या भाषणाचा बरचसा मजकूर गाळला जातो आणि बारीकसे अवतरण देऊन अर्थाचा अनर्थ केला जातो. ते कोण करत होते? तेव्हाचा बुद्धीवादी अभिजन वर्ग. अर्थात त्यावेळी शिक्षणाचा आजच्यासारखा प्रसार झालेला नसल्याने जो पिढीजात सुशिक्षित उच्चभ्रू ब्राह्मण समाज होता, त्यातूनच अभिजन घडवले जात. आणि तेच असे बौद्धिक मुजोरी दाखवून सत्याचा विपर्यास करीत होते. मुठभर लोक वृत्तपत्रे वाचन होते आणि हाताच्या बोटावर मोजावी इतकीच वृत्तपत्रे होती, तेव्हाची ही गोष्ट आहे. लिहिता वाचता येणारे व बुद्धीमान समजले जाणारे ब्राह्मण सुधारणेच्या चळवळीला व्यत्यय आणण्यासाठी सत्याचा अपलाप करीत होते. आणि तो विपर्यास कोणत्या मार्गाने केला जात होता? मूळ भाषण छापायचेच नाही. त्यातला सोयीचा शब्द, वाक्ये वा अवतरणे घेऊन त्यावरच झोड उठवायची. म्हणजे असे, की मांडलेल्या मूळ मुद्द्याचा अनर्थ होऊन लोकांमध्ये गैरसमज निर्माण झाले पाहिजेत. त्याला काही लोक बामणीकावा म्हणतील. मी त्यात पडणार नाही. पण हा इतिहास आज अगत्याने इथे शाहू महाराजांच्या नेमक्या शब्दात सांगायचे कारण असे; की एक शतकाचा काळ उलटून जायची वेळ आली, म्हणुन त्याच माध्यमे व नियतकालिकातील मानसिकता कितीशी बदलली आहे? अर्थाचा अनर्थ व मूळ भाषणाचा विपर्यास करायचे थांबले आहे काय? 

   गेल्या दोन आठवड्यात दिल्लीच्या सामुहिक बलात्कार प्रकरणानंतर एकूणच राजकीय नेत्यांपासून संघटनांचे नेते व साधू महाराजांच्या विरोधात जे काहूर माजवण्यात माध्यमांनी भूमिका बजावली; ती किंचित तरी वेगळी आहे काय? प्रत्येक बाबतीत कोणाचे तरी अवतरण (म्हणजे आधी व नंतर तो माणूस नेमके काय बोलला आहे ते लपवून) घेऊन त्याच्यावर काहूर माजवण्यात आले. यातले दोन मोठे साक्षिदार म्हणजे मान्यवर महिलाच आहेत. दिल्लीच्या माजी पोलीस आयुक्त म्हणून काम केलेल्या व सध्या अण्णा हजारे यांच्या लोकपाल आंदोलनात आघाडीवर दिसलेल्या किरण बेदी  व प्रसिद्ध पत्रकार व कार्यकर्त्या मधू किश्वर अशी त्या दोघींची नावे आहेत. त्या दोघी नित्यनेमाने टिव्ही वाहिन्यांच्या चर्चेत आपल्याला दिसतात. मोहन भागवत यांच्या भाषणासंबंधी काहुर माजवाले जात असताना अनेक वाहिन्यांनी या दोघींशी संपर्क साधला. असे लोक वाहिन्यांना लागतच असतात. आपण जो धुमाकुळ चालविला आहे, त्यात तथ्य असल्याचे भासवण्यासाठी व मान्यवरांचे तसेच मत असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी; मग अशा मान्यवरांच्या साक्षी काढल्या जातच असतात. त्यांना तेवढेच अवतरण म्हणजे एखादे वाक्य दाखवले जाते. आणि बाकी आपल्या मनचे सांगून प्रतिक्रिया व्यक्त करायला सांगायचे. वाहिनीचा वार्ताहर सत्य सांगतो, या गृहितावर अनेकजण प्रतिक्रिया देऊन मोकळे होतात. म्हणून त्यांना सत्य काय घडले, त्याचा थांगपत्ता नसतो. अनवधानाने अशी बरीच मान्यवर मंडळी त्या खोटारडेपणात सहभागी करून घेतली जातात. आणि मग बघा, लोकमत संतप्त झाले आहे, असा डंका पिटला जातो. वाहिन्यांवर आलेल्या प्रतिक्रिया, मग अन्य वृत्तपत्रातून बेधडक छापल्या जातात. पण राईचा पर्वत करताना मुळात राई तरी आहे काय; याचा शोध कोणी घ्यायचा प्रयत्न केला तर त्यालाही धक्का बसायची वेळ येते आणि इथे तेच झाले.

   मधू किश्वर यांना वाहिनीकडून भागवत यांचे वादग्रस्त विधान सांगण्यात आले आणि त्यावर मतप्रदर्शन करायचा आग्रह धरण्यात आला. पण आधीच्या अनुभवामुळे सावध असलेल्या मधू किश्वर यांनी संपर्क साधणार्‍या प्रत्येक वाहिनीकडे भागवतांचे संपुर्ण भाषण ऐकायचा आग्रह धरला. ते शक्यच नव्हते. खरे भाषण संपुर्ण ऐकवले; तर माध्यमांचा खोटारडेपणा उघडा पडणार होता. म्हणून किश्वर यांचा नाद सोडून वाहिन्या इतर मान्यवरांकडे वळल्या व त्यांनी धुमाकुळ घालून घेतला. पण हे सुद्धा असेच काहीतरी खोटे असणार याची किश्वर यांना खात्री होती. म्हणुनच त्यांनी आपल्या मार्गाने भागवतांचे संपुर्ण भाषण मिळवले. मुळात त्यांना वाहिन्यांच्या आशा काहूर माजवण्याविषयी शंका व संशय का यावा? त्याचे कारण दोन महिने आधी घडले होते. त्यावर त्यांनी एक लेखही इंग्रजीमध्ये लिहिला होता. तेव्हा गुजरात व हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुका चालू होत्या. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हिमाचलमध्ये प्रचाराला गेलेले होते. त्यांनी पाऊण तास केलेल्या भाषणावर असेच काहूर माजवण्यात आलेले होते. त्यात त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री शशी थरूर यांच्या पत्नी व आधीचे मंत्रीपद जाण्यास कारणीभूत झालेल्या मैत्रीण, सुनंदा यांच्यावर मोदींनी टिप्पणी केली होती. तो एकूणच महिलांचा अवमान आहे असे काहूर माजवले जात होते. पण पाऊण तास कोणी केवळ ‘काही कोटी रुपयांची मैत्रीण’ असे एकच वाक्य बोलणार नाही. तो आणखी काही बरेच बोलला असणार. मग ते कां सांगत नाहीत वाहिन्या? त्या भाषणातले एकच वाक्य घेऊन काहूर माजवले जात होते. पण त्याच कालखंडात हिमाचलच्या थंड प्रदेशात घरसंसार संभाळणार्‍या महिलांचे गॅस अनुदान रद्द झाल्याने किती हाल होत आहेत; त्यावर मोदी विस्ताराने बोलले होते. त्यातून सर्वसामान्य महिलांच्या हालअपेष्टांविषयी त्यांना असलेली नेमकी जाणिव स्पष्ट होऊ शकत होती. पण त्याबद्दल अवाक्षर वाहिन्या बोलत नव्हत्या किंवा दाखवले जात नव्हते. पाऊण तासाच्या भाषणातील एकच वाक्य निवडून त्यावर गोंधळ घातला जात होता. त्यापेक्षा तात्कालीन परिस्थितीमध्ये गॅसमुळे हैराण झालेल्या महिलेच्या वेदना व समस्याविषयी वाहिन्या कशा बधीर व संवेदनाशून्य आहेत; याचा किश्वर यांना संताप आला होता. कारण त्या स्त्री चळवळीच्या कार्यकर्त्या आहेत. महिलांचा अवमान म्हणून बोंबा मारणारे प्रत्यक्षात लोकांची दिशाभूल करत होते. कारण देशातील करोडो महिलांसाठी त्यावेळी कोट्यवधीची उलाढाल करणार्‍या श्रीमंत मनमौजी सुनंदाच्या सन्मानापेक्षा गॅस हा जिव्हाळ्याचा विषय होता. पण वाहिन्या मात्र नको त्या शब्दावर दळण दळून विपर्यास करीत होत्या. म्हणून भागवतांच्या भाषणावर प्रतिक्रिया वाहिन्यांनी मागितली, तेव्हा मधू किश्वर सावध होत्या. आधी सगळे भाषण ऐकवा असा हट्ट त्यांनी धरला. 

   मात्र भागवत यांचे मूळ भाषण ऐकून किश्वर गप्प बसल्या नाहीत. त्यांनी आपल्या ट्विटर वरून वाहिन्यांचा खोटारडेपणा जगासमोर मांडला. त्याच दरम्यान किरण बेदी यांनीही इंटरनेटच्या माध्यमातून भागवत यांचे संपुर्ण भाषण ऐकले, तेव्हा त्यात महिलांचा किंवा भारतिय विवाहाचे वि्डंबन कुठेही केलेले नव्हते, असे बेदी यांना आढळून आले. उलट वाहिन्या जे दाखवत व ऐकवत होत्या, त्यात सरळसरळ लबाडी चालू असल्याचे त्यांना दिसून आले. भागवत यांनी आपल्या भाषणामध्ये भारतीय विवाह, त्यातील महिला व कुटुंब यांच्या परस्पर संबंधांवर टिप्पणी केलेली होती. त्यात भारतीय महिला वा विवाह संबंध याचा सन्मानजनक उल्लेख होता. बेदी यांनाही हा खोटेपणा असह्य झाला. त्यांनी देखील वाहिन्यांच्या खोटेपणाचे पितळ लगेच ट्विटरच्या माध्यमातून जगासमोर मांडले, त्याचा बोलबाला झाल्यावर वाहिन्यांचा धीर सुटला. आता मोबाईल वा इंटरनेट वापरणार्‍यांसमोर उघडे पडल्यावर विनाविलंब भागवत पुराण तमाम वाहिन्यांनी गुंडाळले आणि ओवायसीच्या शिळ्या कढीला ऊत आणायचे काम हाती घेतले. इथे एक भयंकर बदमाशी लक्षात घेतली पाहिजे. भागवत यांच्या मुळ भाषणाची मोडतोड करून त्यातले नसलेले पाप दाखवण्यासाठी जीवाचा आटापिटा करणार्‍या वाहिन्यांनी सहा दिवस आधी होऊन गेलेल्या ओवायसीच्या अत्यंत स्फ़ोटक व वादग्रस्त भाषणावर अवाक्षर बोलायचे टाळले होते. पण भागवत पुराण उलटल्यावर त्याच ओवायसीवर किर्तन सुरू झाले. ते भयंकर एवढ्यासाठी म्हणायचे, की इंतरनेट व सोशल मीडियावर ओवायसीचे वादग्रस्त भाषण तीन चार दिवस फ़िरत असताना व त्यावर संतप्त प्रतिक्रियांचे वादळ उठले असताना; वाहिन्या व वृत्तपत्रे त्याबद्दल मूग गिळून गप्प बसलेली होती. जणू ओवायसीला वाचवण्यासाठी किंवा झाकण्यासाठीच भागवतांचे वादग्रस्त नसलेले भाषण संगनमताने वादग्रस्त बनवण्यात आलेले होते. थोडक्यात चोर सोडुन संन्याशी म्हणावा, तसाच वाहिन्यांचा कल्लोळ चालू होता. त्यावर मधू किश्वर व बेदी यांनी झोड उठवली नसती, तर ओवायसी वाहिन्यांनी लपवलाच असता. म्हणजे वाहिन्या किती दिशाभूल करतात ते लक्षात येईल. 

   एकदा अशा अफ़वा पसरवून झाल्यावर वाहिन्यांनी त्याबद्दल बोलायचेच सोडुन दिले. कारण मग इंटरनेटवर कोणी तरी भागवत यांचे संपुर्ण भाषणच टाकले. त्याचा त्याच सोशल मीडियातून प्रसार करण्यात आला. पण जित्याची खोड म्हणतात ना? खोटेपणाचीस संवय लागली; मग रोज काही खोटेपणा केल्याशिवाय अन्न पचणार कसे? त्यामुळेच मग वाहिन्यांनी नासलेले म्हणून बाजूला केलेल्या खरखट्या ताटातले असत्य, वृत्तपत्रातील सेक्युलर पत्रकारांनी पक्वान्न म्हणून उचलून धरले. आता त्यातूनच नवे प्रकरण उदभवले आहे. मान्यवर दैनिक सकाळच्या गेल्या आठवड्याच्या ‘सप्तरंग’ पुरवणीमध्ये हेमंत देसाई यांनी भागवत यांच्यावर टिप्पणी केली. म्हणजे खोटे आहे, याची खात्री असतांनाही पुन्हा तोच विषय उकरून काढला. थोडक्यात ठरवून विपर्यास करायचा, हीच भूमिका नाही काय? कोणी इतका बेशरमपणा करीत असेल, तर मग त्यामुळे दुखावणार्‍यांनी काय करावे? आता त्या खोटेपणाबद्दल आपल्याला धमक्या दिल्याचे फ़ोन आले; अशी तक्रार देसाईंनी पोलिसात केली आहे. पण तशी वेळ तुमच्यावर यावीच का? माझ्या माहितीप्रमाणे सकाळच्या संपादक व कार्यालयाला भागवत यांच्या भाषणाबद्दल पुर्ण माहिती देण्यात आलेली होती. तरीही असा लेख लिहिला व छापला जात असेल; तर त्यामागे बदनामी आणि दिशाभूल करण्याचा हेतू स्पष्टपणे समोर येतो ना? मग अशा लोकांबद्दल काय बोलायचे? ही कुठली प्रवृत्ती म्हणायची? असे वागणारे कुठल्या जातीचे वा धर्माचे आहेत त्याला अर्थ नाही. कारण शाहू महाराज धर्म वा जात मानत नव्हते; तर अन्याय व खोटेपणाच्या विरोधात कंबर कसून उभे होते आणि त्यांनी विपर्यास करणार्‍या ब्राह्मणांच्या विरोधात रणशिंग फ़ुंकले होते. दुर्दैव इतकेच, की जी माणसे असा विपर्यास आजकाल सर्रास करीत असतात, तीच माणसे नित्यनेमाने ‘फ़ुले शाहू आंबेडकर’ अशी जपमाळ ओढत असतात. शाहू महाराजांच्या विचारांनी प्रेरीत झालेला कोणी अशी बदमाशी वा विपर्यास करू शकतो का? नसेल तर असे का होते आहे आणि तसे करणारे शाहू महाराजांचे नाव तरी कशाला घेतात? महाराजांच्याच कोल्हापुरचे साम्यवादी विचारवंत कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांनी अशा बनावट सेक्युलर माध्यमे व विचारवंतांकडे नेमके बोट दाखवले आहे. ‘परिवर्तनाच्या दिशा’ पुस्तकात कॉम्रेड लिहितात, 

      ‘शोषक चलाख असतात, आहेत. ते ज्या अनेक चलाख्या करतात, त्यातील एक चलाखी अशी असते, की, ते स्वत:च शोषितांच्या हिताचा विचार मांडतात. शोषितांना बनवायचा तो प्रकार असतो. शोषक दुसरी एक चलाखी करतात. जे शोषितांचा विचार मांडतात त्यांनाच शोषक मान्यता देतात. त्यांनाच आपले विचारवंत म्हणून घोषित करतात. याचा परिणाम शोषितांचा संघर्ष कमकुवत करण्यात होतो. काही वेळा शोषितांमधून आलेल्या नेत्या कार्यकर्त्यांना शोषक जवळ करतात, सत्तेत थोडाबहूत वाटा देतात. हा सुद्धा शोषितांना फ़सवण्याचा डाव असतो. म्हणूनच आपल्या धडावर आपलेच डोके असावे आणि आपल्या डोक्याखाली आपलेच धड असावे.’ 

   आज वाहिन्यांची रेलचेल झाली आहे. माध्यमांचा पसारा वाढला आहे. त्यातली गुंतवणूक अफ़ाट झाली आहे आणि एकूणच सगळा व्यवहार आतबट्ट्याचा होऊन गेला आहे. तरी भांडवलदार लोक इतके पैसे बुडवून माध्यमे का चालवित आहेत? तर हे असे त्यांना लोकांची दिशाभूल करायची असते म्हणून. खर्‍या समस्या, लढे व लोकचळवळीतून लोकांचे मन उडवायचे आणि न्यायाच्या लढ्य़ांना सुरुंग लावायचा असतो. त्यासाठी मग भागवत, अण्णा किंवा आणखी कोणाचा बिनधास्त विपर्यास करून बळी घेतला जात असतो. त्यामागची भूमिका व योजना सोपी असते. खोटे बोला पण रेटून बोला.




३ टिप्पण्या:

  1. Same way this media also fabricated savarkars letter and presented it as a clemency note/ apology letter, but see the total paragraph and decisde on your own whether it is an apology letter to british.

    One need go to New Delhi’s ‘National Archives’ to see Savarkar’s letter which has been presented as a ‘Clemency Letter’. Savarkar himself also published the said letter in his book “Letters From Andaman” (letters which he send to his younger brother Dr.Narayan Savarkar from Andaman) as letter no.8 dated 06-07-1920 (original application which he send to British has date 02-4-1920). A significant excerpt of it is as follows:
    ”As to the question so often put to me and others by officers no less exalted than the members of the Indian Cabinet ‘what if you had rebelled against the ancient kings of India? They used to trample rebels under the feet of Elephants’. I answer that not only in India but even in England and all other parts of the world such would have at times been the fate of rebels. But then why did the British people fill the whole world with a howl that the Germans had ill treated their captives and did not allow them fresh bread and butter! There was a time when captives were flayed alive and offered as victims to Moloch and Thor and such other Gods of war!’ The thing is this that this advanced stage in civilization attained by man is the resultant of the efforts of all men and therefore their common inheritance and benefits all. Speaking relatively to Barbarian times it is true that I had a fair trial and a just sentence and the Government is at liberty to derive whatever satisfaction they can from the compliment that they give a fairer trial and a juster sentence to their captives than the cannibals used to do. But it should not be forgotten that if in olden days the rulers flayed their rebels alive then the rebels too when they got the upper hand flayed alive the rulers as well. And if the British people treated me or other rebels more justly i.e. less barbarously then they may rest assured that they too would be as leniently treated by the Indian rebels if ever the tables are turned”

    उत्तर द्याहटवा